Total Pageviews

Monday 16 April 2012

निर्थक निरुपयोगी भारत-पाक संवाद वा बोलणी गेल्या आठवडय़ात जो भारत-पाक संवाद वा बोलणी झाली, तो सगळा प्रकारच निर्थक निरुपयोगी होता. ज्याला जागतिक राजकारणातश्रीयुत दहा टक्के' अशा टोपणनावाने ओळखले जाते, अशा झरदारींनी उगाच भारतवारी केली. मनमोहन सिंग यांनी ती यशस्वी होण्यास हातभार लावला. बाकी त्यातून काही निष्पन्न झाले नाही; होणारही नव्हते. गेल्या आठवडय़ात अचानक पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी भारतभेटीसाठी येऊन गेले. त्यातून पुन्हा जुन्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा सोहळा वाहिन्या वृत्तपत्रांनी पार पाडला. मग त्यात 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यापासून, सईद हाफीजवर खटला भरण्यापासून पाक तुरुंगात खितपत पडलेल्या सरबजीतसिंग याच्या सुटकेपर्यंत; सर्वच विषयांचे चर्वितचर्वण झाले. अर्थात वृत्तपत्रांना डझनभर पाने भरायची असतात आणि वाहिन्यांना चोवीस तास प्रक्षेपण करायचे असते. त्यासाठी नियमित ताजातवाना मालमसाला कुठून आणणार? मग अशा शिळ्यापाक्या घटना फोडणीला टाकून ताज्या म्हणून वाढाव्याच लागतात. तेव्हा झरदारी यांच्या भारतभेटीचा सोहळा व्हायचाच होता. त्याला पर्याय नव्हता की उपाय नव्हता. मात्र हे सर्व करताना किंवा त्यात भाग घेताना भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग किती गंभीर होते? किंवा पाकचे अध्यक्ष म्हणून इथे शाही इतमामात आलेले झरदारी किती गंभीर होते? याचा कोणी विचार तरी केला काय? कारण त्या दोघांपैकी कोणीही नवे काहीच बोलला नाही. जुन्याच विषयांची, मागण्यांची, आग्रहाची, तक्रारींची आश्वासनांची उजळणी तेवढी झाली.
याच्या आधी पाकिस्तानचे दोन अध्यक्ष भारतात येऊन गेले होते. त्यातले लष्करशहा जनरल झिया-उल-हक राजकारणापेक्षा अजमेर शरिफ दग्र्याला भेट देण्यासाठीच आले होते. दुसरे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ, वाजपेयी पंतप्रधान असताना आले होते. त्यांनी मात्र शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी दौरा केला होता. त्याच वेळी अजमेर शरिफ दग्र्याला भेट देण्याचा त्यांचा मानस होता, पण तो पूर्ण झाला नाही. त्यांची शिखर परिषद अपयशी झाली आणि अजमेरला जाणेही त्यांना साधले नाही.
भारतीय संपादकांशी केलेल्या एका विस्तारित संवादात त्यांनी भारताला खूश करणारा कुठलाही मसुदा केल्यास, आपण माघारी पाकिस्तानला परतू शकणार नाही. आपल्याला इथे दिल्लीत कोठी खरेदी करून इथेच मुक्काम ठोकावा लागेल, याची कबुली दिली होती. तेच पाकिस्तानचे भारतविषयक वा परराष्ट्र धोरण आहे. मग तिथला पंतप्रधान गिलानी असो की नवाझ शरिफ असोत; राष्ट्राध्यक्ष झरदारी असोत की मुशर्रफ असोत. भारताशी वैर हेच त्यांचे राष्ट्रीय धोरण आहे आणि त्यात बदल करणारा वा भारताशी मैत्रीचे संबंध जोडणारा कुणी, पाकिस्तानात राष्ट्रीय नेता होऊच शकत नाही आणि झालाच तर त्याला त्या अधिकारपदावर टिकून राहता येणार नाही. त्यामुळेच मग भारत-पाक भेटी चर्चा हा एक मुत्सद्देगिरीसाठी विरंगुळ्याचा खेळ होऊन बसला आहे. या विषयात लिहिणारे, बोलणारे अभ्यास करणारे, यांच्यासाठी तो जिव्हाळ्याचा विषय असेल. भारतासाठीही तो अगत्याचा मामला आहे. पण पाक राज्यकर्ते वा सत्ताधीश यांच्यासाठी दोन देशांतली बोलणी हा निव्वळ टाइमपास असतो.
चार वर्षापूर्वी मुंबईवर हल्ला झाला, त्यानंतर दोन्ही देशांतील बोलणेही बंद झाले होते. मग इजिप्तच्या शर्म अल शेख परिषदेत ती कोंडी फुटली. तेव्हाही भारताच्या पंतप्रधानांनी पाक पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना चार शब्द ऐकवण्याऐवजी, मुंबई हल्ल्यातील आरोपी सूत्रधार 'तोयबा' यांच्या पापाबद्दल बोलणे दूर राहिले, गिलानी यांनी भारतीय हेरखाते बलुचिस्तानात घातपात घडवत असल्याची तक्रार तेव्हा मनमोहन सिंग यांच्याकडे केली. त्यावर आपल्या पंतप्रधानांनी पुरावे असतील तर द्या, कारवाई करू, असे गिलानी यांना आश्वासन दिले होते. बाकी भारताला पाककडून होणार्‍या डोकेदुखीबद्दल काही बोलले गेले नाही. अशी भारत-पाक बोलणी संवादाची पूर्वपीठिका आहे. पाकला युद्धात चारीमुंडय़ा चीत करणारे शास्त्रीजी इंदिराजी यांनी नांगी ठेचल्यावर पराभूत पाक नेत्यांशी बोलणी केली होती. तेवढी वगळता कधी पाकनेते शहाण्यासारखे बोललेले नाहीत. हा इतिहास आहे. मग झरदारीसारखा राष्ट्राध्यक्ष झाला दोन देशांतील समस्या वाद सोडवण्यात कसली कामगिरी पार पाडू शकणार होता? त्याच्याकडून आशा बाळगणेच मूर्खपणा होता आणि झालेही तसेच. झरदारी यांची ही भारत भेट काहीही निष्पन्न होताच संपली.
