Total Pageviews

Saturday 3 March 2018

इतिहास रचणारा 'कार्यकर्ता'- सुनील देवधर- महा एमटीबी


२०१३ मध्ये शून्य जागा आणि दीड टक्के मतं एवढीच काय ती शिदोरी पदराशी असलेल्या भाजपने त्यापुढील निवडणुकीत ३५ जागा आणि ४२ टक्के मतं मिळवत त्रिपुरात स्वबळावर सरकार स्थापन करावं ही देशाच्या राजकीय इतिहासातील एक थक्क करणारी घटना म्हणावी लागेल. या निवडणुकीची आणि निकालाची आज दिवसभर चर्चा सुरू असताना या सगळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे भाजपच्या या प्रचंड विजयाचा शिल्पकार सुनील देवधरनामक एक मुंबईकर ठरला आहे. ज्या सुनील देवधरांची मोदींनी महाराष्ट्रातून पाठवलेला सुभेदारअशी हेटाळणी खुद्द माणिक सरकार यांच्यासह अनेकांनी केली त्याच महाराष्ट्राच्या सुभेदाराने अवघ्या तीन-साडेतीन वर्षांतच त्रिपुरातील लाल बुरुज उध्वस्त करत तिथे भाजपचं कमळ फुलवण्यात यश मिळवत सर्वांनाच थक्क केलं आहे..

ते वर्ष होतं २०१३. पूर्वोत्तर भारतात एका कोपऱ्यात वसलेल्या त्रिपुरा राज्याच्या विधानसभेची निवडणूक झाली. त्रिपुरात साधारण वीस वर्षं सलगपणे व निर्विवादपणे सत्ता गाजवणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा तितक्याच पाशवी बहुमतासह सत्ता मिळवली. तसंच १९९८ पासून सलगपणे मुख्यमंत्रीपद भूषवणारे आणि राज्यावर मजबूत पोलादी पकड असणारे माणिक सरकारपुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्रिपुरा विधानसभेच्या एकूण ६० जागांपैकी माकपला जागा मिळाल्या ४९ तर मतांची टक्केवारी होती ४८.१. देशभरात मोदी लाटतयार होण्याचा तो काळ असताना त्रिपुरात मात्र भाजपला जागा मिळाली शून्य आणि मतांची टक्केवारी होती अवघी १.५. याच्या नंतर लगेचच, म्हणजे २०१८ मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला जागा मिळाल्या आहेत १६ तर भाजपला ३५. २०१३ मध्ये शून्य जागा आणि दीड टक्के मतं एवढीच काय ती शिदोरी पदराशी असलेल्या भाजपने त्यापुढील निवडणुकीत ३५ जागा आणि ४२ टक्के मतं मिळवत त्रिपुरात स्वबळावर सरकार स्थापन करावं ही देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाची घटना म्हणावी लागेल. या निवडणुकीची आणि निकालाची आज दिवसभर चर्चा सुरू असताना या सगळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे भाजपच्या या प्रचंड विजयाचा शिल्पकार सुनील देवधरनामक एक मुंबईकर ठरला आहे. ज्या सुनील देवधरांची मोदींनी महाराष्ट्रातून पाठवलेला सुभेदारअशी हेटाळणी खुद्द माणिक सरकार यांच्यासह अनेकांनी केली त्याच महाराष्ट्राच्या सुभेदाराने अवघ्या तीन-साडेतीन वर्षांतच त्रिपुरातील लाल बुरुज उध्वस्त करत तिथे भाजपचं कमळ फुलवण्यात यश मिळवत सर्वांनाच थक्क केलं आहे.

