Total Pageviews

Sunday 1 October 2017

तेथे कर अमुचे जुळती! -TARUN BHARAT

कॉंग्रेसशी खटकल्यामुळे स्वतंत्र भारताच्या पहिल्या दोन फील्ड मार्शल्सना मृत्यूनंतरही जी सरकारी उपेक्षा वाट्याला आली त्याच्या ठीक उलटा प्रकार मार्शल अर्जन सिंगांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण देशाने पाहिला. दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील ब्रार वेअर स्मशानभूमीत पार पडलेल्या मार्शल अर्जन सिंगांच्या अंत्यसंस्काराला वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धानोआ, नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा आणि भूदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन्, राष्ट्रपती आणि घटनात्मक सरसेनापती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय नेते आवर्जून उपस्थित होते. 

प्रिय वाचक, आपण जर नियमितपणे ‘विश्‍वसंचार’ वाचत असाल, तर आपल्याला आठवत असेल की, गेल्याच वर्षी म्हणजे एप्रिल २०१६ मध्ये आपण मार्शल अर्जन सिंग यांच्या भीमपराक्रमी जीवनाचा परिचय करून घेतला होता. निमित्त होतं मार्शल साहेबांच्या ९७ व्या वाढदिवसाचं. १५-१६ एप्रिल १९१९ रोजी जन्मलेल्या मार्शल अर्जन सिंग यांच्या ९७ व्या वाढदिवसाचं प्रयोजन धरून भारतीय वायुदलाने त्यांचा एक आगळाच सन्मान केला होता. पश्‍चिमबंगाल राज्यात कोलकात्यापासून सुमारे १५० कि.मी. अंतरावर पानागड हे भारतीय वायुदलाचं एक ठाणं आहे. १५ एप्रिल २०१६ या दिवशी भारतीय वायुदलाचे तत्कालीन प्रमुख, एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी समारंभपूर्वक, पानागड ठाण्याचं नाव एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग असं ठेवलं. आपल्या हयातीतच चालती-बोलती दंतकथा बनलेल्या एका महान सेनापतीचा गौरव वायुदलाने अशा आगळ्या रीतीने केला.
या घटनेला आता दीड वर्ष उलटलं आणि परवा १६ सप्टेंबर २०१७ ला मार्शल अर्जन सिंग यांचं हृदयविकाराने, पण खरं पाहता वार्धक्याने देहावसान झालं. तशी त्यांची प्रकृती अखेरपर्यंत चांगलीच होती, पण दीर्घायुषी व्यक्तींना अपरिहार्यपणे जे दु:ख भोगावंच लागतं, ते त्यांनाही सोसावं लागत होतं. ते दु:ख म्हणजे समवयस्क मित्र, सखे, सोबती, जोडीदार एकापाठोपाठ एक, मरण पावताना पाहाणं. आपण ज्याच्या खांद्यावर हात टाकू, असे पुष्कळ असतात, पण आपल्या खांद्यावर हक्काने हात टाकणारा कुणीच नाही, हे दु:ख भयंकर असतं. मार्शलसाहेब अलीकडे वारंवार हे दु:ख बोलून दाखवत असत. त्यांच्या पत्नी तेजी सिंग एप्रिल २०११ मध्ये मरण पावल्या. अलीकडच्या काळात मार्शल साहेबांना पाठदुखीचा त्रास होत असे, पण तरीही ते हिंडत-फिरत असत. जुलै २०१५ मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचं निधन झालं. जेव्हा त्यांचा देह दिल्लीच्या पालमविमानतळावर आणण्यात आला, तेव्हा मार्शल अर्जन सिंग आपल्या संपूर्ण गणवेशात म्हणजे, मार्शल ऑफ द एअर फोर्सच्या कडक गणवेशात आणि सैनिकी चिन्हांसह तिथे गेले आणि त्यांनी डॉ. कलामांच्या देहाला कडकडीत सैनिकी सॅल्युट दिला. देशाचं वायुदल समर्थ बनविणारा एक सेनापती आणि देशाला इंटर कॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाईल्स देणारे मिसाईल मॅन शास्त्रज्ञ यांच्यातला हा अनुबंध, पाहाणार्‌यांना बिट्‌विन दि लाईन्स बरंच काही सांगून गेला.