अर्थात झरदारी राष्ट्राध्यक्ष झाले हाच एक राजकीय अपघात आहे. मुशर्रफ यांनी आपल्या हुकूमशाहीला लोकशाही म्हणूण मान्यता मिळवण्यासाठी काही राजकीय कसरती केल्या. त्यामुळे झरदारी तुरुंगातून बाहेर आले. एक अध्यक्षीय आदेश जारी करून मुशर्रफ यांनी आठ हजार खटले रद्दबातल केले. त्यातच झरदारी सुटले. आता एका याचिकेचा निकाल देताना पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांचा तो अध्यक्षीय आदेशच रद्द केला आहे. त्यामुळे त्यात मुक्त झालेल्यांवर पुन्हा खटले भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात पुन्हा झरदारी आरोपी झाले आहेत. पेचात अडकलेले झरदारी सध्या कमालीचे बेचैन आहेत. त्यांना भारत-पाक यांच्यातील वादविवादात काडीचा रस नाही. दोन्ही देशांतील वाद संपवण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या गळ्यात अडकलेला नव्या खटल्याचा फास सोडवायचा आहे. त्यामुळेच त्यात काही चमत्कार घडावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यात पीर फकीर, साधुसंत यांचे आशीर्वाद उपयोगी पडू शकतात, अशी भारतीय उपखंडातील लोकांची समजूत आहे. मग अशा चमत्कारी बाबा, फकीर संताकडे माणूस धाव घेत असतो. त्यात पुन्हा ज्याचे नाव मोठे कीर्ती मोठी तिकडे अडल्यानडल्यांचा ओढा असतो. अजमेरचा दर्गा त्यासाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळेच झरदारी यांना तिथे जायचे तर भारतात येणे आवश्यक होते. मूळ हेतू अजमेरला शरण जाण्याचा होता. त्यासाठी दिल्लीवारी हे निमित्त करण्यात आले.
त्यांनी आपल्या शाळकरी पुत्राला आईच्या जागी पक्षप्रमुख बनवले. त्याचे नाव बिलावल. तोही परवा पित्यासमवेत दिल्ली, अजमेर भेटीला आला होता. बेनझीर जेवढय़ा मुरब्बी राजकारणी होत्या, त्याचा लवलेशही झरदारी यांच्यात नाही. बेनझीरच्या मृत्यूची सहानुभूती मिळवून त्यांचा पक्ष अधिक संख्येने निवडून आला. बेनझीर हुशार अनुभवी होत्या. तेवढी झरदारी यांची कुवत नाही. जो राष्ट्राध्यक्ष म्हणून इथे आला, तो स्वत: पाकिस्तान न्यायालयासमोरचा एक गंभीर आरोपी आहे. त्याने तिथल्या न्यायव्यवस्थेसमोर मुंबई हल्ल्यातील सूत्रधार सईद हाफीज याच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा बाळगणे निव्वळ मूर्खपणा नाही काय? त्यांना ही झरदारी भेट म्हणजे आपल्या यशस्वी कारकीर्दीतला शिरपेचातील तुरा वाटला काय? शांतता हवी असेल तर आधी सईद हाफीजवर कारवाई करा, असे सिंग यांनी झरदारीला सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे. शांतता कोणाला हवी आहे? पाकिस्तानला शांतता हवी असेल तर त्याला भारतापुढे गुडघे टेकण्याची गरज नाही. त्यांच्या उचापतींपासून इतरांनाच शांतता हवी आहे, मुक्ती हवी आहे. अवघ्या जगालाही पाकच्या उचापतखोरीतून शांतता हवी आहे.झरदारी भेटीच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेत कसाबवरील खर्चासंबंधाने एक प्रश्न विचारला गेला. साडेतीन वर्षात या खुनी पाक जिहादीसाठी सरकारने चक्क 26 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी दिली. आपल्या उचापतखोर, खुनी, जिहादींची इतकी बडदास्त भारत सरकार ठेवत आहे. धर्मासाठी जिहाद करावा आणि जिहाद केल्यास स्वर्ग मिळतो, अशी समजूत आहे. पण कसाबला मात्र भारताच्या तुरुंगात जिवंतपणी स्वर्ग लाभला आहे. थोडक्यात गेल्या आठवडय़ात जो भारत-पाक संवाद वा बोलणी झाली, तो सगळा प्रकारच निर्थक निरुपयोगी होता.

No comments:

Post a Comment