Total Pageviews

Thursday 4 September 2014

LOVE JIHAD IN INDIA-BALBIR PUNJ MEMBER PARLIMENT

‘‘जगाच्या दृष्टीने नजरेत तू भलेही माझी पत्नी असशील, पण माझ्या दृष्टीने तू अद्यापही माझी पत्नी झालेली नाही. जोपर्यंत तू तीन वेळेस ‘मुझे कबूल है, कबूल है, कबूल है’ असे म्हणत नाही.’’ हिंदू रीतिरिवाजानुसार एक हिंदू मुलगी विवाह करून जेव्हा पहिल्यांदाच सासरी गेली आणि त्याचवेळी जर तिला समजले की ज्या मुलाने स्वत:ला हिंदू असल्याचे सांगून तिच्याशी विवाह केला आहे, तो वास्तवात मुसलमान आहे, तर त्या मुलीची अवस्था कशी होईल? प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून सुंदर व सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने रंगवून ज्याच्या हवाली तिने जीवनाची सारी सूत्रे सोपविली, तोच तिने इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून मधुचंद्राच्या दिवशी तिचा छळ करीत असेल, तर यापेक्षाही भयंकर आणखी काय असू शकेल? काही दिवसांपूर्वी झारखंडची राजधानी रांची येथे असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. राष्ट्रीय रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकवलेली तारा शाहदेवने स्वप्नातही विचार केला नसेल की, ज्या व्यक्तीसोबत आपला विवाह होत आहे, तो वास्तवात इस्लामी कट्टरपंथीयांकडून चालविण्यात येणार्‍या ‘लव्ह जिहाद’चा भागीदार आहे. स्वत:ला जगासमोर रंजितकुमार कोहली म्हणविणार्‍या ज्या व्यक्तीसोबत ताराने विवाह केला, तो वास्तवात रकीबुल हसन निघाला. प्रथम तर ताराला या प्रकरणाची हवाही लागली नाही. तिने विचार केला, आता जर विवाह केलाच आहे तर ‘कबूल है’ असे म्हणण्यात काय अडचण आहे? तिने ‘कबूल है’ असे तीन वेळा म्हटले. दुसर्‍याच क्षणी जेव्हा तिच्या हाती कुराण थोपवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले, तेव्हाच आपल्याशी मोठा विश्‍वासघात झाल्याचे तिला कळले. रकीबुलने, पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून पहिल्याच दिवसापासून तिचा छळ करणे सुरू केले. तिचे तारा हे नाव बदलवून ‘सारा’ असे ठेवण्यात आले. ताराने धर्मपरिवर्तन करण्यास नकार दिल्याने रकीबुल आणि त्याच्या आईने तिला मारहाण केली, तिला उपाशी ठेवले. तिला दहशतीत ठेवण्यासाठी तिच्यावर कुत्रे सोडण्यात आले. ताराला कोंडून ठेवण्यात येत होते आणि माहेरच्यांशी बोलण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. ताराचा मोबाईल रकीबुलने हिसकावून घेतला होता. तिच्या शरीरावर सिगारेटने चटके दिल्याच्या खुणा आहेत. तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले. तिला पुन्हा नेमबाजी करता येऊ नये म्हणून तिचा पाठीचा कणा तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आज ती व्यवस्थित चालूही शकत नाही. याविषयी कुठे वाच्यता केल्यास तुझ्या संपूर्ण कुटुंबालाच संपविण्यात येईल, अशी धमकी ताराला देण्यात आली होती. त्यामुळेच तिने बर्‍याच दिवसांपर्यंत तोंड बंद ठेवून छळ सहन केला. अखेर रकीबुलच्या अनुपस्थितीत तिने मोलकरणीच्या हातून आपल्या कुटुंबीयांकडे निरोप पाठविला, त्यानंतरच तिला मोकळा श्‍वास घेता आला. प्रकरणाचा भंडाफोड होताच रकीबुल आपल्या आईसह फरार झाला. पण, पोलिसांनी त्यांना शोधलेच. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी रकीबुलच्या तीन घरांना सील ठोकले आहे. ही घरे २०-२० हजार रुपये प्रतिमहिना भाड्याने घेण्यात आली होती. रकीबुलची अर्ध्या डझनहून अधिक वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेची मीडियात चर्चा तर झाली. मात्र, कुणीही मूलभूत प्रश्‍न उपस्थित करण्याची तसदी घेतली नाही. काही दिवसांपासून पश्‍चिम उत्तरप्रदेश ‘लव्ह जिहाद’च्या मानसिकतेमुळे दंगलींच्या सावटाखाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटना सहजतेने घेतल्या असून ‘कुणाला प्रेम करण्यापासून कसे रोखणार?’ असा साळसूद सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे मल्टिकम्युनल व सेक्युलॅरिस्टांचे तर्कट आहे की ‘लव्ह जिहाद’ म्हणजे मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी संघपरिवाराचे सुनियोजित कारस्थान आहे. येथे हा प्रश्‍न उपस्थित होतो की, केवळ हिंदू मुलीच मुसलमान मुलांच्या प्रेमपाशात का अडकत आहेत? जर विवाह दोन मनांचा संगम असेल, तर केवळ हिंदू मुलींना धर्मांतर करण्यास का भाग पाडले जाते? मुसलमान मुले धर्मांतर करून आपल्या प्रेमाचा दाखला का देत नाहीत? वास्तविकता तर या सेक्युलर तर्कटाच्या अगदीच विरुद्ध आहे. जेव्हा केव्हा मुस्लिम मुली हिंदू मुलांशी विवाह करतात, तेव्हा मुस्लिम समाजातील कट्टरपंथी लोक रस्त्यावर उतरून अक्षरश: हैदोस घालतात. तर दुसरीकडे हिंदू मुलीने मुसलमानाशी लग्न केल्यास आनंद मनविण्यात येतो? याउलट मुस्लिम युवती आणि हिंदू मुलगा यांच्यातील प्रेमसंबंध आणि विवाहावर आधारित ‘बॉम्बे’ चित्रपटाचा काय परिणाम झाला? तेव्हाही मुस्लिम कट्टरवाद्यांनी प्रचंड गदारोळ माजविला होता. कित्येक ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन त्यांनी होऊ दिले नव्हते. ऑगस्ट २००९ मध्ये मुस्लिमबहुल काश्मीर खोर्‍यातील अमीना यसुफ नावाच्या मुस्लिम युवतीने जम्मूचा हिंदू मुलगा रजनीश शर्माशी विवाह केला होता. जम्मूच्या आर्यसमाज मंदिरात दोघांचा विवाह झाला आणि अमीनाने स्वेच्छेने हिंदू धर्माचा स्वीकार करून आपले नाव ‘आंचल’ असे ठेवले. अमीनाच्या ‘रखवालदार’ वडिलांना ही बाब झोंबली आणि पोलिस कोठडीत रजनीशची हत्या झाली. खुद्द अमीनाने तेव्हा पत्रकारांसमोर हा आरोप केला की, जर रजनीशने धर्मपरिवर्तन केले असते तर माझे वडील माझ्या ‘निकाह’मध्ये आनंदाने नाचले असते आणि त्यांनी लाडू वाटले असते. ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा सेक्युलॅरिस्ट मान्य करीत नाहीत. पण, वस्तुस्थिती ही आहे की केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, झारखंड, उत्तरप्रदेश येथे ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी जाहीरपणे म्हटले होते की, संपूर्ण केरळचे इस्लामीकरण करण्याचे कारस्थान सुरू आहे. तेथे सुनियोजित पद्धतीने हिंदू मुलींसोबत मुस्लिम मुलांचा निकाह लावून देण्याचे कारस्थान सुरू आहे. डिसेंबर २००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केटी शंकरन यांनी ‘लव्ह जिहाद’ वर अतिशय कठोर टिप्पणी करीत म्हटले होते, ‘असे संकेत मिळत आहेत की प्रेमाच्या आडून जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचे कारस्थान सुरू आहे. विश्‍वासघात आणि फसवणूक करून करण्यात आलेल्या धर्मपरिवर्तनास कदापि मान्यता दिली जाऊ शकत नाही.’ याच्याही फार पूर्वी सन २००६ मध्ये लखनौ खंडपीठानेही तत्कालीन राज्य सरकारला विचारणा केली होती की, केवळ हिंदू मुलीच इस्लामचा स्वीकार का करीत आहेत. निकाहसाठी मुस्लिम मुले आपला धर्म का बदलत नाहीत? न्या. राकेश शर्मा यांनी तेव्हा टिप्पणी केली होती, ‘‘न्यायालयासमोर सातत्याने अशी प्रकरणे येत आहेत, ज्यात हिंदू मुलींनी इस्लामचा स्वीकार केल्यानंतर त्यांचा निकाह मुस्लिम मुलांशी करून देण्यात येतो. मात्र, विवाहानंतर या मुलींचा कुठेही ठावठिकाणा लागत नाही.’’ न्यायालयांनी केलेल्या या टिप्पणीला सेक्युलॅरिस्ट व मल्टिकम्युनल नाकारू शकतील काय? ‘लव्ह जिहाद’साठी सीमेपलीकडील जिहादी संघटनांकडून कॉलेजमध्ये जाणार्‍या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुस्लिम मुलांना अधिकृतपणे नियुक्त केले जाते. आकर्षक, स्मार्ट दिसणार्‍या अशा मुस्लिम मुलांच्या हायफाय व खर्चीक राहणीमानाचा संपूर्ण भार संघटना आपल्या शिरावर घेते. अशा मुलांना श्रीमंत घराचा वारस दर्शविण्यासाठी त्यांना कार, मोटारसायकल, महागडे मोबाईल्स इत्यादी उपलब्ध करून देण्यात येतात. रकीबुलला कुठून पैसा मिळत होता याची झारखंड सरकारने अवश्य चौकशी केली पाहिजे. ‘लव्ह जिहाद’ च्या अंतर्गत हिंदू युवतींशी निकाह केल्यानंतर या मुलांचा खरा चेहरा पुढे येतो. अशा मुलींना बाहेरच्या जगाशी संपर्क साधू दिला जात नाही. त्यांचा बहुतांश वेळ दहशतवाद, जिहाद आणि शेवटी त्याद्वारे इस्लामचे गुणगान करणारे व्हिडीओ किंवा पत्रके, पुस्तके पाहण्यात-वाचण्यातच खर्च होतो. हा सर्व त्यांना जिहादी बनविण्याच्या आणि आत्मघाती मानवी बॉम्ब बनविण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग आहे. अगदी आजपर्यंत बहुतांश मुस्लिम युवक धार्मिक विखार व कट्टरवादी वृत्तीमुळे हिंदू युवतींशी प्रेमविवाह करीत होते आणि या ‘पवित्र’ कार्यात त्यांना बहुतेक वेळा त्यांच्या कुटुंबीयांचेही सहकार्य लाभत होते. कारण एक काफीर ‘मोमिन’ झाली. आता या धार्मिक विखाराला ‘जिहाद’चे अस्त्र बनविण्यात आले आहे. - बलबीर पुंज

No comments:

Post a Comment