Total Pageviews

Friday 20 March 2020

जैविक युद्ध आणि व्यवस्थेचं भवितव्य दिनांक 20-Mar-2020-TARUN BHARAT- मल्हार कृष्ण गोखले

वैज्ञानिक संशोधनाचा फायदा उठवत, जैविक नि रासायनिक अस्त्रं विकसित करून कमी खर्चात, कमी वेळात शत्रूपक्षाची समूळ कत्तल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कुणीच मागे नाही. नाझीवादी, साम्यवादी, समाजवादी, जपानी, चिनी, ख्रिश्चन, मुसलमान अशा सर्व प्रकारच्या हुकूमशहांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि आहे.


‘एम आय ६’ या ब्रिटिश गुप्तचर खात्यातला यशस्वी अधिकारी कमांडर जेम्स बाँड याला त्याचा बॉस अ‍ॅडमिरल ‘एम’ सूचना देतो की, त्याने स्वित्झर्लंडला जायचं आहे. स्वित्झर्लंडच्या पिझ ग्लोरिया नामक अत्यंत निसर्गरम्य पर्यटनस्थळी काउंट बाल्थाझार डि ब्ल्यूव्हिल हा उमराव कसले तरी शास्त्रीय प्रयोग करतो आहे. त्याच्या गोटात शिरायचं आणि त्याचं नेमक उद्दिष्ट शोधून काढायचं. काउंट बाल्थाझारच्या ऐतिहासिक वंशावळीचा संशोधक म्हणून बाँड त्याच्या प्रयोगशाळेत शिरतो. तिथे त्याला कळतं की, पाळीव गुरंढोरं आणि शेतमाल यांच्यामुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीवर तो संशोधन करीत आहे. प्रत्यक्षात ते संशोधन, शेतमाल आणि अन्नधान्य विषारी बनवून ब्रिटनचं मनुष्यबळ संपवून टाकण्याच्या उद्देशाने चालू असतं आणि ‘काउंट बाल्थाझार’ हे नाव धारण केलेला इसम दुसरा तिसरा कोणी नसून अर्न्स्ट ब्लोफेल्ड असतो. डॉ. अर्न्स्ट स्टाव्हरो ब्लोफेल्ड! महायुद्धातल्या जर्मनीच्या पराभवामुळे संतापलेला आणि ब्रिटनचा सूड घेण्यासाठी टपलेला जर्मन वैज्ञानिक डॉ. ब्लोफेल्ड!



ब्लोफेल्ड बाँडला ओळखतो, पण कोणत्याही क्षणी ठार होण्याची शक्यता असलेला बाँड अखेर ब्लोफेल्डवर मात करून यशस्वी होतो. ब्रिटन आणि अन्य लोकशाही देशांविरोधात जैविक युद्ध पुकारण्यास सज्ज झालेल्या ब्लोफेल्डची प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली जाते. तो स्वतः मात्र निसटतो. इयान फ्लेमिंग या जेम्स बाँड कथामालेच्या लेखकाच्या ‘ऑन हर मॅजेस्टीज सीक्रेट सर्व्हिस’ या १९६३ साली लिहिल्या गेलेल्या कांदबरीचं हे कथानक आहे. इयान फ्लेमिंगचं वैशिष्ट्य असे आहे की, तो स्वतःच एकेकाळी गुप्तहेर होता. ब्रिटिश रॉयल नेव्हीचं स्वतःचं असं ‘नेव्ही इंटेलिजन्स डिपार्टमेंट’ ऊर्फ ‘निड’ हे गुप्तवार्ता खातं होतं. त्यात स्वत: फ्लेमिंगनेच अनेक गुप्त कामगिर्‍या पार पाडलेल्या होत्या. शिवाय त्याच्या अन्य सहकार्‍यांनी पार पाडलेल्या कामगिर्‍याही त्याला माहीत होत्या. निवृत्तीनंतर फ्लेमिंग ब्रिटन सोडून वेस्ट इंडिजमध्ये जमैका इथे स्थायिक झाला. तिथेच त्याने ‘जेम्स बाँड’ ही गुप्तहेर कथामाला लिहायला सुरुवात केली. पाहिलेल्या, ऐकलेल्या असंख्य जुन्या-नव्या गुप्त कामगिर्‍यांचा मसाला वापरून त्याने आपली कथानकं सजवली. त्यामुळे त्याच्या कथानकांमध्ये पूर्णपणे काल्पनिक असं काही नसतं. घडलेल्या घटनाच भरपूर रंगवून, फुलवून तो मांडतो. मग वरील कथानकात काही सत्य होतं का? ब्रिटनविरुद्ध खरोखरच कुणी एखादा सूडाने पेटलेला वैज्ञानिक किंवा एखादी गुप्त संघटना असं जैविक युद्ध खेळायला सिद्ध झाली होती का? या प्रश्नाला मात्र कुणीही, कसलंही अधिकृत उत्तर देत नाही.



