Total Pageviews

Monday 14 November 2011

KING FISHER IPL CHEER GIRLS FORMULA 1 CAR RACES

सरकारने आर्थिक प्राणवायूचे नळकांडे घेऊन किंगफिशरभोवती फिरू नये. पैसा एवढाच वर आला असेल तर शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करावी.

किंगफिशर देशोधडीस
सरकारी खजिना कोणासाठी?

एअर इंडियाचा महाराजा कंगाल, भिकारी झाला व त्यास भिकारी करणारे मंत्री व लुटमार करणारे अधिकारीच होते. आता अति श्रीमंत, गर्भश्रीमंत वगैरे उपाध्यांनी प्रख्यात असलेले विजय मल्ल्या यांची किंगफिशर विमान कंपनीही देशोधडीस लागली. अर्थात किंगफिशर देशोधडीस लागल्यामुळे मल्ल्या यांची श्रीमंती, त्यांचे ऐटबाज राहणीमान, त्यांची छानछोकी यात कुठेही कमी झालेली नाही. त्यांचे रंगढंग सुरूच आहेत, पण किंगफिशर देशोधडीस लागल्याचा सगळ्यात जास्त फटका प्रवाशांना व त्यांच्या कर्मचार्‍यांना बसला आहे. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरचे काय होणार याची सर्वाधिक फिकीर लागली आहे ती अर्थशास्त्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांना. कारण बुडालेल्या किंगफिशरला मदतीचा हात द्या होऽऽ अशी करुण किंकाळी मल्ल्या यांनी मारताच मनमोहन सिंग यांनी परदेश दौर्‍यात असतानाच सहानुभूतीची ‘ओ’ दिली आहे. किंगफिशरला म्हणे सहा हजार कोटींचा तोटा झाला आहे व सरकारी खजिन्यातून मदत करावी अशी मल्ल्या यांची मागणी आहे. विजय मल्ल्या यांच्याकडे म्हणे आता सर्वच बाबतीत खणखणाट आहे. वैमानिकांचे पगार द्यायला पैसे नाहीत. विमानात इंधन भरायला पैसे नाहीत. इतकेच काय, विमानांचे ‘टायर’ बदलायलाही पैसे नाहीत. सध्या किंगफिशरची 27 विमाने विमानतळावर नुसती उभी आहेत. थोडक्यात किंगफिशर एअरलाइन्स डबघाईला आली आहे व या भंगार डब्यात सरकारने तेलपाणी घालावे असे मल्ल्या यांचे म्हणणे आहे आणि मल्ल्या यांच्या कंपनीची दारू न पिताच
सरकारला झिंग आल्याने
‘काय करणार तो बिचारा? त्याला वाचवले पाहिजे!’ या भूमिकेत सरकार शिरले आहे. मल्ल्या यांचे इतरही अनेक उद्योग व जोडधंदे आहेत. विजय मल्ल्या हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे मद्यसम्राट आहेत. बंगळुरू आय.पी.एल. क्रिकेट क्लबचे मालक आहेत. नुकतीच जी ‘एफ वन’ नावाची कार रेस झाली त्याचे मालकही हे होतेच. त्यांच्या मालकीचे अनेक महाल, बोटी आहेत. आयपीएलच्या मैदानावर उघड्या कपड्यातील ‘चिअर्स गर्ल्स’ नाचवताना किती कोटींची उधळपट्टी त्यांनी केली हे त्यांनाच माहीत. चिअर्स गर्ल्सच्या उघड्या मांड्यांसाठी क्रिकेट टीमवर पैसा गुंतवताना त्यांना बुडणारे किंगफिशर दिसू नये ही कोणती धुंदी? कर्मचार्‍यांचे पगार थकले आहेत व विमाने जमिनीवर आहेत हे त्यांना त्या धुंदीत जाणवले नाही व आता ते सरकारकडे आर्थिक मदतीची याचना करीत आहेत. प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांनी जी कठोर भूमिका या निमित्ताने घेतली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. बजाज यांनी अत्यंत परखडपणे सांगितले आहे की, ‘खासगी उद्योगांना अशाप्रकारे सरकारी खजिन्यातून आणि बँकांतून मदत करण्याची गरज नाही. दिवाळखोरीने जाणारा एखादा खासगी उद्योग मरत असेल तर त्याला खुशाल मरू द्या. सरकारी मदतीने तो पुन्हा उभा करण्याचे तत्त्व मला तरी मान्य नाही.’ बजाज यांनी जे सांगितले तेच सोळा आणे सत्य आहे. बजाज यांच्यासारखे अनेक उद्योजक खासगी क्षेत्रात पाय रोवून आहेत व देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर टाकत आहेत. ‘किंगफिशर’ची विमाने असतील तर बजाज यांचा स्कूटर्स, रिक्षा वगैरे वाहनांच्या निर्मितीचा प्रचंड व्याप आहे. अनेकदा बजाज यांच्यावरही संकटे कोसळली, पण त्यांनी किंवा त्यांच्यासारख्या बिर्ला, टाटा, गोदरेज वगैरे नामवंत उद्योगपतींनी कधी सरकारकडे मदतीची याचना केल्याचे दिसत नाही. खासगी उद्योग बुडत असेल तर तो खुशाल बडू द्यावा, पण तो वाचविण्यासाठी सरकारकडे हात पसरणे योग्य नाही. हे खासगी उद्योग सरकारी धोरणांपेक्षा त्यांच्या अव्यवहारी कारभारामुळे, उधळपट्टीमुळेच बुडत आहेत. एखादा दारूडा त्याच्याकडे श्रीमंती आहे म्हणून रोज उंची मद्य पिऊ लागला तर काय होणार? त्याचे यकृत हे त्या अती मद्यपानाने बिघडणार व तो श्रीमंत दारूडा मरणार. शरीरशास्त्र हेच सांगते. विजय मल्ल्या यांनी त्यांच्या विमान कंपनीत जी चमकधमक आणली. सुंदर ललना, इतर मौजमस्तीच्या बाबी आणल्या. तो सर्व प्रकार त्यांना घेऊन बुडाला.
अंथरुण पाहून पाय पसरावेत
अशी एक म्हण मराठीत आहे. विमान वाहतूकमंत्री असताना पटेल यांनी या म्हणीचा अर्थ किंगफिशरवाल्यांना समजून सांगितला असता तर बरे झाले असते, पण पटेल हे त्यांच्या काळात ‘किंगफिशर’चे खरे मालक आपणच असल्याच्या थाटात वावरत होते व त्यांच्या सोयीचे निर्णय घेत होते. पटेल गेले व किंगफिशरचा डोलारा कोसळला. हे सर्व होणारच होते. खासगी क्षेत्रात इतर विमान कंपन्या आहेत. त्यांच्यासमोरही अडचणी असतील, पण त्यांची अवस्था किंगफिशरप्रमाणे झालेली नाही. उलट ‘गो एअर’, इन्डिगोसारख्या ‘लो बजेट’ विमान कंपन्यांचे अधिक बरे चालले आहे. स्वत:च्या कर्माने बुडणार्‍या किंगफिशरपेक्षा सरकारने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या सरकारी विमान कंपन्यांना अर्थसहाय्य द्यावे. कारण एअर इंडियाचा ‘महाराजा’ ही एकेकाळी हिंदुस्थानी विमान वाहतुकीची ओळख होती. चेहरा होता. खासगी विमान कंपन्यांच्या फायद्यासाठी या दोन्ही कंपन्यांचा बळी देणारेच आता किंगफिशरच्या मदतीचे घोडे दामटत आहेत. एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स डुबत होती, दोन्ही कंपन्यांच्या कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी पगाराशिवाय गेली त्यावेळी हेच पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री डोळ्यांवर पट्टी बांधून होते. किंगफिशरला मदत देण्यापेक्षा या कर्मचार्‍यांचे पगार द्या. एअर इंडियाला सर्व तर्‍हेचे बळ द्या. एअर इंडियाचे खासगीकरण करण्यापेक्षा किंगफिशरचे सरकारीकरण करा. स्वत:ची पोरे उपाशी ठेवून सवतीच्या पोरांना सोन्याच्या चमच्याने दूध पाजण्याचे धंदे बंद करा! किंगफिशर त्यांच्या कर्माने बुडत आहे. स्वत:चे प्राण वाचविण्याची जबाबदारी त्यांची. सरकारने उगाच हजारो कोटींचे आर्थिक प्राणवायूचे नळकांडे घेऊन किंगफिशरभोवती फिरू नये. सरकारचा पैसा एवढाच वर आला असेल तर मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू कराव्यात. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करावी. उसाच्या भावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलाय, त्याला चांगला भाव द्यावा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे

No comments:

Post a Comment