लष्करातलं म्हणजे भूदलातलं सर्वोच्च पद असतं जनरल. आरमार म्हणजे नौदलातलं सर्वोच्च पद असतं ऍडमिरल. तसं वायुदलातलं सर्वोच्च पद असतं एअर चिफ मार्शल. सैनिकी दलांमधली अधिकारपदं त्या-त्या अधिकार्‍यांच्या खांद्यावरच्या फिती किंवा तारे यांच्याद्वारे सूचित केली जातात. उदा. वरील सर्वोच्च पद दर्शविण्यासाठी त्यांच्या खांद्यावर चार तारे लावलेले असतात. अमेरिकन सैनिकी दलांमध्ये त्यांचा उल्लेख ‘फोर स्टार जनरल’ असाही करतात. या सर्वोच्च पदी पोहोचलेले अधिकारी निवृत्त झाल्यावर त्यांचा उल्लेख रिटायर्ड किंवा अ.प्रा. म्हणजे अवकाश प्राप्त असा करतात, परंतु याच्या वरचं पद म्हणजे फील्ड मार्शल किंवा फाईव्ह स्टार जनरल, हे तहहयात असतं. ते सेवाज्येष्ठतेनुसार मिळत नसून विशेष सन्मान म्हणून दिलं जातं. दुसर्‍या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात आणि युद्धानंतर ब्रिटन, अमेरिका, रशिया आणि जर्मनी या चारही युद्धमान राष्ट्रांनी आपल्या अनेक कर्तबगार सेनापतींना, जनरल्सना फील्ड मार्शल बनवलं होतं. या पदावरील अधिकार्‍याला सेवानिवृत्ती नाही. ते तहहयात सैनिकी सेवेत आहे, असं मानण्यात येतं.
१९७१ च्या भारत-पाक बांगलादेश युद्धात प्रचंड पराक्रम गाजवल्याबद्दल भारत सरकारने तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल सॅममाणेकशा यांना फील्ड मार्शल हा सन्मान बहाल केला होता. त्यानंतर सर्वच संबंधितांना अशी जाणीव झाली की, जनरल करिअप्पांनाही हा सन्मान द्यायला हवा. कारण इंग्रज भारताला स्वातंत्र्य देऊन निघून गेल्यावर जनरल के. एम. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी बनले. राजकीय नेत्यांनी अ-दूरदृष्टीने फाळणी स्वीकारून संपूर्ण देशाचीच हानी केली होती, तशीच ती सैन्यदलांचीही झाली होती. अनेक सैनिकी तुकड्या आणि फार मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री, यांचं पाकिस्तानला फुकटात दान करण्यात आलेलं होतं आणि हे सगळं होतंय न होतंय, तेवढ्यात पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरवर आक्रमण करून युद्धालाच सुरुवात केली होती, म्हणजे एकीकडे सैन्याची सगळी रचना, संघटना पार विस्कटून गेलीय. प्रशिक्षित माणसं आणि युद्धसाहित्याचा तुटवडा पडलाय. देशभर मुसलमानांचे दंगे चाललेत. त्यातच शत्रूने सरहद्दवर आक्रमण केलंय, अशा त्या अत्यंत विपरीत परिस्थितीत भारतीय सैन्याच्या पुनर्रचनेचं, पुनर्संघटनेचं अवघड कामजनरल करिअप्पांनी पेललं आणि यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्यासाठी त्यांनाही फील्ड मार्शल हा सन्मान देण्यात आला.
पण आयुष्यभर देशाच्या संरक्षणासाठी झटलेल्या या महान सेनापतींना वंदन करायला एकही सरकारी माणूस उपस्थित नव्हता. कारण या दोन्ही वेळची भारत सरकारे म्हणजे कॉंग्रेस सरकारे होती. माणेकशा साहेबांचं इंदिरा गांधींशी जोरदार खटकलं होतं आणि करिअप्पा साहेबांनी तर काय, फारच मोठ्या माणसाशी पंगा घेतला होता. म्हणजे असं पाहा की, जवाहरलाल नेहरू उर्फ देशाच्या कंठातला लाल उर्फ मुलांचे आवडते चाचा नेहरू उर्फ ही यादी कितीही वाढवता येईल. ही काय सामान्य व्यक्ती होती? आणि अशा असामान्य व्यक्तीचा तितकाच असामान्य मित्र किंवा उजवा हातच जणू असे ते महान कृष्ण मेनन! तर करिअप्पा साहेबांनी त्या महान लोकनेत्या कृष्ण मेननांविरुद्ध, १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून चक्क निवडणूक लढवली.
