Total Pageviews

Saturday 7 October 2017

हिंदू 'फेस्टिवलशेमिंग' - एक नवा पुरोगामी खेळ

एक काळ असा होता जेव्हा वर्षभराचे हिंदू सण कुठल्या दिवशी येतात हे बघण्यासाठी मला कालनिर्णय विकत घ्यावं लागायचं. पण सोशल मीडियावर सध्या स्वघोषित पुरोगामी विचारवंतांचा इतका सुळसुळाट झालाय की हल्ली मला ट्विटर आणि फेसबुकवरून सगळं पंचांग समजतं. कधी न धुतलेल्या, विंचरलेल्या  केसांमधून सटासटा उवा बाहेर निघाव्यात तसे हिंदू सण जवळ आले की ह्या तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या फेसबुक आणि ट्विटर भिंतीवरून समाजप्रबोधनाचे घाऊक संदेश बाहेर पडतात.  

'सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पाणी वाचवा' हा संदेश त्याच त्या भेगा पडलेल्या मातीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांवर हात ठेवून आभाळ न्याहाळणाऱ्या शेतकऱ्याच्या श्वेतशाम फोटोसकट जिकडे तिकडे फिरायला लागला की समजावं, 'अरे वा, महिनाभराने होळी आहे वाटतं'. मागे एका इंग्रजीतून लिहिणाऱ्या पत्रकार जोडप्यामधल्या पतीने, 'ह्या वर्षी कोरडीच होळी खेळा हो, पाण्याचा किती दुष्काळ आहे' वगैरे टाहो ट्विटरवरून फोडला होता. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या दोन-तीन दिवसच आधी त्याच्या बायकोने 'किती गरमी आहे ह्या वर्षी, पण माझ्या मोठ्या खासगी स्विमिंगपूल मध्ये थोडा वेळ पोहायला गेलं की कसं रिफ्रेशिंग वाटतं', ह्या अर्थाचं ट्विट केलं होतं. म्हणजे स्वतःच्या आलिशान घराच्या स्विमिंग पूल मध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी केली तरी चालते, पण इतरांनी मात्र होळीसाठी बादली भर पाणी घेतलं तरी ती पाण्याची अक्षम्य उधळपट्टी असते. हे असलेच लोक जिथे जिथे सीलबंद पाण्याच्या बाटल्या विकत घेतात आणि एक-दोन घोट घेऊन उरलेलं पाणी बाटलीसकट खुशाल फेकून देतात, आणि वर इतरांना अनमोल सल्ले देतात की पाणी कसं नासू नये. त्यातही हिंदू सणांवर ह्या असल्या स्वतःला पुरोगामी वगैरे म्हणवणाऱ्या लोकांचा खास राग असतो. प्रत्येक हिंदू सणाच्या वेळेला हा पुरोगामी जळफळाट आपल्याला हमखास दिसतो.

'नवऱ्यासाठी उपास करणं हे अमानुषपणाचं आहे', 'रक्षाबंधन म्हणजे पुरुषांची गुलामी' असले जळजळीत स्त्रीवादी वगैरे संदेश पुरोगाम्यांच्या फेसबुक भिंतींवर झळकायला लागले की समजावं 'वटसावित्री किंवा रक्षाबंधन' आलंच पुढच्या पंधरवड्यात! 'मंगळसूत्र घालणं ही मानसिक गुलामगिरी आहे' म्हणणारे हेच लोक 'बुरखा घालणं हा मुसलमान स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे' हे ही तितक्याच जोरकसपणे सांगत असतात हे महत्वाचे. दसरा-दिवाळीच्या वेळेला तर अश्या लोकांच्या अंगभर पुरोगामित्वाचे नुसते पुरळ उठते. मग 'राम हा रामायणाचा खरा हिरो नाहीच, रावणच कसा ग्रेट होता', 'नवरात्राचा खरा अर्थ महिषासुराच्या पूजेत आहे, तोच खरा मूलनिवासी' असले दिव्य साक्षात्कार होतात.

दिवाळी म्हणजे तर काय, पुरोगामी अरण्यरुदनाचे सुवर्णपर्वच! अगदी 'फटाके लावू नका, गोड खाऊ नका' ह्यापासून सुरु होऊन पार 'पाडव्याला नवऱ्याला आणि भाऊबीजेला भावाला ओवाळू नका, ते पुरुषी वर्चस्वाचे लक्षण आहे' इथपर्यंतचे उद्बोधक पुरोगामी संदेश सर्दीत नाकातून अखंड शेंबूड गळावा तसे ह्या लोकांच्या वॉलवरून सतत गळत असतात. वर 'दिवाळीला एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे, ते पैसे वाचवून सामाजिक कार्याला द्यावेत. देवळात हुंडीत पैसे घालायची काय गरज आहे, ते पैसे वाचवून गरिबांना द्यावेत' वगैरे शहाजोगपणाचे किरकोळ फुकटचे सल्ले घाऊक प्रमाणात दिलेले असतातच. मजेची गोष्ट अशी की हे सल्ले देणाऱ्या ह्या लोकांपैकी बहुतेक लोक स्वतः कधी देवळात जात नाहीत आणि चुकून कधी गेलेच तर दहा रुपयांपेक्षा जास्त पैसे हुंडीत टाकायची त्यांची दानतही नसते आणि कुवतही नसते, पण सर्वसामान्य भाविक हिंदू माणसाला फुकटचे उपदेश करायला कुणाचं काय जातंय?

