Total Pageviews

Monday 20 June 2011

COMMON MAN BUYING 2 & 4 WHEELERS & NOT HOUSES

घरांना उठाव का नाही
आपला देश जगातील एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. क्रयशक्तीत जसजशी वाढ होईल, तसतशी बाजारपेठ विकसित होत जाईल. ही बाजारपेठ प्रामुख्याने चैनीच्या समजल्या जाणार्‍या वस्तूंची आहे. उदा. फ्रिज, वॉशिंग मशीन वगैरे वस्तूंवर एकेकाळी उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी होती. आता मात्र मध्यमवर्गीय घरांतही या वस्तू आवश्यक झाल्या आहेत. इतकेच काय लोक भाड्याच्या घरात राहतात, पण चैनीच्या वस्तू वापरतात. या वस्तू रोखीने घेतलेल्या नसतात. त्या घेतलेल्या असतात हप्त्याने. या हप्त्यांच्या आयुष्यात घरांचे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते का? यावर विस्तृत अभ्यास होणे गरजेचे आहे. लोकमतच्या सिटी न्यूज एक्स्प्रेसने गेल्या आठवड्यात औरंगाबादेतील घरांच्या बाजारपेठेचा आढावा घेतला. तेव्हा फारसे आशादायक चित्र समोर आले नाही. औरंगाबादचा पसारा आता महानगराच्या पातळीवर गेला आहे. तरीही शहरातील घरांची बाजारपेठ अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे. औरंगाबादेतील नागरिक घराच्या हप्त्यापोटी महिन्याला अवघे १0 कोटी रुपये बँकांत भरतात. ही रक्कम दुचाकी वाहनांच्या हप्त्यांच्या पासंगालाही पुरणारी नाही. चार भिंती आणि एका छताशिवाय माणूस राहूच शकत नाही, तरीही घरापेक्षा इतर वस्तूंना लोक महत्त्व का देतात. याची कारणे मनोज्ञ आहेत. देशात रुजलेली चंगळवादी संस्कृती हे एक कारण त्यामागे आहे. घर घ्यायचे म्हटले की, स्वतची काही लाखांची जमापुंजी असणे आवश्यक असते. चंगळवादी संस्कृती तुम्हाला अशी बचत करण्यास वेळच देत नाही. टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, यांसारख्या वस्तू तसेच आऊटिंग, सहली, यांसारख्या मौजमस्तीच्या बाबी यावर भरमसाट खर्च होत राहतो. बरे चैनीच्या या सर्व वस्तू कर्ज काढून घेतलेल्या असतात. त्यांचे हप्ते भरताभरताच आयुष्य सरत जाते. मग घर केव्हा घेणार? तसेच त्याचे हप्ते कसे भरणार? आपल्या शहरांचे नागरी नियोजनही या समस्येला काही प्रमाणात जबाबदार आहे. आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट रुजलेली नाही. त्यामुळे लोकांना स्वतची वाहने ठेवणे आवश्यक ठरले आहे. ही वाहने अर्थातच हप्त्याने घेतली जातात. याशिवाय सर्वांत मोठे कारण म्हणजे घरांच्या किमती! घरांच्या किमती किती असाव्यात याचे कोणतेच धोरण आपल्याकडे नाही. बिल्डर ठरवतील ती किंमत, असा आपला खाक्या आहे. गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती बिल्डरांनी इतक्या वाढवून ठेवल्या की, त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या. त्यामुळे सामान्य माणसाने घराचे स्वप्न पाहणेच सोडून दिले. आज घरांना उठावच राहिलेला नाही, तो त्यामुळे. मुंबईत घरांच्या किमती ३0 टक्क्यांपर्यंत उतरल्या आहेत. औरंगाबादेत भाव चढे आहेत. मात्र घरांना उठाव नाही. रिसेलच्या घरांचे व्यवहार जवळपास ठप्प आहेत. मधल्या काही वर्षांतील रिअल इस्टेट बूममुळे घरमालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मालक घराच्या किमती अव्वाच्या सव्वा सांगतात. व्याजदर वाढल्यामुळे हप्ते आधीच वाढलेले आहेत. तसेच बाजारपेठेतील पैसाही कमी झालेला आहे. त्यामुळे व्यवहार होत नाहीत. औरंगाबाद शहरात उच्चभ्रू वसाहतींतील अनेक घरे कित्येक महिन्यांपासून विक्रीस उपलब्ध आहेत. काही प्रापर्टीज तर वर्षांपेक्षाही जास्त काळापासून विक्रीस उपलब्ध आहेत. पण त्याचे व्यवहार काही होत नाहीयेत. या क्षेत्रातील व्यवसायिकांनीच ही माहिती दिली. त्या मानाने अल्प उत्पन्न गटांतील घरांना उठाव आहे. कारण त्यांच्या किमतींचा आकडा छोटा असतो. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पैसेवाले लोक सध्या शेतजमिनींमध्ये गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे घरांना उठाव कमी झाला आहे. येत्या काही वर्षांत जमिनींचे भाव गगनाला भिडणार आहेत, हे गृहितक यामागे आहे, असे मानले जाते.

-
चक्रधर दळवी

No comments:

Post a Comment