Total Pageviews

Thursday 3 November 2011

MISUSE OF VIP SECURITY

श्रद्धा आणि सुरक्षा
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी नगरीची सुरक्षा सध्या साईभरोसे आहे. देशभरात कधी-कुठे बॉम्बस्फोट झाला अथवा आतंकी कारवाईचा इशारा आला की शिर्डीत हाय अँलर्टलागू होतो. पोलिसही मग हातातील काठी सरळ करत घडीभर दक्ष अवस्थेत उभे राहातात. त्यानंतर पहिले पाढे पंचावन्न! पोलिसही काय करणार म्हणा. साईसमाधीमंदिर आणि भक्तांच्या सुरक्षेपेक्षाही येथे येणार्‍या व्हीआयपींची बडदास्त ठेवणे, हीच त्यांच्यावर मुख्य जबाबदारी. त्यासाठीच तर ते दिवसभर राबत असतात. त्याचा सगळा ताण पोलिसांवर पडत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन आणि मूलभूत सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. संस्थानची सुरक्षा व्यवस्थाही तोकडी आहे. व्हीआयपींचे साईदर्शन हा तर आणखीनच दिव्य प्रकार. जणू साक्षात साईबाबा त्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत, असाच त्यांचा एकूण आविर्भाव असतो. चार-पाच तास दर्शन रांगेत ताटकळत असलेल्या सर्वसामान्य भक्तांची रांग ओलांडून ते थेट मंदिरात घुसतात. हाच प्रकार पहाटेच्या काकड आरतीच्या वेळीदेखील घडतो. व्हीआयपींच्या घुसखोरीमुळे रात्रभर दर्शन रांगेत उभे असलेल्या भक्तांना बाबांचे मूर्तीचे मुखदर्शनही घडू शकत नाही. देवाद्वारचा हा भक्तिभेद सर्वसामान्य भक्त निमूटपणे सहन करतो. गर्दीत ताटकळून घुसमट झाली तरी त्याची काहीएक तक्रार नसते. संस्थानचे व्यवस्थापनच जर सरकारी पाहुण्यांसाठी पायघड्या अंथरत असेल, तर तक्रार करणार तरी कोणाकडे? तीर्थस्थळी अति विशिष्ट व्यक्तींच्या येण्याबाबत कोणाचे आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु त्यांनी किमान काही नियम पाळावेत. देवापुढे सर्वभक्त समान, हे सुभाषित कृतीत आणले तरच हा भक्तिभेद दूर होऊ शकतो. तिथेही जर अस्पृश्यतेचीच वागणूक मिळाली तर सर्वसामान्यांचा देवावरचा उरला सुरला विश्‍वासही उडून जाईल. नाहीतरी मंदिरांमध्ये भक्तांपेक्षा चोरांचीच गर्दी अधिक असते. अनियंत्रित गर्दी हे भुरट्या चोरांपासून ठकसेनांपर्यंत अनेकांसाठी वरदानच ठरते. शिर्डीही त्यास अपवाद असण्याचे कारण नाही. इथेही पाकीटमार गदरुल्यांची कमी नाही. किंबहुना, शिर्डी हे तर अशा गुन्हेगारांचे माहेरघरच बनले आहे. ऑनलाईन सुविधेमुळे थेट दर्शनाच्या नावाखाली होणारी लूट थांबली असली तरी भक्तांजवळची संपदा सुरक्षित राहीलच याची शाश्‍वती नाही. पाकिटमारांमध्ये शिर्डीच्या मार्केट’चा लिलावही होतो म्हणतात! शिर्डीत अलिकडच्या काळात गुन्हेगारी खूप वाढली आहे. या गुन्हेगारी टोळ्यांना पोसण्याचे पाप इथल्या काही राजकारणी आणि जमीन माफियांनी केले. कुख्यात गुन्हेगार पाप्या शेख हा याच टोळीचा म्होरक्या. पोलिसांना तो अजूनही सापडत नाही. कसा सापडणार? पोलिसांना समजणारी काय-द्यायची भाषा त्याला चांगलीच अवगत आहे. सरकार भलेही समजत असेल, की शिर्डीला अतिरेक्यांपासून धोका होणार नाही, परंतु शिर्डीतील गुन्हेगारांचा वाढता वावर अतिरेक्यांपेक्षाही अधिक धोकादायक आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त केला गेला नाही, तर भक्तांच्या श्रद्धेलाच नख लागू शकते

No comments:

Post a Comment