Total Pageviews

Sunday 26 August 2018

भडकवणारे आणि भडकणारे प्रभात वृत्तसेवा नीलिमा पवार



त्या दिवशी आमचे दादाकाका आमच्याकडे आले, ते एकदम बेचैन होऊन. चेहरा रागाने लालबुंद झाला होता. हात पाय नुुसते थरथरत होते, शब्द सुचत नव्हते, आले आणि धपकन बसले खुर्चीत. बराच वेळ एक अक्षरही बोलले नाहीत. दादाकाका हे तसे आमच्या नात्यातलेच. माझ्या वडिलांचे मावस भाऊ. आमच्याच वाड्यात राहतात. अगदी सज्जन, परोपकारी माणूस. दुसऱ्यासाठी जिवाला त्रास करून घेणार. मी त्यांच्या हाती पाण्याचा ग्लास दिला आणि हळूच विचारले, दादाकाका, चहा घेणार नात्यांनी कापऱ्या हातांनी पाण्याचा ग्लास घेत्ला. एका दमात तो रिकामा केला. खिशातून रुमाल काढून कपाळ टिपले आणि म्हणाले, कर बाळा अर्धा कप चहा कर.
मी त्यांना लागतो तसा अगोड चहा केला आणि त्यांच्या हातात दिला. बाबासाहेबानी वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. पण अजून ते ऍक्‍टिव्ह आहेत. उत्साही आहेत. त्यांनी प्रकृती चांगली ठेवली आहे. अगदी लहानपणापासूनच खाण्यापिण्यातला नियमितपणा आणि नित्याचे खेळणे-फिरणे, हलकाफुलका व्यायाम यामुळे आपली प्रकृती चांगली आहे असे ते म्हणतात.
चहा घेतल्यानंतर त्यांचे मन जरा शांत झाले. काय झाले दादाकाका? मी विचारले. आज फारच प्रक्षुब्ध दिसत आहात.
काय सांगू मुली, ते म्हणाले. आमच्या शेजारचा रम्या. त्याला गाढवाला नेला ना पोलीसांनी पकडून. त्याची आई बिचारी एकटी घरात. घाबरली. आली रडता ओरडत मदतीसाठी. तिच्यासाठी आम्ही वाड्यातील दोघेचौघे गेलो पोलीस स्टेशनला. त्याला सोडवायला . का? काय केले त्याने? मी विचारले.
मूर्ख आहे. गेला होता कोणत्यातरी आंदोलनात. मित्र चल म्हणाले, हा गेला. देणे नाही घेणे नाही. उगाच डोक्‍याला व्याप. इतरांचे पाहून यानेही रस्त्यातून जाताना वाहनांची मोडतोड केली, दुकानाच्या काचा फोडल्या. बाकी सारे पळाले. हा सापडला. राहिला असता आत चारआठ दिवस. तो अधिकारी चांगला होता. म्हणून केवळ वॉर्निंग देऊन सोडले त्याने आमच्याकडे बघून.
मी म्हणतो, माणसाला स्वत:ची अक्कल हवी की नके? ते तावातावाने म्हणाले.
भडकवणारे भडकवतात आणि ही मुले भडकतात. विचार न करता वाटेल ते करतात. भडकवणरांचे काय जाते? तावातावाने बोलले, चार शिव्या घातल्या की यांना चेव येतो, पण भडकवणाऱ्यांची मुलेबाळे कधी असल्या फंदात पडत नाहीत. पडतात का?
मी ऐकत होते. त्यांचेम्हणणे रास्त होते. आजकाल सगळीकडे विविध कारणांनी मोर्चे निघतात , आंदोलने होतात, त्यात सार्वजनिक संपत्तीची खासगीे संपतीची हानी होते. पोलीस समोर दिसेल त्यांना पकडून नेतात्‌; जे अट्टल असतात ते पळतात आणि हे नवखे भडक डोक्‍याचे सापडतात. ना त्यांना घरच्याचा विचार ना आपल्या भविष्याचा. चांगला अभ्यास करायचा. शिकायचे. मोठे व्हायचे, तर हे नको ते उद्योग करतात. तुम्हाला मोर्चे काढायचे,आंदोलन करायचे तर करा. नको कोण म्हणते?. पण हे दंगेधोपे,मोडतोड कशाला।शेवटी राष्ट्रचे नुकसान आणि आपल्याला त्र्रास कसे म्हणतेस?
बरोबर. मी म्हटले.
जे तुला मला कळते, ते या मुलांना कळत नाही, राष्ट्रचे भावी आधारस्तंभ हे आणि आताच खिळखिळे होतात, भडकवणाराने कितीही भडकवले, तरी आपण किती लक्ष द्यायचे एवढी अक्कल पाहिजेना? ते म्हणाले. जाऊद्या दादाकाका, एका अनुभवने होईल शाहणा. मी म्हटले. माझीही तीच अपेक्षा आहे, पण तसे होताना दिसत नाही हेच दु:ख आहे. ते म्हणले आणि उठून चालू लागले. त्यांच्या थकल्याभागल्या आकृतीकडे मी खिन्नपणे बघत राहिले.


No comments:

Post a Comment