ज्या त्रिपुराची कम्युनिस्टांचा बालेकिल्ला अशी ओळख, जिथे पंचवीस वर्षांची अव्याहत आणि अनिर्बंध सत्ता, जिथे कम्युनिस्टांचं तळागाळात रुजलेलं पक्षसंघटन, जिथे कम्युनिस्टांच्या विरोधात ब्र काढण्याचीही हिम्मत कुणी करू धजत नाही आणि ती हिम्मत केल्यास ती व्यक्ती जिवंत घरी परत जाईल की नाही याची शाश्वती नाही, अशा त्रिपुरात सुनील देवधर नामक एक सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला, दूर महाराष्ट्रातून आलेला, पेशाने शिक्षक असलेला आणि दहा-पंधरा वर्षं रा. स्व. संघाचा प्रचारक राहिलेला माणूस त्रिपुरामध्ये २०१४ मध्ये भाजप प्रभारीम्हणून येतो काय, आणि २०१८ पर्यंत कम्युनिस्टांना उध्वस्त करत त्रिपुरातील राजकीय संदर्भच बदलून टाकतो काय.. सबंध देशालाच विचार करायला लावणारी ही घटना आहे. सध्या वय वर्षं ५३ असलेले सुनील देवधर मुंबई विद्यापीठातून एम. एस्सी. (रसायनशास्त्र) आणि बी. एड. करून १९९१ च्या सुमारास संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले आणि थेट मेघालयात पोहोचले. देवधर आणि ईशान्य/पूर्वोत्तर भारत हे समीकरण तेव्हापासूनच दृढ होत गेलं असावं. दहा-अकरा वर्षं प्रचारक म्हणून काम केल्यानंतर देवधर पुन्हा मुंबईत परतले मात्र सामाजिक काम चालूच ठेवत त्यांनी माय होम इंडियासारखी सामाजिक संस्था उभी केली. राजकीय जीवनातही त्यांचा ईशान्य भारताशी असलेला संबंध कधीच तुटला नाही. भाजपच्या ईशान्य भारत संपर्क सेलची जबाबदारी सांभाळत असतानाच दुसरीकडे निवडणुकीदरम्यानच्या पक्षाच्या संघटनात्मक कामांमध्येही देवधरांचा महत्वाचा सहभाग होता. गुजरात (२०१२), गोवा (२०१२), दिल्ली (२०१३), महाराष्ट्र (२०१४) आदी प्रदेशांतील निवडणुकांमध्ये पक्षाची संघटनात्मक बाजू यशस्वीपणे सांभाळणाऱ्या देवधरांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खुद्द नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचे प्रचार व्यवस्थाप्रमुख जबाबदारी सांभाळली. यातून संघटनात्मक कामावरील त्यांची पकड, कामाचा आवाका लक्षात आल्यावर २०१४ मध्येच त्यांची रवानगी पुन्हा एकदा पूर्वोत्तर भारतात करण्यात आली. डाव्यांचा बालेकिल्ला त्रिपुराचं खडतर आव्हान स्वीकारत देवधर त्रिपुरात पोहोचले आणि त्यांनी अक्षरशः शून्यातून सुरूवात केली. तीन-साडेतीन वर्षांत रात्रीचा दिवस करत, सबंध त्रिपुरा पिंजून काढत राज्यात भाजपची संघटनाउभी केली. देवधरांच्या या संघटनेनं पुढे काय करून दाखवलं, हे आज जाहीर झालेल्या निकालातून स्पष्टपणे दिसतं आहे.

