Total Pageviews

Thursday 11 April 2019

डॉ. विजय प्रल्हाद देव-RIP

राज्यशास्त्राचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक आणि स.प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय प्रल्हाद देव (78) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर यांचे जावई आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते वडील होत. विजय देव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्यशास्त्राचे अभ्यासक, लेखक म्हणून डॉ. देव परिचित होते. स.प. महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे 35 वर्षे अध्यापन केले. दोन वर्षे प्राचार्य पद भूषवून ते निवृत्त झाले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. दरम्यान, विजय देव यांनी आयुष्यभर सरस्वतीची सेवा केली, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लौकिक अर्थाने ते एक शिक्षक, राज्यशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक. पण या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करता करता ते समाजाच्या विविध अंतरंगात कधी शिरले आणि त्यातून त्यांनी विविध कार्याचे बंध कधी विणले हे त्यांनाही ठाऊक नसेल. शिक्षक, लेखक, व्याख्याते, साहित्य अभिवाचनाची संस्कृती रुजवणारे कलाकार, योगविद्येचे पुरस्कर्ते, संवेदनशील मन असलेले निसर्गभटके आणि उत्तम समाज संघटक अशी चतुरस्र ओळख असलेल्या डॉ. विजय प्रल्हाद देव यांचे काल निधन झाले. त्यांचे निधन हे त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांपासून ते त्यांनी जोडलेल्या सर्वदूर समाजापर्यंत साऱ्यांना चटका लावून गेले, ते त्यांच्या या बहुविध गुणवैशिष्टय़ांमुळे.
राज्यशास्त्र विषयात डॉ. देव यांचे नाव आदराने घेतले जाते. विद्यार्थी आणि समाजाभिमुख शिक्षणाच्या त्यांच्या हातोटीतून तयार झालेले शेकडो विद्यार्थी आज भारतीय प्रशासकीय सेवांमधील उच्च पदांपासून ते राजकीय पटलावरील चारित्र्यसंपन्न नेतृत्वापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. राज्यशास्त्राचा शोध घेतानाच त्यांनी लिहिलेले सुबोध राज्यशास्त्र, पाश्चात्त्य राजकीय विचारवंत, राजकीय विश्लेषण कोश, राजकीय संकल्पना व सिद्धान्त, आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत हे ग्रंथ आज या विषयात मैलाचे दगड ठरले आहेत. त्यांनी लिहिलेला ‘राज्यजिज्ञासा’ हा संशोधनात्मक ग्रंथ तर आजच्या राजकीय इतिहासापासून ते वर्तमानातील वाटचालीपर्यंत असा विस्तृत पटाचा वेध घेतो. त्यांनी नुकताच लिहिलेला ‘कौटिल्याच्या यथार्थ तुलनेत मॅकिएव्हेली’ हा ग्रंथ दोन थोर राजकीय विचारवंतांच्या विचारांमधील साम्य आणि फरकावरील चर्चा घडवतो.
गेल्या काही वर्षांपासून सह्य़ाद्री आणि छत्रपती शिवराय हे त्यांचे अभ्यासाचे आणि कुतूहलाचे विषय बनले होते. त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी रुजवलेल्या दुर्गभ्रमण चळवळीला अधिक व्यापक रूप देण्यासाठी डॉ. देव यांच्या पुढाकारातून गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाची स्थापना झाली. आमच्याकडे वाचन संस्कृती मोठय़ा प्रमाणात रुजलेली आहे. पण हे कसदार साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी डॉ. देव यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत विविध साहित्यकृतींच्या अभिवाचनाची नवसंस्कृती या मातीत रुजवली. देव हे हाडाचे योगविद्येचे विद्यार्थी. या कलेच्या प्रसारासाठीही त्यांनी मोठे काम केले. विविध सामाजिक संस्था आणि कार्याचे ते आधारस्तंभ होते. सतत नावीन्याचा शोध घेण्याची, त्यातून माणसे जोडण्याची अंगी वृत्ती. त्यांचा कामाचा हा झपाटा एखाद्या तरुणाला लाजवेल असा होता

No comments:

Post a Comment