Total Pageviews

Sunday 10 September 2017

बेजबाबदार नागरिक- तुषार ओव्हाळ


भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बर्यावच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना सपशेल विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, पण त्या जबाबदारीला केराची टोपली दाखवून आपल्याकडील कचरा सर्रास रस्त्यावर, स्टेशनवर आपण टाकतो. पान खाऊन चहूकडे थुंकणे तर काहींचा जणू छंदच... कानीकपाळी ओरडून, दंड आकारुनसुद्धा हे तंबाखूबहादर काही ऐकत नाहीत. रोटरी क्लबच्या सदस्यांनी मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर सुंदर चित्रे रंगवली, जेणेकरून स्थानकांची स्वच्छता अबाधित राहील. पण बर्या च बेजबाबदार थुंकीवीरांनी त्या आकर्षक चित्रांवरही तोंडच्या पिचकार्यां नी लाल घाव केले. आपण इतके बेजबाबदार आहोत की काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. पण असे केल्यामुळे आपली जबाबदारी खरोखरी संपते का? तर, अजिबात नाही. त्यामुळे राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही, पण तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रुप आलेले दिसते. हीच सवय आता मुंबईकरांच्या मुळावर उठली आहे. मुंबई महापालिका आयुक्त मेहता म्हणाले की, बुधवारी दुपारपर्यंत ७ हजार मेट्रिक टन कचरा नाल्यातून काढण्यात आला. या कचर्यायचा निचरा न झाल्याने मुंबईत पाणी साचले. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियमलोकांनी अक्षरश: पायदळी तुडवला. वाहतुकीचे नियमजितके आपल्याकडे मोडले जात असतील, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे या गोष्टी अगदी छातीटोकपणे आपल्याकडे केल्या जातात. नियममोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर, हेच आपले दुर्दैव. शिकून माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही, हीच आपली शोकांतिका. त्यामुळे नियमपाळण्यासाठी गरज कडक कायद्याची नाही, तर गरज आहे सद्सद्विवेकबुद्धीची, गरज आहे, पालकांनी नियमपाळण्याची आणि मुलांवर उत्तमनागरी संस्कार करण्याची. वक्तव्यांचा अन्वयार्थ इलेक्ट्रॉनिक माध्यमातील काही स्वंयघोषित पत्रकार सर्वज्ञानी असल्याच्या थाटात वावरत असतात. पण ’सगळ्यात आधी आम्ही’च्या नादात बातम्यांची सत्यता न पडताळता त्या ‘ब्रेक’ करण्याला सर्वस्वी प्राधान्य दिले जाते. आता हेच बघा. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामअत्यवस्थ होते, तेव्हा एका मराठी वृत्तवाहिनीने चक्क त्यांच्या निधनाचे वृत्त झळकावले आणि नंतर त्यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. याच वृत्तवाहिनीच्या एका सूत्रसंचालकाने कहर केला. मंगळावर पाणी सापडल्याची बातमी आल्यावर एका तज्ज्ञाकडून माहिती घेताना विचारले की, सापडलेल्या पाण्याचा फायदा मराठवाड्यातील दुष्काळासाठी होईल का? हे सगळे कमी की काय, म्हणून काही लोकांकडून जी वक्तव्ये केली जातात, त्याचा उगाच सोयीस्कर अर्थ लावून खळबळ माजवली जाते. मागे नितीन गडकरी एकदा म्हणाले होते की, ’’विवेकानंद आणि दाऊद इब्राहिमयांचा ‘आयक्यू’सारखा होता, पण एकाने समाजासाठी चांगले कामकेले आणि दुसर्या,ने वाईट.’’ तर माध्यमांनी त्यांचे हे पहिलेच वाक्य चघळून एकच खळबळ माजवली आणि वादग्रस्त वाक्य म्हणून लेबलसुद्धा लावलं. असाच प्रकार आमीर खानबाबत. एका खासगी कार्यक्रमात आमीर खान म्हणाला की,’’माझी बायको म्हणाली की देश सोडून जाऊया का?’’ ही ‘ब्रेकिंग न्यूज’ इतके दिवस चालविली गेली की ’आमीरला देश असहिष्णू वाटतोय, आमीर देश सोडणार,’ अशा वावड्यासुद्धा उठवल्या गेल्या. सोशल मीडियावर आमीरला लक्ष्य केलं गेलं. शेवटी त्याला सांगावं लागलं की, ’’मी असे काही म्हणालो नाही, मी या देशात जन्मलो याच देशात मरणार.’’ आता योगी आदित्यनाथसुद्धा म्हणाले एक आणि त्याचा दुसराच अर्थ माध्यमांकडून लावला गेला. नुकतेच योगी आदित्यनाथ म्हणाले की, ’’हल्ली नागरिक बेजबाबदार होत चालले आहेत आणि सर्व गोष्टी सरकारवर ढकलत आहेत. काही दिवसांनी मुलं दोन वर्षांची झाल्यावरसुद्धा ही जबाबदारी ते सरकारवर ढकलतील.’’ एकूणच नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करण्यासाठी त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली. पण योगी कसे बेताल, योगी कसे चुकीचे, हे सांगण्यातच माध्यमांनी धन्यता मानली. कोर्टाच्या निकालाचा अन्वयार्थ लावतानासुद्धा चूक केली गेली. बाबा रामरहिमयाला बलात्कारप्रकरणी १० वर्षांची शिक्षा झाली, असे आधी सांगितलेले गेले. मग संध्याकाळी त्यांना उपरती झाली की, प्रत्येक आरोपामागे प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे म्हणजेच एकूण २० वर्षांची शिक्षा त्याला मिळाली आहे. माध्यमांना लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ म्हटले जाते. इतर तीन स्तंभ जर योग्य कामकरत नसतील, तर चौथ्या स्तंभाने आपली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशी रास्त अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय?

No comments:

Post a Comment