'दिवाळीला एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे' हा ज्वलंत, सामाजिक प्रबोधनपर संदेश ह्यातले बरेच लोक स्टारबक्स वा कॅफे कॉफी डे मध्ये अडीचशे रुपयांची कॉफी पीत आपल्या साठ हजार रुपये किमतीच्या आय-फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. पण ह्यांना जर कुणी विचारलं की 'एवढी महाग कॉफी प्यायची काय गरज आहे? ते पैसे वाचवून तुम्ही सामाजिक कार्याला का नाही देत?' तर लगेच, 'आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला हा घाला आहे हो' असे म्हणून हे तथाकथित पुरोगामी गळे काढायला मोकळे. नेमका हिंदू सणांच्या वेळीच पर्यावरणाचा पुळका येणारे हे तथाकथित विचारवंत स्वतःच्या एसी गाड्यांमधून फिरताना त्यांना प्रदूषण दिसत नाही. जगभर परिषदा अटेंड करायला विमानाने जाताना त्यांना आपला कार्बन फूटप्रिंट जाणवत नाही, पण हिंदू सणांच्या वेळेला मात्र एकजात सगळे उपदेश करायला मोकळे! 

मला व्यक्तिशः आपले हिंदू सण साजरे करणं मनापासून आवडतं. अगदी दिवाळी, दसऱ्यापासून ते रक्षाबंधनापर्यंतचे सगळे हिंदू सण मी आवडीने माझ्या कुटुंबियांसह साजरे करते. कालानुरूप सण साजरे करायच्या पद्धतीमध्ये बदल होतोच आणि ते अगदी साहजिकच आहे. काही काही वेळेला काळाच्या ओघात सण साजरा करायचा मूळ उद्देश्य मागे पडलेला आहे हेही खरेच आहे. हिंदू संस्कृती ही मूलतः निसर्गपूजकच आहेत. सर्व सृष्टी ही त्या सर्वशक्तीमान परमेश्वराने माणसाला तिचा उपभोग घेता यावा म्हणून बनवली आहे असे हिंदू लोक मानत नाहीत. आपण निसर्गाचा सन्मान करतो. आपल्या सगळ्या सणा-समारंभांमध्ये ऋतुचक्राचा, निसर्गाचा आदरच केलेला आहे.

दिवाळीपासून थंडीचा मौसम सुरु होतो म्हणून तेल लावून अभ्यंगस्नान करायचं. होळीला हिंवाळा संपतो, वसंत सुरु होतो, म्हणून शेवटची शेकोटी पेटवायची आणि वसंताचे रंग खेळायचे. गणेशचतुर्थीला गणपतीची मृण्मय मूर्ती घरी आणायची, तिची पूजा करायची आणि तिचं विसर्जन करायचं, कारण आपण पंचमहाभूतांपासून जन्मून परत त्यांच्यातच विलीन होणार. जेवण केळीच्या पानावर करायचं, शाकाहारी करायचं, उरलंसुरलं त्याच केळीच्या पानात गुंडाळून गाईच्या तोंडात द्यायचं हे आजही भारतात अनेक ठिकाणी होत असतं. आज 'गो ग्रीन' 'गो ग्रीन' म्हणून ज्या चळवळीचे गोडवे पाश्चात्य देशात गेले जातात, ते तर आपण शतकानुशतके करत आलेलो आहोत. परवाच मी एका परदेशी विद्यापीठाचा ट्विट वाचला, त्यांनी चक्क पत्रावळीचे फोटो दिले होते आणि म्हटलं होतं की 'ही पर्यावरणपूरक पद्धत आम्ही शोधून काढलीय'. मला त्यांना सांगावंसं वाटलं की 'अहो ही पर्यावरणपूरक पद्धत ह्या देशात शेकडो वर्षांपासून होती आणि आजही अस्तित्वात आहे.' थंडीत तीळ आणि गूळ शरीराला पचतो, पौष्टिक असतो म्हणून संक्रांतीच्या वेळेला तिळगुळ खायचे. गणपतीच्या सुमारास गोव्यात नवीन धान्य तयार होतं म्हणून देवापुढे भाताच्या लोंब्या ठेवून त्यांची पूजा करायची. वडाचं झाड हवेत प्राणवायू सोडतं, त्याचं रक्षण करता यावं म्हणून वटसावित्रीला त्याचं पूजन करावं. पिंपळ, औदुंबर ह्यासारखे वृक्ष सहसा तोडू नयेत अशी शिकवण हिंदूंना लहानपणापासूनच मिळते. माझी मुलं आजही चुकून पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करतात कारण पुस्तकात सरस्वतीचा वास असतो अशी हिंदूंमध्ये श्रद्धा आहे.

