Total Pageviews

Wednesday 26 October 2016

चीनी वस्तू म्हणजे "मेड इन चायना‘. या वस्तूंची खरेदी म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानला मदत करण्यासारखे किंवा आपल्याच पाठित खंजीर खुपासण्यासारखे आहे. यामुळे आपण सर्वांनी मिळून चीनी वस्तू खरेदी न करण्याची शपथ घेऊयात. पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवरील आक्रमण थांबवून देशसेवा करूयात.


उरी हल्ल्यामुळे आणि त्यानंतर भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार करत असून, आपले जवान हुतात्मा होत आहेत. तर दहशतवादीही पुन्हा पुन्हा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याची हिंमत करत आहेत. पाकिस्तानचा मित्र देश म्हणजे चीन. भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी चीन पाकिस्तानला सहकार्य करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. "शत्रूचा मित्र आपला शत्रू‘ या न्यायाने चीनही भारताचा अप्रत्यक्ष शत्रूच आहे. याशिवाय भारतामध्ये कोणतीही वस्तू आणि उत्पादने आली की हुबेहूब तशीच, अत्यल्प दरातील, बनावट उत्पादने भारतात उपलब्ध करून देत चीन भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडियावर सध्या चीनमधील भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नेटिझन्सनी मोहिमही उघडली आहे. चीनच्या वस्तूंवर आपण पूर्णपणे बहिष्कार टाकला, तर एकाअर्थी नाक दाबल्यास तोंड उघडू शकेल, अशी अवस्था पाकिस्तान आणि चीनची करता येईल. त्यामुळे सोशल मिडियावरील या मोहिमेत सहभागी होऊन चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे योग्य ठरणारे वाटते. दिवाळी सण सुरू होत असून विद्यार्थ्यांच्या सुट्या सुरू झाल्या आहेत किंवा होत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी महानगरांसह, शहरे, उपनगरे आणि ग्रामीण भागातही ठिकठिकाणी फटाक्‍यांपासून शोभेच्या वस्तूंपर्यंत विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल्स उभारलेले दिसत आहेत. त्यामध्ये भारतीय वस्तूंसह चीनी वस्तूंचाही समावेश आहे. एकाबाजूला ही परिस्थिती. तर दुसरीकडे भारत-पाकच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दररोज गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आपले सैनिक दहशतवाद्यांच्या आणि सीमेपलिकडून येणाऱ्या गोळ्या झेलत आहेत. भारतीयांचे संरक्षण करणारे आपले शूर जवान रात्रंदिवस पाकिस्तानी सैन्याला व दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. यामध्ये आपले काही जवान गोळीबारात जखमी होत असून, हुतात्माही होत आहेत. पाकिस्तानचा मित्र देश असलेल्या चीनच्या वस्तूंवर आपण पुर्णपणे बहिष्कार टाकल्यास आपला पैसा चीनमध्ये जाणार नाही. यामुळे चीनला काही प्रमाणात जरी आर्थिक फटका बसला तरी एक प्रकारे देश सेवाच होईल. प्रत्येकाने सीमेवर जाऊन लढाई करून, देशसेवा करण्याची गरज राहणार नाही. यासाठी आपले जवान पुरेसे आहेत. चीनमध्ये एलईडी, एलसीडी, शोभेचे दिवे, मोबाईल, फटाके, शोभेच्या माळा, खेळणी, संगणक, मातीची भांडी, पतंग व मांजे, रसायने, औषधे व कपड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. सण-उत्सवादरम्यान चीनी वस्तूंवर बहिष्कार अन्‌ स्वदेशीचा वापर करण्याचा प्रत्येकाने निर्धार करायला हवा. सोशल नेटवर्किंगवरून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची जोरदार मोहिम सुरू आहे. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आकडे सांगतात. शोभेच्या वस्तू असोत अथवा रोजच्या वापरातील वस्तू. चीनमधील उत्पादने विकत न घेण्याकडे ग्राहकांचाही कल दिसू लागला आहे. चीनमधील वस्तूंपेक्षा भारतीय वस्तूंना प्राधान्य मिळत आहे. ग्राहकांची मागणी पाहून विक्रेतेही जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देत असल्याचे चित्र बाजारात पहायला मिळत आहे. यामुळेच की काय दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चिनी वस्तूंची विक्री 40 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसारीत झाले आहे. परंतु, 40 टक्‍क्‍यांचा आकडा हा 100 टक्के झाल्यास प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. चीनी वस्तू म्हणजे "मेड इन चायना‘. या वस्तूंची खरेदी म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानला मदत करण्यासारखे किंवा आपल्याच पाठित खंजीर खुपासण्यासारखे आहे. यामुळे आपण सर्वांनी मिळून चीनी वस्तू खरेदी न करण्याची शपथ घेऊयात. पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवरील आक्रमण थांबवून देशसेवा करूयात.

No comments:

Post a Comment