Total Pageviews

Sunday 29 March 2020

अफगाणी शिखांचा संहार -तत्पूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्यात हिंदू, शीख आदी अल्पसंख्यकांचाच उल्लेख का, असा प्रश्न देशातल्या तमाम शहाण्यांनी केला होता. अशा सर्वच कथित बुद्धीमंतांना त्याचे उत्तर आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यातून मिळाले असेल, अशी अपेक्षा बाळगायलाही हरकत नाही-महाMTB

अफगाणिस्तानातील गुरुद्वारात मुजाहिदांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यांत २७ शिखांचा बळी गेला. तत्पूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्यात हिंदू, शीख आदी अल्पसंख्यकांचाच उल्लेख का, असा प्रश्न देशातल्या तमाम शहाण्यांनी केला होता. अशा सर्वच कथित बुद्धीमंतांना त्याचे उत्तर आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यातून मिळाले असेल, अशी अपेक्षा बाळगायलाही हरकत नाही.



सध्या संपूर्ण जगाला कोरोना विषाणूजन्य महामारीने विळखा घातलेला असून प्रत्येक ठिकाणी मदतकार्य, बचावकार्य सुरू असल्याचे दिसते. देशादेशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन वाचले-वाचवले पाहिजे, अशी भावना अनेकांच्या मनात जागत असल्याचेही पाहायला मिळते. मात्र, अशा संकटाच्या काळातही जिहादी-दहशतवादी मानसिकतेच्या संस्था, संघटना धर्मांधपणापायी आपल्याहून भिन्न धर्मीयांचा जीव घेत आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरातील शोर बाजार परिसरात असलेल्या एकमेव गुरुद्वारावरील झालेला फिदायीन हल्ला त्याचाच दाखला. गुरुवारी इथल्या गुरुद्वारामध्ये १५० हून अधिक शीख भाविक वैशाखीसाठी एकत्र जमले होते आणि त्याचवेळी आत्मघाती मुजाहिदांनी बॉम्बहल्ला केला. मुजाहिदांच्या या हल्ल्यात २७ शिखांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले.


भारताने व भारतीयांनी गुरुद्वारावरील या हल्ल्याचा निषेध केला तसेच मृत्युमुखी पडणार्‍यांप्रति सहानुभूतीही व्यक्त केली. दरम्यानच्या काळात गुरुद्वारावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट म्हणजेच ‘इसिस’ या संघटनेने घेतली. इसिसच्या या कबुलीजबाबातूनच हे स्पष्ट होते की, इराक व सिरियात या संघटनेचा खात्मा झाल्याचे दिसत असले तरी अफगाणिस्तानात ही संघटना सक्रिय आहे. तसेच जगावर भीषण आपत्ती कोसळलेली असताना आम्ही आमच्या कट्टरतेसाठी निरपराधांचे प्राण घेतच राहू, हेही या संघटनेने दाखवून दिले. अर्थात केवळ माझाच धर्म श्रेष्ठ अशा वर्चस्ववादी प्रवृत्तीचे लोक इतरांच्या विध्वंसावरच लक्ष केंद्रित करणार! तथापि, अफगाणिस्तानात हे आजच घडत नसून इथल्या अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू, शीख, बौद्ध, जैन वगैरेंचा संहार अनेक वर्षांपासून सुरू आहे. परिणामी, तिथे मुस्लीम वगळता इतर सर्वच धर्मीयांची संख्या नगण्य झाल्याचे दिसते.


अफगाणिस्तानातील हिंदू-शिखांसहित इतरांच्या कत्तलींची सुरुवात १९७० पासून झाली. हिंदू व शिखांना संपवण्यात इथले मुजाहिदी लढवय्ये आणि तालिबानी दहशतवादी आघाडीवर होते. मुजाहिद म्हणजे रशियाच्या लाल सेनेविरुद्ध अमेरिका आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी युद्ध करणारे लढवय्ये. हे लढवय्ये जिहादसाठी लढत असून तालिबान आणि त्यांच्यात थोडाफार फरक आहे. रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसल्यापासून मुजाहिदांना अमेरिका व पाकिस्तानने पाठबळ दिले. तेव्हापासून रशियन सैन्याबरोबरच अल्पसंख्य हिंदू व शिखांनाही त्यांनी मारायला सुरुवात केली. ५० वर्षांपूर्वी काबूल व परिसरात ७ लाखांपेक्षा अधिक हिंदू व शीख राहत होते. परंतु, अफगाण युद्ध संपेपर्यंत १९९० साली त्यांची संख्या लाखावर आली आणि १९९० साली लाखभर असणार्‍या हिंदू व शिखांची संख्या पुढच्या ३० वर्षांत केवळ ३ हजारांवर आली.