अर्थात, 'तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं', इतकी ही वाटचाल सोपी नक्कीच नव्हती. मुळात संघटना शून्यातून उभी करणं, तिच्यापुढे ठाम कार्यक्रम देणं आणि तिला सक्रीय करणं, कम्युनिस्टांचा स्थायीभाव असलेल्या हिंसक आणि विकृत हल्ल्यांना तोंड देत, कार्यकर्त्यांना हिम्मत देत संघटना जागी ठेवणं, आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं अतिशय अपुऱ्या साधनांनिशी करणं, हे आव्हान देवधरांना पार करावं लागलं. मुख्यमंत्री माणिक सरकार यांची त्रिपुराबाहेर उर्वरित देशभरात असलेली सोज्वळ, सात्विक प्रतिमा आणि प्रत्यक्ष राज्यात त्यांची व त्यांच्या पक्षाची भलतीच भ्रष्ट, जुलुमी राजवट हा एक मोठा अडथळा होता. जनतेमध्ये कम्युनिस्टांविषयी असंतोष होताच पण तळागाळापर्यंत पोहोचलेल्या कम्युनिस्टांच्या भीतीपोटी तो व्यक्त होत नव्हता. माणिक सरकार यांच्या राजवटीचा सोज्वळ बुरखा टराटरा फाडून टाकत असतानाच सुनील देवधरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा विकासात्मक अजेंडा जनतेसमोर ठेवत आता त्यांना नवा पर्याय उपलब्ध असल्याचा विश्वास दिला. त्रिपुरातील स्थानिक जनजाती आणि स्थलांतरित बंगाली समाज यांच्यातील दरी हा एक फार मोठा प्रश्न होता. दिल्लीत आणि पुण्या-मुंबईत आदिवासींच्या हिताच्या बाता करणाऱ्या कम्युनिस्टांनी प्रत्यक्ष त्रिपुरात मात्र जनजातींची मुस्कटदाबी करून बंगाली समाजाची उघडउघड बाजू घेण्याचीच भूमिका आजवर घेतली. दुसरीकडे मोदींच्या विकासात्मक प्रतिमेला जनतेपर्यंत पोहोचवत देवधरांनी बंगाली आणि जनजातींमधील दरी सांधण्यात बरंच यश मिळवलं. एकीकडे कम्युनिस्ट नेते मोदींनी महाराष्ट्रातून पाठवलेला सुभेदारम्हणून देवधरांची निर्भत्सना करत होते, भाजपच्या उभ्या राहू पाहणाऱ्या संघटनेवर हल्ले चढवत होते, दुसरीकडे देवधर एक स्कॉर्पिओ गाडी घेऊन दोन-चार कार्यकर्त्यांसह त्रिपुराचा कानाकोपरा, वस्त्या-पाडे पिंजून काढत होते, स्थानिक लोकांसोबत त्यांच्या स्थानिक भाषांमधून, बंगाली, कोकबोरोक भाषांमधून संवाद साधत होते. त्यामुळे आमच्या जनजातीची भाषा बोलणारा’, ‘आमच्यासह एका ताटात जेवणाराआणि आमच्यासोबत हिंडणारा-फिरणाराहा महाराष्ट्रातील सुभेदारत्रिपुरावासियांना भलताच भावला. या खडतर तपश्चर्येनंतरच या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या चलो पलटाईच्या हाकेला त्रिपुरावासियांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या निकालानंतर सुनील देवधरांनी यह तो केवल भारतीय जनता पार्टी के संघटन और संघटनका ही श्रेय हैअशी दिलेली प्रतिक्रियाही कमालीची सूचक आहे. देवधरांना ज्या परिवाराची, ज्या विचारांची आणि ज्या आचारांची पार्श्वभूमी आहे तिथे ही अशीच माणसं घडतात. संघटनेसाठी एक विचार आणि ध्यास घेऊन स्वतःला झोकून देणारी. त्रिपुरामध्ये तर कमळ फुललं. आता सुनील देवधर नामक व्यक्ती पुन्हा कदाचित एखादं नवं आव्हान घेऊन अन्य एखाद्या राज्यात जाईल. तिथेही असंच झोकून देऊन संघटनेला उभं करेल, आणि पुन्हा इदं न ममम्हणत पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ होईल. मात्र, त्रिपुरासारखी उदाहरणं देशाच्या राजकीय इतिहासात एक थक्क करणारा प्रवासम्हणून कायमस्वरूपी नोंदवली जातील.

No comments:

Post a Comment