Total Pageviews

Sunday 7 January 2018

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील पीएचडीचा बेपत्ता विद्यार्थी मनान वानी हा कथितरित्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील पीएचडीचा बेपत्ता विद्यार्थी मनान वानी हा कथितरित्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. वानीकडे एके- ४७ रायफल असून त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वानीच्या वडिलांचं नाव बशीर अहमद वानी असून ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील ताकिपोरा येथील रहिवासी आहेत.

मनान वानी गेल्या पाच वर्षांपासून अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शिक्षण घेत होता. तो जिओलॉजीमध्ये पीएचडी करत होता. काही दिवसांपूर्वी तो विद्यापीठातून घरी जायला निघाला होता. परंतु, तो घरी पोहोचलाच नाही. दोन दिवसांपूर्वी त्याचा रायफलसह एक फोटो व्हायरल झाला आहे. ५ जानेवारीला हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचं त्यावर लिहिलं होतं. वडिलांच्या तक्रारीवरून वानी बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मनान वानी हा सधन कुटुंबातील आहे. त्याचे वडील लेक्चरर असून भाऊ कनिष्ठ अभियंता आहे. मनानने लोलाब येथील जवाहर नवोदय विद्यालयातून दहावीचं शिक्षण घेतलं आहे. दरम्यान, आसिफ अहमद वागय नावाच्या आणखी एका तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तो कोणत्या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे, हे समजू शकले नाही.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या चोख व्यवस्थेमुळेच दिल्लीवर होऊ शकणारा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीला आला आहे. रविवारी रात्री एका संशयिताला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीने दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.
आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये हा आरोपी बसला होता. त्याच्या हालचाली टीसीला संशयित वाटल्याने त्याने त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण अनंतनाग येथील रहिवासी असून आपलं नाव बिलाल अहमद वाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या टीसीने संशयावरून रेल्वे पोलिसांना पाचारण केलं. रेल्वे पोलिसांनी बिलालची कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर आणि दिल्लीतील अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याचा डाव असल्याचं कबूल केलं. त्यामुळे बिलालला उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने केलेल्या चौकशीत बिलालने आपले दोन साथीदार जामा मशिदीजवळील अल राशीद या हॉटेलमध्ये असल्याचं सांगितलं. त्याने दिलेल्या माहितीवरून सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या साथीदारांचा तपास सुरू केला. मात्र, सहा जानेवारी रोजीच ते दोघे हॉटेल सोडून गेल्याचं त्यांना समजलं. बिलालने दिलेल्या माहितीमुळे दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेशचं एटीएस पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या असून संशयितांचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास सुरू आहे.

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा अमेरिकेला दिसू लागला आहे. अमेरिकेने ९/११ नंतर दहशतवादाच्या विरोधात छेडलेल्या युद्धात सहभागी होऊन वॉशिंग्टनकडून अब्जावधी डॉलरची मदत लाटणारा पाकिस्तान प्रत्यक्षात दहशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे, काश्मीरमध्ये छुपे युद्ध लढत असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला वेळोवेळी सांगितले आहे. दहशतवादाबाबतच्या पाकिस्तानच्या धोरणातील दुटप्पीपपणाही भारताने अनेकदा उघड केले आहे. मात्र, अमेरिकेने पाकची मदत थांबविली नव्हती. भारताला आणि आपल्याला भेडसावणाऱ्या दहशतवादाबाबत अमेरिका भेदभाव करते की काय, अशी शंका त्यामुळे या उपस्थित होत होती. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून पाकिस्तानचा खोटेपणा अधोरेखित केला.

दहशतवादाच्या विरोधातील युद्धात पाकिस्तानला अमेरिकेने ३३ अब्ज डॉलरची मदत दिली; परंतु दहशतवाद रोखण्यासाठी पाकने काहीही केले नाही. तो आम्हाला गेली पंधरा वर्षे मूर्ख बनवित आला आहे, असे ट्विट करून ट्रम्प यांनी नव्या वर्षात पाकिस्तानबाबत अमेरिका कठोर भूमिका घेईल हेच सूचित केले होते. ट्विटच्या आधारे परराष्ट्र धोरणे ठरविली जात नसली, तरी आपल्या लौकिकाला साजेसे वागत ट्रम्प यांनी, पाकिस्तानला संरक्षणासाठी दिली जाणारी मदत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादांना नेस्तनाबूत करण्यासाठीची कटिबद्धता दाखवित नाही आणि निर्णायक कारवाई करीत नाही, तोपर्यंत पाकिस्तानला सुरक्षाविषयक मदत दिली जाणार नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. अमेरिका अफगाणिस्तानात तालिबानींच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे तेथील तालिबानी अफगाणिस्तानची सीमा ओलांडून पाकिस्तानमधील डोंगराळ भागात आश्रय घेतात. त्यांच्या विरोधात अमेरिका ड्रोन हल्ले करीत आहे. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर पाकिस्तानने कारवाई करण्याची गरज असते. ती पाककडून प्रामाणिकपणे होत नसल्याचा, तसेच अमेरिकेला हवे असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांना इस्लामाबाद मदत करीत असल्याचा वॉशिंग्टनचा आरोप आहे. ट्रम्प यांचे नववर्षाचे टि्वटही याच अनुषंगाने होते. अफगाणिस्तानला अस्थिर करणाऱ्या आणि तेथील अमेरिकी फौजांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्याऐवजी त्यांना मदत करून पाकिस्तान दुटप्पी धोरण राबवित आहे. दहशतवाद्यांना पोसण्याच्या पाकच्या डावपेचाचा सर्वांत मोठा फटका भारताला बसतो आहे. आता तो अमेरिकेलाही बसू लागला आहे. त्यामुळे वॉशिंग्टनकडून कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. मध्य आशिया आणि अफगाणिस्तान यांचा शेजार लाभलेल्या पाकिस्तानच्या या भौगोलिक स्थानामुळेच अमेरिकेने त्या देशाला सतत चुचकारले आहे. मात्र, यामुळेच अमेरिकेला आपल्याशिवाय पर्याय नसल्याची भावना पाकिस्तानातील लष्करशाहीत निर्माण झाली. अफगाणिस्तानावर वर्चस्व मिळवून आपली पश्चिम सीमा सुरक्षित करण्याचा पाकिस्तानचे डावपेच आहेत. त्यासाठी तो देश तालिबानींना पाठबळ देत आहे. दुसरीकडे चीनबरोबरील सामरिक संबंध दृढ करून, तसेच त्या देशाच्या महामार्गांच्या प्रकल्पात सहभागी होऊन पाकिस्तानने अमेरिकेनंतरचा दुसरा सहकारीही शोधला आहे. पाकच्या या दुहेरी नीतीकडे कानाडोळा करण्याचे आतापर्यंतचे धोरण बदलून ट्रम्प यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे गळे काढत असलेल्या पाकिस्तानच्या ढोंगाला अमेरिकेने भुलू नये. केवळ तालिबानीच नव्हे, तर भारताच्या विरोधातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास पाकला भाग पाडणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment