Total Pageviews

Wednesday 29 August 2018

हिंदू दहशतवादी?SAMNA EDITORIAL

रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले व खटले अंगावर घेतले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झालीते सर्व लोक हिंदुत्ववादी म्हणून दहशतवादी ठरवले जाऊ नयेतइतकीच आमची अपेक्षा आहेपानसरेदाभोलकरांचे प्राण घेणारे कोणीही असोतत्यांना कठोर शासन व्हायलाच हवेफक्त नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका इतकेचकारण उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील.
काँग्रेस राजवटीत ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाने चांगलीच खळबळ माजवली होती. तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी हिंदू दहशतवादाची बांग दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने त्यावेळी संसदेत आणि रस्त्यावर थैमान घातले होते. आज काँग्रेसचे राज्य नाही. महाराष्ट्रात व दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राज्य असूनही ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचे ढोल बडवले जात आहेत व त्याबाबत सरकारने खुलासा करणे गरजेचे आहे. नालासोपारा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे मोठा शस्त्रसाठा सापडल्याचा दावा ‘एटीएस’ म्हणजे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने केला. त्यातून जे धागेदोरे मिळाले ते पुणे, मराठवाडा, घाटकोपरपर्यंत पोहोचले. ज्या लोकांना याप्रकरणी ताब्यात घेतले त्यांनीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला, त्याच पिस्तुलाने कर्नाटकात गौरी लंकेश, कलबुर्गी वगैरे लोकांना खतम केले आणि या मंडळींना पुणे, कल्याण वगैरे भागात बॉम्बस्फोट घडवायचे होते, असे आता एटीएसने न्यायालयास सांगितले आहे. पुण्यातील ‘सनबर्न’ फेस्टिव्हलही या हिंदुत्ववाद्यांना उधळायचा होता. जे जे हिंदू संस्कृतीविरोधात आहे ते ते या मंडळींना नष्ट करायचे होते व त्यांनी तशी सशस्त्र्ा पक्की तयारी केली असल्याचे निवेदन पोलिसांनी न्यायालयासमोर केले. हे सर्व लोक एकमेकांशी ‘कोडय़ा’त म्हणजे सांकेतिक भाषेत संवाद साधत होते असेही पोलिसांनी सांगितले आहे. अटकेत असलेले हे सर्व लोक सुशिक्षित व कामधंदा करणारे आहेत. यातील काही गोरक्षा मंडळाचे काम करीत व नालासोपारा, वसईतील गोमांसमाफियांना त्यांनी जेरीस आणले होते. घाटकोपरमध्ये पकडलेला तरुण हा सरकारी कर्मचारी आहे व तो शिवप्रेमी, दुर्गप्रेमी म्हणून या भागात काही कार्यक्रम राबवीत होता. जालना वगैरे भागातही धरपकडी करून हिंदुत्ववादी (‘दहशतवादी’) मंडळींचे
कंबरडे मोडल्याचे
बोलले जात आहे. ‘सनातन’ नामक संस्थेने पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी मंडळींचे खून केले व त्याबद्दल या संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मग तशी बंदी आधीच घालून सरकारने या सर्व मंडळींना जेरबंद का केले नाही, हा प्रश्न आहेच. आता जे लोक पकडले ते सर्व ‘सनातन’चे असल्याचे बोलले गेले, पण यापैकी एकही व्यक्ती आमची साधक नाही, असल्यास सिद्ध करा असे आव्हान ‘सनातन’च्याच मंडळींनी दिले आहे. त्यामुळे नेमके सत्य काय आहे याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले व सध्या तरी ‘एटीएस’ सांगेल तेच खरे असे मान्य करावे लागत आहे. पुन्हा या सर्व मंडळींना अनेक प्रमुख व्यक्तींना उडवायचे होते, असेही सांगितले जात आहे. आता या प्रमुख व्यक्ती कोण, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्याही जीवाला धोका आहे आणि तसा कट रचला जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याची संशयाची सुई माओवाद्यांकडे असल्याने माओवादी लोकांवर धाडी पडल्या. अर्थात माओवाद्यांकडे फक्त धमक्यांची पत्रे व कागदपत्रे सापडली, पण हिंदुत्ववाद्यांकडे मात्र बॉम्ब, बंदुका, स्फोटके सापडली. पुन्हा जे नक्षलवादी समर्थक मान्यवर आता पकडले गेले आहेत त्यांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे आणि अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख मात्र थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जात आहे. मुळात पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येमागे समान धागा आहे काय हे सिद्ध व्हायचे आहे. यापैकी प्रत्येक जण स्वतंत्र विचारांचा होता व हे सर्व लोक कम्युनिस्ट किंवा समाजवादी विचारसरणीचे होते. प्रत्येकाची हत्या हा स्वतंत्र कट असू शकतो. यापूर्वी समीर गायकवाड नामक तरुणास पानसरे हत्या प्रकरणात पकडण्यात आले. त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केले गेले. मग आता त्याच प्रकरणात हे
नवे लोक कसे
पकडले? दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात कोणी सारंग अकोलकर याचे नाव दिले आहे. मडगाव बॉम्बस्फोटातही त्याचे नाव संशयित म्हणून होते आणि तेव्हापासूनच तो ‘फरार’ घोषित आहे. मग आता पकडण्यात आलेले हे नवीन लोक कोण आहेत? हे सर्व लोक हिंदू दहशतवादी आहेत व त्यांना खतम केले पाहिजे असे सरकारने ठरवले आहे. कारवाई करताना डावे-उजवे पाहू नका, अशी मुख्यमंत्र्यांची पोलिसांना सक्त ताकीद आहे व ती योग्यच आहे. मुळात हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात, खासकरून मोदी-फडणवीस यांच्या राज्यात दहशतवादी बनावे लागत असेल तर कमालच म्हणावी लागेल. मग कश्मीर खोऱयातून ज्या हिंदूंना पलायन करावे लागले त्यांनीही हाती शस्त्र घ्यायला हवे होते. तरच ते टिकले असते, पण त्यांना दहशतवादी बनायचे नव्हते. हिंदूंची मानसिकता ही अशी आहे. रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले व खटले अंगावर घेतले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झाली. ते सर्व लोक हिंदुत्ववादी म्हणून दहशतवादी ठरवले जाऊ नयेत इतकीच आमची अपेक्षा आहे. गुजरात दंगलीतील एक आरोपी अमित शहा यांना हिंदुत्वाच्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला व ते आता राष्ट्रीय नेते बनले. म्हणजे हिंदुत्ववाद हा दहशतवाद किंवा कलंक नाही. शमीच्या झाडावरील शस्त्र देखील तो 14 वर्षे काढत नाही तिथे ही मिसरूड फुटलेली पोरे शस्त्र्ासाठा जमवतील काय? अर्थात पोलिसांनी कसून तपास करायला हवा. पानसरे, दाभोलकरांचे प्राण घेणारे कोणीही असोत, त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. फक्त नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका इतकेच आमचे सांगणे आहे. कारण उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील.
LOSATTA COMMENTS
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अटकेप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेत आता शिवसेनेने उडी घेतली आहे. सर्वच हिंदुत्ववादी लोकांना दहशतवादी ठरवले जाऊ नये, पानसरे, दाभोलकरांची हत्या करणारे कोणीही असोत, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका, असे म्हणत सनातन संस्थेचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील, अशी भीती व्यक्त करत नक्षलवादी समर्थकांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे. पण अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जातो असेही सेनेने म्हटले आहे.
रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झाल्याची टीका त्यांनी केली. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने हिंदुत्ववादी संघटनांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केले. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे राज्य असतानाही हिंदू दहशतवादाचे ढोल बडवले जात आहेत. याचा सरकारने खुलासे करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.