‘वूहान कोरोना’ मुळे संपूर्ण मानवजात भयभीत झालेली असताना जैविक आणि रासायनिक युद्धांच्या अशा अनेक गोष्टी पुढे येतात. विशेष म्हणजे कोरोनासाठी संपूर्ण पाश्चिमात्त्य जग जरी चीनला जबाबदार धरत असलं तरी असले घातक प्रयोग करण्यात कुणीही मागे नाही. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जगभरात, हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये अणुहल्ल्यात ठार झालेल्या जपानी नागरिकांचे स्मरण केले जाते. ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या वरील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून लाखो लोकांना अवघ्या काही मिनिटांमध्ये ठार केलं होतं. जपानने त्यामुळे ताबडतोब शरणागती पत्करली आणि त्यामुळे सहा वर्षं सुरू असलेलं आणि संहारक असं महायुद्ध संपलं, हे आपल्याला माहीतच आहे. दर ऑगस्ट महिन्यात हिरोशिमा-नागासाकीच्या मृतांना आदरांजली वाहतानाच अमेरिकेच्या नावानेही बोटं मोडण्यात येतात. का? तर त्यांनी निरपराध नागरिकांवर अणुबॉम्ब टाकला. हे असं घडणं अपरिहार्यच आहे. पण, हे करताना एक महत्त्वाची गोष्ट विसरली जाते. किंबहुना, ती मुळातच कुणाला माहीत नसते. ती म्हणजे जपानने अमेरिकेविरुद्ध जैविक युद्ध पुकारण्याची सुरू केलेली जय्यत तयारी.

‘इंपीरियल जॅपनीज आर्मी युनिट ७३१’ हे जपानी लष्कराचं वैज्ञानिक अस्त्र शोधपथक अत्यंत गुप्तपणे अनेक प्रकारच्या रोगजंतूंवर प्रयोग करीत होतं. लेफ्टनंट जनरल डॉ. शिरो अशीई हा नामवंत जपानी वैज्ञानिक या पथकाचा प्रमुख होता. जपानने १९३१ साली चीनवर स्वारी करून चीनचा मांचुरिया हा प्रांत हडपला होता. या मांचुरियात डॉ. शिरो अशीई आणि त्याचे लोक चिनी युद्धकैद्यांवर नाना प्रकारच्या जंतूंचे नि विषाणूंचे प्रयोग करीत. जपानने १९४१ साली अमेरिकेच्या पर्ल हार्बर नाविक तळावर हल्ला करून तिची दाणादाण उडवली. पण, अमेरिकेची सामरिक शक्ती अवाढव्य आहे. पूर्ण क्षमतेने युद्धात उतरलेल्या अमेरिकेसमोर आपण किरकोळ आहोत, ही जाणीव जपानला होती. त्यामुळे जपानने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी, पण तितकाच क्रूर आणि गलिच्छ बेत आखला होता. २२ सप्टेंबर, १९४५च्या रात्री जपानी विमानं अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील कॅलिफोर्निया प्रांतातील सानदिलॉगो शहरावर बॉम्बफेक करणार होती. या बॉम्बमध्ये स्फोटकं नव्हती, तर ‘प्लेग’ या अत्यंत सांसर्गिक आणि प्राणघातक रोगाचे जंतू होते. ‘प्लेग’ किंवा ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘ब्युबॉनिक प्लेग’ असं म्हटलं जातं, त्या रोगाने एकेकाळी युरोप खंडात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ‘ब्लॅक डेथ’ या नावानेही ओळखल्या जाणार्‍या प्लेगने अक्षरशः लाखो माणसं किड्यामुंग्यांप्रमाणे मेली होती. त्याच प्लेगचे रोगजंतू अमेरिकेतसोडून द्यायचे नि हाहाकार माजवून द्यायचा, असा जपानचा बेत होता. या मोहिमेचं सांकेतिक लष्करी नाव होतं, ‘ऑपरेशन चेरी ब्लॉसम अ‍ॅट नाईट.’ पण, ती मोहीम झालीच नाही. ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५ ला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकन अणुबॉम्ब पडले नि हादरलेल्या जपानने १५ ऑगस्ट १९४५ ला संपूर्ण शरणागती पत्करली.



पण, या सगळ्या तर पाऊणशे वर्षांपूर्वीच्या गोष्टी झाल्या. १९९१ सालचं आखाती युद्ध आठवतं का? इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैन याने शेजारच्या कुवेत या चिमुकल्या देशावर हल्ला करून तो हडप केला. तेव्हा सौदी अरेबिया आणि अमेरिका यांनी इराकवर हल्ला करून सद्दामचा पराभव करून कुवेत मुक्त केला. या युद्धाच्या वेळी इराकने संयुक्त राष्ट्रसंघाकडे अशी अधिकृत कबुली दिली की, “आम्ही ‘बोटुलिनम’ नावाचं अतिजहाल विषारी रसायन १९ हजार किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवून त्यापैकी १० हजार किलो बाँब्समध्ये भरलंदेखील होतं. पण, त्याचा उपयोग आम्ही केला नाही.” हे रसायन इतकं घातक आहे की, १० हजार किलोमध्ये पृथ्वीवरील सर्व सजीव तीनवेळा संपूर्ण नष्ट झाले असते. १९८७-८८ मध्ये सद्दामने इराकच्या उत्तरेकडच्या डोंगराळ भागात राहणार्‍या कुर्द जमातीच्या बंडखोरांना चिरडून टाकण्यासाठी खुशाल विषारी वायू आणि विषारी रसायनं वापरली होती. ४५०० गावांमधल्या किमान १ लाख, ८२ हजार कुर्द लोकांना मस्टर्ड गॅस, नर्व्ह एजंट जीबी, सरीन इत्यादी अतिविषारी वायू किंवा रसायनांचा वापर करून सरळ ठार मारण्यात आलं. त्यापूर्वी सद्दामने आपल्या सैनिकांना आदेश दिला होता म्हणे की, कुर्दांची घरंदारं, गुरंढोरं, पैसाअडका, मुलंबाळं, बायकामुली या तुमच्याच आहेत. तेव्हा पहिल्यांदा हवं ते उचला नि मग कुर्दांना संपवा. सद्दामच्या सैनिकांनी आनंदाने आज्ञापालन केलं. सद्दाम स्वतःला ‘समाजवादी’ म्हणवत असे. कसला सॉलिड समाजवाद आहे ना!



असो. तर मुद्दा काय की, वैज्ञानिक संशोधनाचा फायदा उठवत, जैविक नि रासायनिक अस्त्रं विकसित करून कमी खर्चात, कमी वेळात शत्रूपक्षाची समूळ कत्तल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कुणीच मागे नाही. नाझीवादी, साम्यवादी, समाजवादी, जपानी, चिनी, ख्रिश्चन, मुसलमान अशा सर्व प्रकारच्या हुकूमशहांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि आहे. लोकशाहीवादी अमेरिकेला अशी महत्त्वाकांक्षा नाही, असं बिलकुल नव्हे, पण आता प्रत्यक्ष एखादा देश, भूभाग हा हातात ठेवून, त्याचं शोषण करत राहाणं हे खर्चिक आहे, हे ओळखून अमेरिकेने जगावर राज्य करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेला एक मायावी सोेफिस्टिकेटेड रूप दिलं. ते म्हणजे ‘ग्लोबलायझेशन.’ एकीकडे तिचे नवनवीन शस्त्र आणि जैविक वा अन्य वैज्ञानिक अस्त्र बनवण्याचे प्रयोग चालू आहेतच. ते थांबलेले नाहीत, पण दुसरीकडे जागतिकीकरणामुळे अमेरिकेकडे जगातील अफाट संपत्ती आपोआप येतेच आहे.



‘वूहान कोरोना’च्या जागतिक संकटामुळे मनुष्यहानी होईल, न होईल, कमीत कमी होईल, अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. पण, ही साथ आटोक्यात आल्यानंतरचा काळ हा जास्तच कसोटी पाहणारा असेल. जगातल्या प्रत्येक देशाची नुसती अर्थव्यवस्थाच नव्हे, तर संपूर्ण समाजरचना, समाजव्यवस्थाच ढवळून निघणार आहे. पुरवठा आणि मागणीची जागतिक साखळी व्यवस्था मागे पडून पुन्हा स्थानिक मागणी, पुरवठा प्रक्रिया निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कारणांसाठी मोठमोठ्या कार्यालयांमधून एकत्र येणं, प्रवास, परिषदा, बैठका, सेमिनार्सऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे कामं होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट रुग्णालयांऐवजी स्थानिक छोटी रुग्णालयं प्रभावी नि उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. अतिरिक्त केंद्रीकरण म्हणजेच ‘ग्लोबलायझेशन’ संपून विकेंद्रीकरण सुरू होण्याची चिन्हे आहेत. बघू या काय नि कसं घडतं?


No comments:

Post a Comment