म्हणजेच गेल्या पाच दशकांच्या कालावधीत अफगाणिस्तानातील हिंदू व शीख होत्याचे नव्हते झाले. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या हिंदू व शिखांचे नेमके काय झाले? तर मुजाहिद आणि तालिबानी दहशतवादी या दोघांनीही इथल्या अल्पसंख्याकांवर जुलूम-जबरदस्ती केली. सामाजिक बहिष्कार आणि दडपशाही ही तर रोजची बाब झाली. इथल्या हिंदू व शिखांची घरे ओळखीच्या खुणांनी रंगवली गेली. मंदिरांची, गुरुद्वारांची तोडफोड केली, घरेदारे, दुकाने लुटली. अनेकांचे एकतर धर्मांतर केले किंवा जे त्याला तयार नव्हते, त्यांची हत्या केली. तसेच जे वाचले त्यांनी अफगाणिस्तानातून पलायन करत अन्य देशांत आश्रय घेतला. २१ व्या शतकातली शिखांवरील अत्याचाराची दोन उदाहरणे तर अतिशय हिडीस आहेत. २०१० साली तालिबानी दहशतवाद्यांनी दोन शिखांची हत्या करून त्यांचे मुंडके गुरुद्वारावर लटकावले, तर २०१८ साली अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणार्‍या शिखांच्या बसवर हल्ला करत २० पेक्षा अधिकांचा बळी घेतला. परंतु, इथल्या हिंदू व शीख समुदायावर सातत्याने हल्ले होत असताना संयुक्त राष्ट्रसंघ किंवा जागतिक मानवाधिकार आयोग वगैरेंनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही. जागतिक समुदायाने अफगाणिस्तानातील हिंदू व शिखांप्रति सहानुभूतीही दाखवली नाही. म्हणूनच बॉम्ब व बंदुकीच्या हल्ल्यांत ठार होणार्‍या या हिंदू-शिखांना जगण्याचा अधिकार नाही का, नव्हता का? हा प्रश्न निर्माण होतो.



अफगाणिस्तानातील मुजाहिदांच्या हल्लेखोरीमागे पाकिस्तानचाही हात आहे. भारत सरकारने गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानमध्ये अनेक विकासकामे केली. तसेच कित्येक अफगाणी विद्यार्थी भारतात येऊन शिक्षणही घेत आहेत. विकासकामांमुळे व अफगाणी जनतेच्या प्रगतीसाठी काम केल्यामुळे तिथली जनता भारतावर प्रेम करताना दिसते तर पाकिस्तानबद्दल त्यांना आपुलकी वाटत नाही. परिणामी, अफगाणिस्तानच्या विकासातील भारताच्या योगदानामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. मागील काही महिन्यांपासून तालिबान व अफगाण सरकारमध्येही शांतता चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळेही पाकिस्तान खवळला व त्याने तिथल्या अल्पसंख्याकांना लक्ष्य करायला सुरुवात केली, जेणेकरून अफगाणिस्तान सरकारची प्रतिमा खराब होईल. पाकिस्तानने यासाठी अफगाणिस्तानातील ‘इसिस’ संघटनेला कामाला लावले व म्हणूनच आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यामागे पाकिस्तानचाही हात असल्याचे समजते. अशा परिस्थितीत भारत सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे महत्त्व लक्षात येते. कारण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन वगैरे अल्पसंख्याकांवर अन्याय होतच आहे. त्याची उदाहरणे आताही समोर येत आहेत.

जगातली कोणतीही संस्था, संघटना त्यांच्या साह्यासाठी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे भारतालाच या सर्वांची जबाबदारी घेणे क्रमप्राप्त होते व तेच काम मोदी सरकारने केले. दरम्यान, अफगाणिस्तानातील गुरुद्वारावरील हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही भारत सरकारला विनंती केली. अफगाणिस्तानातील सर्वच शीख समुदायातील नागरिकांना एअरलिफ्ट करावे, जेणेकरून त्यांचे जीव वाचतील, असे त्यांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानातील हिंदू व शिखांवरील अन्याय-अत्याचाराची तीव्रता यातूनच स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर नागरिकत्व कायद्यात हिंदू, शीख आदी अल्पसंख्यकांचाच उल्लेख का, असा प्रश्न देशातल्या तमाम शहाण्यांनी केला होता. अशा सर्वच कथित बुद्धीमंतांना त्याचे उत्तर आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यातून मिळाले असेल, अशी अपेक्षा बाळगायलाही हरकत नाही.




No comments:

Post a Comment