काय म्हटलंय शिवसेनेने…
* काँग्रेस राजवटीत तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचा उच्चार केला. आता राज्यात आणि केंद्रात भाजपाचे राज्य असतानाही हिंदू दहशतवादाचे ढोल बडवले जात आहेत. याबाबत सरकारने खुलासे करण्याची गरज पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका आहे म्हणून माओवाद्यांना अटक केली जाते. त्यांच्याकडे फक्त धमक्यांची पत्रे, कागदपत्रे सापडली. पण हिंदुत्ववाद्यांकडे बॉम्ब, बंदुका, स्फोटके सापडली. नक्षलवादी समर्थकांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे. पण अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जात आहे.
* सर्व लोक हिंदुत्ववादी म्हणून दहशतवादी ठरवले जाऊ नयेत इतकीच आमची अपेक्षा आहे. गुजरात दंगलीतील एक आरोपी अमित शहा यांना हिंदुत्वाच्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला व ते आता राष्ट्रीय नेते बनले. म्हणजे हिंदुत्ववाद हा दहशतवाद किंवा कलंक नाही.
* हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात, खासकरून मोदी-फडणवीस यांच्या राज्यात दहशतवादी बनावे लागत असेल तर कमालच म्हणावी लागेल. मग कश्मीर खोऱयातून ज्या हिंदूंना पलायन करावे लागले त्यांनीही हाती शस्त्र घ्यायला हवे होते. तरच ते टिकले असते, पण त्यांना दहशतवादी बनायचे नव्हते. हिंदूंची मानसिकता ही अशी आहे

No comments:

Post a Comment