उत्तर प्रदेशात मायावतींच्या राज्यात घडणाऱ्या एकेक घटना बघता हे एका लोकशाही देशातील राज्य आहे की मध्ययुगीन राजवटीतील नगर आहे असा प्रश्न पडावा. स्वत:ची प्रतिमा घडविण्यात मश्गुल असलेल्या मायावतींचे पोलिस प्रजेचे रक्षण करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार करू लागले आहेत. गेल्या महिन्यात नॉयडा येथील भट्टा पसोर्ल गावातील शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचारांमुळे उत्तर प्रदेशच्या पोलिस यंत्रणेचे आणि पर्यायाने मायावतींच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. आता लखीमपूर जिल्ह्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणामुळे त्यांची उरलीसुरली लाजही फेडली गेली आहे. हा प्रकार इतका अघोरी आहे की त्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षादेखील कमीच पडेल. परंतु यावर तातडीने कारवाई तर राहोच, पण बळी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यासही अजून मायावती बहेनजींना वेळ मिळालेला नाही. लोकक्षोभ फारच वाढला तेव्हा मायावतींनी मुलीच्या शवाचे पुन्हा एकदा पोस्टमॉटेर्म करण्याचे आदेश दिले. कारण पहिल्या पोस्टमॉटेर्म रिपोर्टमध्ये मुलीवर बलात्कार झालाच नसल्याचे म्हटले होते. पोलिस अधिकारीही या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगत होते. मुलीच्या आईने मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप केला. लखनौच्या डॉक्टरांचा नवा पोस्टमॉटेर्म रिपोर्ट आल्यावर सत्य बाहेर आले आहे. मुलीने आत्महत्या केली नसून, तिची हत्या केल्याचे हा अहवाल सांगतो. आता हडबडून जागे झालेल्या सरकारने पोलिस संचालकासह पहिला पोस्टमॉटेर्म रिपोर्ट देणाऱ्या तीन डॉक्टरांना निलंबित केले आहे. गुरे राखायला गेलेल्या या १४ वर्षांच्या मुलीचा मृतदेह तीन दिवसांनी निघासान पोलिस ठाण्याच्या बाहेर फासावर लटकताना दिसला. मीडियाने प्रकरणाला वाचा फोडली तेव्हा ११ पोलिसांना तात्काळ निलंबित केले गेले. नंतर मायावतींनी एक सहायक पोलिस निरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल अशा आणखी तिघांना निलंबित करून केंदीय गुप्तचर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सोपवला आहे. त्यांना १० दिवसांत तपासकाम पुरे करण्यास सांगण्यात आले असले तरी या प्रकरणात न्याय होईलच याचा भरवसा नाही, कारण कुंपणच शेत खाऊ लागले आहे
No comments:
Post a Comment