Total Pageviews

Saturday 10 January 2015

दहशतवाद्यांपासून संरक्षण : प्रतिबंध आणि उपाय -ब्रिगेडियर हेमंत महाजन

दहशतवाद्यांपासून संरक्षण : प्रतिबंध आणि उपाय तारीख: 11 Jan 2015 00:55:41 राष्ट्ररक्षा मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था, ब्रिटिश गुप्तचर संस्था आणि भारतीय गुप्तचर संस्था यांना होती, अशा प्रकारचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. माहिती असूनही आपल्याला हा हल्ला का थांबवता आला नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिरेकी हल्ल्यांबाबतची ढोबळ स्वरूपातील माहिती गुप्तचर संस्था आपल्या सुरक्षा संस्थांना देत असतात. उदाहरणार्थ, २०१३ मध्ये १२० हून जास्त वेळा गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली होती. पण २०१३ मध्ये मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. मंदिरांवर, रेल्वे स्टेशनवर वा इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले होणार असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणा पुन्हा पुन्हा वर्तवत असतात. परंतु त्याबाबतची नेमकी आणि अचूक माहिती, वेळ दिली जात नाही. आज दहशतवाद्यांना मोठ्या शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी लाखो टार्गेट मिळू शकतात. प्रश्‍न असा उद्भवतो की, अशा प्रकारच्या टार्गेटचे आपण रक्षण कसे करायचे? अचूक माहिती, गुप्तवार्ता मिळणे आवश्यक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या हल्ल्यांबाबतची अचूक माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळणे आवश्यक आहे. एखाद्या शहरात कुठेतरी, केव्हा तरी, कधीतरी हल्ला होणार आहे किंवा मुंबईवर समुद्रातून हल्ला होणार आहे, अशी गुप्तहेर माहिती मिळण्याऐवजी जर आपल्याला मुंबईच्या व्हीटी भागामध्ये उद्या सकाळी दहा वाजता दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती मिळाली तरच अशा प्रकारच्या हल्ल्यापासून आपल्याला सरंक्षण करता येते. जुजबी वा ढोबळ मानाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर या टार्गेटचे रक्षण करणे कठीण असते. नेमके हेच पेशावरमध्ये तहरीक-ए-तालिबानने केलेल्या हल्ल्याबाबत झाले. हा हल्ला पेशावरमध्ये सैनिकी भागात झाला आणि तोही लष्कराने चालवलेल्या एका शाळेवर. सैनिकी शाळाच जर असुरक्षित असतील तर बाकीच्या शाळांची सुरक्षा कशी असेल? आज कुठल्याही शहरामध्ये हजारो शाळा आहेत. यांना सुरक्षा कशी द्यायची हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व शाळांनी आपल्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु याबाबत नेमके काय करायला पाहिजे? पहिले शाळांभोवती कंपाऊंड भिंत बांधली पाहिजे. शाळेमध्ये प्रवेश करण्याकरिता एक किंवा दोन गेटच ठेवले आणि या प्रवेशद्वारांवर खाजगी सुरक्षा रक्षकांना नेमून येणार्‍या-जाणार्‍यांवर लक्ष ठेवले गेले तर शाळा सुरक्षित राहू शकतील. दुसरे आपल्याकडील शाळांचे स्थान, त्यांच्या भोवतीची गर्दी, वाहतुकीची गर्दी यांचा विचार करता अशा प्रकारचा हल्ला झाल्यास तो थांबवण्यासाठी पोलिस किंवा इतर सुरक्षा यंत्रणांना तिथे पोहोचण्यास बराच वेळ लागू शकतो. त्यामुळेच शाळेतील कर्मचार्‍यांना शाळेचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. याशिवाय वयाने मोठे विद्यार्थी आणि इतर स्टाफ यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. दोन प्रकारचे दशहतवादी हल्ले दशहतवादी हल्ले दोन प्रकारचे असतात. एक शाळा अथवा गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब ठेवणे अथवा २६/११ किंवा पेशावरप्रमाणे प्रत्यक्ष सशस्त्र दहशतवाद्यांनी येऊन गोळीबार करणे, हल्ला करणे. पहिल्या प्रकारात म्हणजे बॉम्ब ठेवण्याच्या प्रकाराला थोपवणे सोपे आहे. ते म्हणजे कोणती बेवारस वस्तू आढळल्यास तिला हात न लावता