औरंगजेब हा अत्यंत दीर्घद्वेषी होता. आपल्याला थोडासाही विरोध करणार्‍या माणसाला तो कधीही विसरत नसे. नेहरू घराणे हेही असेच आहे. आपल्याला विरोध करणार्‍या आणि त्यापेक्षाही आपल्याला पर्याय असू शकणार्‍याला ते कधीही क्षमा करत नाहीत. जुनी उदाहरणं म्हणजे नेताजी सुभाष आणि वीर सावरकर तर अलीकडची (त्यांच्याच पक्षातली) उदाहरणं म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि नरसिंह राव.
तर अशाप्रकारे करिअप्पा साहेब आणि माणेकशा साहेब हे नेहरू घराण्याच्या ब्लॅक लिष्टात असल्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला कुणीही सरकारी माणूस फिरकला नाही. उगाच मॅडम आणि पप्पूची गैरमर्जी कोण ओढवून घेईल हो! आमच्या राजकीय करियरचा (की कॅरियरचा?) प्रश्‍न आहे हा!
अशा सगळ्या उबगवाण्या राजकीय वातावरणात मार्शल अर्जन सिंग भाग्यवान ठरले. १९९९ ते २००४ या कालखंडात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तारूढ होतं. अर्जन सिंग १९७० सालीच भारतीय वायुदलाचे ‘एअर चीफ मार्शल’ या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले होते. आता भारत सरकारने त्यांना ‘मार्शल ऑॅॅफ दि एअर फोर्स’ म्हणजेच फील्ड मार्शलच्या समकक्ष असा सन्मान देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार २६ जानेवारी २००२ या दिवशी त्यांना तो देण्यात आला. त्यांच्या खांद्यावर आता चारऐवजी पाच तारे आले. त्यांच्या मोटारीवरही पाच तार्‍यांचा ध्वज आला. मार्शल हा कधीच सेवानिवृत्त नसतो. त्यामुळे १९७० साली वयाच्या ५१ व्या वर्षी एअर चीफ मार्शल म्हणून सेवानिवृत्त झालेले अर्जन सिंग २००२ साली वयाच्या ८३ व्या वर्षी पुन्हा वायुदलाच्या सेवेत आले.
मृत्यूनंतरही मार्शल अर्जन सिंग भाग्यवान ठरले. कॉंग्रेसशी खटकल्यामुळे स्वतंत्र भारताच्या पहिल्या दोन फील्ड मार्शल्सना मृत्यूनंतरही जी सरकारी उपेक्षा वाट्याला आली त्याच्या ठीक उलटा प्रकार मार्शल अर्जन सिंगांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण देशाने पाहिला. दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील ब्रार वेअर स्मशानभूमीत पार पडलेल्या मार्शल अर्जन सिंगाच्या अंत्यसंस्काराला वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धानोआ, नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा आणि भूदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रपती आणि घटनात्मक सरसेनापती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय नेते आवर्जून उपस्थित होते. कडक सैनिकी शिस्तीत पण भावपूर्ण वातावरणात मार्शल साहेबांना अंतिममानवंदना आणि १७ तोफांची सलामी देण्यात आली. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी लाल किल्लावर फडफडणार्‌या स्वतंत्र भारताच्या तिरंग्याला फ्लाय पास्ट म्हणजे आकाशातून मानवंदना देणार्‍या १०० विमानांच्या ताफ्याचं नेतृत्व करणार्‍या तेव्हाच्या विंग कमांडर अर्जन सिंग आणि आताच्या मार्शल ऑफ दि एअर फोर्स अर्जन सिंग यांच्या चिरनिद्रित देहाला त्यांचे सुपुत्र अरविंद सिंग यांनी अग्नी दिला. भारताचे सर्वोच्च वायुदलप्रमुख पंचतत्वात नव्हे, वायुतत्वात विलीन झाले.
मार्शल साहेब, हे राष्ट्र सदैव तुमचे कृतज्ञ आहे, कृतज्ञ राहील!

No comments:

Post a Comment