'गो ग्रीन' वगैरे घोषणांची आपल्या पूर्वजांना कधी गरज भासली नाही कारण त्यांची पूर्ण जीवनशैलीच निसर्गाला पूरक, निसर्गपूजक अशीच होती. कालांतराने सण साजरे करायच्या पद्धतीत फरक पडला. त्याच बराच अनावश्यक फाफटपसाराही आला. त्यात बदल व्हायलाच पाहिजेत. पण ते बदल करणं म्हणजे आपल्या परंपरेपासून दूर जाणं नव्हे. आपल्याला खरोखरच आपले सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करायचे असतील तर आपण आपल्या परंपरांकडे परत गेलं पाहिजे.
सध्या एकूणच हिंदू परंपरांना, हिंदू सणांना, हिंदू चालीरीतींना, प्रतिकांना सरसकट नावे ठेवणे हेच पुरोगामित्वाचे एकमेव लक्षण आहे असे समीकरण झालेले आहे. "फेस्टिवलशेमिंग" हा त्याचाच एक प्रमुख भाग. सरसकट हिंदू सणांवर टीका करून हिंदूंना त्यांच्या चालीरीतींबद्दल, त्यांच्या परंपरांबद्दल शरम वाटायला लावणे आणि हळूहळू हिंदूंना त्या परंपरांपासून तोडणे हा एक खास पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांचा कावा आहे आणि त्याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायची गरज नाही.

तुमच्या वैयक्तिक मूल्यपद्धतीप्रमाणे आपले सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण हिंदू सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका. मी स्वतः सगळे हिंदू सण आवर्जून आणि दणक्यात साजरे करते. दिवाळीला माझी मुलं दिवसभर खपून ओल्या मातीचा किल्ला बनवतात. आमचा आकाश कंदील कागदाचा, हाताने तयार केलेला असतो. फटाके असतात पण अस्सल भारतीय बनावटीचे आणि कमी आवाज करणारे. मातीच्या पणतीचा मंद, सौम्य, तेवता उजेड मला फार आवडतो त्यामुळे मी पणत्या खूप लावते दिवाळीत आणि विजेचे दिवे कमी लावते. दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे, त्यामुळे त्या निमित्ताने सामाजिक काम करणाऱ्या काही संस्थांना आम्ही दरवर्षी यथाशक्ती मदत करतो. केवळ घरी किंवा सोसायटीत काम करणाऱ्या लोकांनाच नाही तर इतरही बऱ्याच लोकांना आमच्या दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेतो. इतर वर्षभर मी विजेचा अपव्यय करत नाही किंवा पाणीही व्यर्थ वाया घालवत नाही, उलट यथाशक्ती झाडे लावून आणि पावसाचे पाणी मातीत जिरेल असं बघून मी पाण्याचे नियोजनही करते त्यामुळे होळीला माझ्या मुलांनी तीन-चार बादल्या पाणी होळी खेळायला घेतलं तर मला त्यात काहीही वावगं वाटत नाही. मुलं वापरतात ते रंग फुलांपासून, हळदीपासून, मेंदीपासून केलेले असतात त्यामुळे ते रंगमिश्रित पाणी शेवटी बागेतच मुरतं.

रक्षाबंधनाच्या दिवशी माझी मुलं आणि मुलगी एकमेकांना राखी बांधतात कारण रक्षण तिघांनाही एकमेकांचं करायचं असतं. नवरात्रात मी जेव्हा देवीची, शक्तीची सरस्वतीची उपासना करते तेव्हा माझ्या लेकीत मला निर्भय, समर्थ, कुठल्याही राक्षसाच्या निर्दाळनाला सज्ज अशी देवी दिसते. माझ्या धर्माबद्दल, माझ्या परंपरांबद्दल मला अभिमान आहे. हिंदू हा सदैव काळाबरोबर बदलत आलेला आहे. आमचे सण आम्ही कसे साजरे करू, त्यात काळानुरुप बदल कसे करू ही जबाबदारी सामान्य हिंदूंची आहे. हिंदू धर्माशी, आपल्या परंपरांशी काही देणे घेणे नसलेल्या तथाकथित स्वघोषित पुरोगामी लोकांकडून धडे घेण्याची हिंदूंना गरज नाही. हिंदू धर्माच्या सर्व परिवर्तनवादी चळवळी ह्या स्वधर्माविषयी कळकळ असणाऱ्या हिंदूंनीच घडवून आणलेल्या आहेत आणि ह्यापुढेही ते तसेच राहील

No comments:

Post a Comment