त्याबाबत तात्काळ पोलिसांंना कळवणे. पोलिसांची कारवाई संपेपर्यंत सगळ्यांना सुरक्षित अंतरावर हलवणे जरुरी आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुटण्यापूर्वी पूर्ण परिसराचे निरीक्षण करून बेवारस वस्तू शोधणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्ष दहशतवाद्यांनी हल्ला जर केला तर त्यापासून कसे रक्षण करायचे? सुदैवाने २६/११ नंतर तरी भारतावर अशा प्रकारचे हल्ले झालेले नाहीत आणि होण्याची शक्यताही कमी आहे. तरीही असे जर हल्ले झाले तर त्यापासून रक्षण करण्यासाठी आत्मसंरक्षणाचे धडे हे सगळ्या सामान्य नागरिकांना आणि अशी मोठी मुले जे आत्मसंरक्षण करू शकतात त्यांना देणे गरजेचे आहे. दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण कुठल्याही दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे तीन भाग आहेत. पहिले म्हणजे दहशतवादी हल्ला होण्याअगोदर आपल्याला काय करता येईल? किंवा दहशतवादी हल्ला होणार आहे अशी सूचना मिळाल्यानंतर त्या संस्थेला किंवा त्या शाळेला काय करता येईल? दुसरे म्हणजे ज्यावेळी दहशतवादी हल्ला सुरू असतो त्यावेळी काय करता येईल? आणि तिसरे म्हणजे दहशतवादी हल्ला संपल्यानंतर काय करायला पाहिजे ? हल्ला होण्यापूर्वी शाळेचे सुरक्षा कर्मचारी गेटवर अलर्ट असण्याची गरज आहे. तसेच घातपाताबाबतची सूचना मिळाल्यास शाळेची प्रवेशद्वारे तातडीने बंद करणे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शाळेच्या आवारात प्रवेश देण्यापूर्वी प्रवेशपत्र पाहणे किंवा त्यांची ओळख पटवून घेणे असे करता येईल. असे केल्यामुळे शाळेमध्ये येणार्‍या अनोळखी लोकांची गर्दी कमी होईल. शाळेचा परिसर मोठा असल्यास एकाहून अधिक सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पूर्ण परिसरावर निगराणी राखणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येक शाळेमध्ये सर्वांत जवळच्या फायर ब्रिगेड, हॉस्पिटल, पोलिस स्टेशनचे टेलिफोन नंबर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळेजवळच्या व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेता येण्यासाठी त्यांचेही संपर्क क्रमांक शाळेच्या स्टाफकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे अकस्मात काही हल्ला झाला तर आपल्याला जी मदत आहे ती लवकरात लवकर शाळेकडे पोहोचू शकेल. दहशतवादी हल्ला झाल्यावर काय कराल? दहशतवादी हल्ला झाला आणि काही दशहशतवादी फायरिंग करून शाळांच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर काय करता येईल? पूर्ण शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये लाऊड स्पीकरवर हल्ल्याची सूचना देता येईल. लाऊड स्पीकरवरून किंवा पब्लिक ऍड्रेस सिस्टमवरून कृपया आपली क्लास रूम बंद करून शांतपणे बसून पुढच्या आदेशाची वाट पाहा अशी सूचना देता येईल. अलार्म सायरन वाजवता येईल. दहशतवादी रायफलने गोळीबार करतात किंवा एखादा हातगोळा फेकतात. हातगोळे फेकत असतील तर लगेच जमिनीवर आडवे पडून स्वत:चे रक्षण करावे किंवा बेंच, टेबल, भिंत अशा आडोशांमागे लपून स्वत:चे रक्षण करावे. जर फायरिंग सुरू असेल तर क्लास रूम बंद करून बेंचच्या किंवा टेबलच्या मागे लपून बसावे. शिक्षकांनी मुलांना धीर द्यावा. दुर्दैवाने, एखादा अतिरेकी समोरासमोर आला तर त्याचा मुकाबला कसा करावा याबाबत शाळेतील नववी-दहावी किंवा त्यापुढील वर्गातील मोठे विद्यार्थी किंवा स्टाफ यांना आत्मसंरक्षणाचे, तसेच काठी अथवा दांड्याचा वापर करून दहशतवाद्यांशी एक-दोन मिनिटे लढण्याचे शिक्षण दिलेले असणे गरजेचे आहे. काठीच्या साहाय्याने अथवा इतर मार्शल आर्ट्‌स प्रशिक्षणाने आत्मसंरक्षण कसे करावे याचा सराव असणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांवर पेपर स्प्रे, बेगोन स्प्रे, छोटे फायर/आग विझवणार्‍या एक्स्टिंग्युशर, तिखट वापरून स्वत:चा बचाव करता येईल. हा सराव शाळेमधल्या सगळ्या कर्मचार्‍यांना करणे सक्तीचे करता येईल. त्यामुळे हे कर्मचारी पोलिसांची किंवा इतर कमांडोंची मदत पोहोचेपर्यंत त्या भागाचे काही वेळ तरी संरक्षण करू शकतील. शाळेच्या सुरक्षा प्रमुखांनी दहशतवादी नेमके कुठे आहेत, त्यांची संख्या आणि शस्रे याची पूर्ण माहिती मोबाईलच्या साहाय्याने इतरांकडून गोळा करून आलेल्या पोलिसांना द्यावी व दहशतवादी घुसलेल्या इमारतीमध्ये लपून शिरण्याकरता रस्ते/वाटा दाखवण्याकरता मदत करावी. हल्ला झाल्यानंतर काय करावे? आता हल्ला होऊन गेल्यानंतर काय केले पाहिजे ते पाहूया. सर्वप्रथम हल्ल्यात जखमी झालेल्यांना त्वरित रुग्णालयात पोहोचवावे. परंतु, तोपर्यंत आवश्यक असणारे प्राथमिक उपचार कसे करायचे याबाबतची माहिती शाळेच्या कर्मचार्‍यांना असणे आवश्यक आहे. गोळीमुळे रक्त बाहेर येत असेल तर ते कसे थांबवायचे, बँडेजिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण दिलेले असणे आवश्यक आहे. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की अशा दहशतवादी हल्ल्यांचे किंवा अशा धोक्यांचा अवाजवी बाऊ करणे गरजेचे नाही. कारण अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. पण तो होऊ नये, टाळला जावा आणि झालाच तर त्यांचा कडाडून मुकाबला करण्यासाठी आणि किमान जीवितहानी होण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. टीव्ही मीडियाकडून दहशतवादी हल्ल्यांना अतिरेकी महत्त्व देऊ नये. यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण होते. शिवाय दहशतवाद्यांना आपला टीव्ही बघून आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या डावपेचांची व हालचालीची माहिती मिळते. हीच घोडचूक २६/११ ला झाली होती. व्हीआयपींना सुद्धा हल्ल्याच्या ठिकाणी यायला ७ दिवस तरी बंदी घातली पाहिजे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना आपले काम चांगल्या प्रकारे करता येईल. आत्मसंरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी देण्यात येणारे प्रशिक्षण दैनंदिन आयुष्यामध्ये आत्मसंरक्षण करण्यासाठीही नक्कीच उपयोगाचे ठरू शकते. घरात एखादा मोठा अपघात झाला, इमारत कोसळली, विजेचा धक्का बसला, कोणी बुडू लागले, कोणी उंचावरून पडून फ्रॅक्चर झाले असेल तर काय करता येईल तर अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणे गरजेचे आहे. तसेच या सर्व गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे. त्यातून स्वत:चे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्याकरिता समर्थ बनता येईल. यासाठी गरज आहे ती अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेच्या किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमात सामील करायला पाहिजे. ज्यामुळे प्रत्येकच माणूस किंवा मुलगा/मुलगी स्वत:चे आत्मसंरक्षण काही वेळ करू शकेल. असे प्रशिक्षण घेतलेली मुले प्रौढ नागरिक बनतील, त्यावेळेस ते स्वत:चे आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यास अधिक सक्षम राहतील. पर्यायाने आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्टँडर्ड वाढण्याकरिता मदत होईल. सध्याच्या काळाची गरज अशी आहे की, प्रत्येकच नागरिक, प्रत्येकच मुलगा/मुलगी हा गुप्तहेर बनायला हवा, त्याला टेहाळणी कशी करायची याचे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. तो एक सैनिक पण बनायला हवा. त्याला दहशतवादी, माओवादी कसा ओळखायचा याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. त्याने आपल्या पोलिसांचे कान आणि डोळे बनायला हवे. तसे झाले तर आपला समाज आणि देश जास्त सुरक्षित बनेल. परंतु प्रश्‍न असा उद्भवतो की ३६५ दिवस आपण जाग्रुत राहू शकतो का? कारण हल्ला हा कधीही, कुठल्याही दिवशी होऊ शकतो. - ९०९६७०१२५३

No comments:

Post a Comment