Total Pageviews

Sunday 19 August 2012

धर्मांधांची अफवांची दहशत- वासुदेव कुलकर्णी  ऐक्य समूह
आसाम राज्यातल्या मूळ आसामी आदिवासी आणि बांगला देशी घुसखोरांच्यात झालेल्या दंगलींना, धार्मिक रंग फासून देशभरातल्या मुस्लीम धर्मियांची एकजूट करायची, त्यांना चिथावणी द्यायची कट कार-स्थाने उधळून लावायला हवीत. आसामातल्या दंगलींचा निषेध करायच्या नावाखाली रझा अकादमी आणि अन्य मुस्लीम संघटनांनी मुंबईत निषेध मोर्चा काढला. आझाद मैदानावर आणि छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाच्या परिसरात, या धर्मांधांनी घातलेला हैदोस, केलेला हिंसाचार ही धर्मांधांच्या शांततेला चूड लावायच्या कटाची प्रचिती होय. मुंबईतले दंगलखोर उजळमाथ्याने फिरत असले, तरी धर्मनिरपेक्षतावादी सरकारला ते अद्यापही सापडलेले नाहीत. मुंबईतली दंगल जिहादचे नारे देत घडवलेली होती, हे पोलिसांच्या तपासात निष्पन्नही झाले. पण तरीही राज्य सरकारने धर्मांधांवर कठोर कारवाई केली नाही. त्यामुळेच पुण्यातल्या आसामी विद्यार्थ्यांवर धर्मांधांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या. आता आसाम दंगलींनाच धार्मिक रंग फासून संपूर्ण देशभर दहशत निर्माण करायचा लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानच्या आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेचा नियोजित कट असल्याचे, बंगलोर, हैद्राबादमध्ये धर्मांधांनी पसरवलेल्या अफवांच्या "बॉंब'मुळे उघडकीस आले.
गेल्या आठवडाभरात आसाम, नागालॅंड, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यातल्या बंगलोर, म्हैसूर, हैद्राबाद, पुणे, मुंबई या शहरात राहणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदारांना मोबाईल एस. एम. एस. द्वारे धमक्या देण्याचे सत्र जोरदारपणे सुरु आहे. "फेसबुक'च्या  सोशल नेटवर्किंग साईटवरूनही पूर्वोत्तर राज्यातल्या विद्यार्थ्यांना-नागरिकांना भयभीत करणाऱ्या धमक्या देणे सुरुच आहे.  "ईद उल फत्र' चा सण संपल्यावर पूर्वोत्तर राज्यातल्या विद्यार्थ्यांना-रहिवाशांवर हल्ले चढवले जातील, "ईद के बाद काट डालेंगे' असे भयंकर संदेश पाठवले जात आहेत. 20 ऑगस्टच्या आत शहर सोडून जा, अन्यथा तुमच्यावर हल्ले होतील, आसाम दंगलीचा सूड घेतला जाईल, अशा या धमक्यांमुळे देशातल्या अन्य राज्यात राहणाऱ्या लक्षावधी रहिवाशात घबराट निर्माण झाली. त्यांच्या पालकांनीही घाबरून आपल्या मुलांना, घरी परतावे, असा आग्रह धरला. परिणामी बंगलोरमधून गेल्या चार दिवसात पंधरा हजाराच्यावर पूर्वोत्तर राज्यातल्या विद्यार्थी-नोकरदार आणि रहिवाशांनी पलायन केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आपल्या राज्यात राहणाऱ्या पूर्वोत्तर राज्यातल्या सर्वांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सरकार घेत आहे, त्यांनी आपल्या गावी परतू नये, असे आवाहन करूनही काही उपयोग झाला नाही. आपल्या राज्यात परत जाणाऱ्या या विद्यार्थी-नागरिकांसाठी रेल्वेने खास रेल्वे गाड्या सोडल्या. कर्नाटकचे उपमुख्य आणि गृहमंत्री अशोक यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन ध्वनिक्षेपकाद्वारे या लोकांना आवाहन केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. बंगलोर, म्हैसूर आणि कोटगू मधून त्यांचे पलायन सुरुच आहे. रेल्वे गाड्या खचाखच भरून जात आहेत.
आंध्र, तमिळनाडू, बिहार या राज्यातले आसामी विद्यार्थीही धमक्यांना घाबरून आपल्या घराकडे परतायला लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन वारंवार करूनही, पूर्वोत्तर राज्यातल्या या रहिवाशांना जीविताची सुरक्षितता वाटेनाशी झाली. जिवाच्या भीतीने त्यांचे पलायन सुरुच आहे. लष्कर ए तोयबा आणि अन्य धर्मांध मुस्लीम संघटनांनी अत्यंत नियोजनपूर्वक अफवांचा हा बाजार सुरु केला. त्यासाठी अत्याधुनिक संपर्क यंत्रणेचा धूर्तपणे वापरही केला आणि देशात घबराट निर्माण करण्यात यशही मिळवले, ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब होय.
केंद्रीय गुप्तचर आणि राज्य सरकारांच्या गुप्तचर खात्यानी धमक्यांच्या या एस. एम. एस., ई मेल वर लक्ष ठेवले असले, तरी अफवा पसरवणाऱ्या धर्मांध संघटना आणि त्यांच्या सूत्रधारांचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. सरकार फक्त अफवावर विश्वास ठेवू नका, अशी आवाहने करण्यात गर्क आहे. धर्मांध मुस्लीम संघटनांनी मात्र आसाम मधल्या दंगलींचे धार्मिक भांडवल करून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच सुरुंग लावायचा निर्धार केला. आसाम प्रश्न पेटवून अल्पसंख्याक मुस्लिमांना भडकवण्याची कट कारस्थाने सुरु ठेवली हे राष्ट्रीय सुरक्षेलाच आव्हान होय.

No comments:

Post a Comment