Total Pageviews

Thursday 31 August 2017

चिनी मालावर बहिष्काराचे सगळ्यात ठोस कारण हे आहे की, चीनची भारतभूमीवर वक्रदृष्टी आहे. चीन सगळीकडून भारताची कोंडी करतो आहे, अतिरेकी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करतो आहे. चीन मालाच्या निर्यातीतून भारताकडून जो नफा कमावतो तो भारतविरोधी कारवाया करण्यात उपयोगात आणतो. काही व्यापारी संघटनांनी या अभियानाला पाठिंबा दिला, हे एक शुभचिन्ह आहे. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका सर्व वयोगटातील नागरिकांची आहे.


राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान August 31, 2017018 Share on Facebook Tweet on Twitter सहभाग स्वदेशी हा शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या जुलमी सत्तेला विरोध करण्यासाठी विदेशी कपड्यांची होळी, स्वदेशीचा वापर, हा मंत्र भारतीयांना दिला. पारतंत्र्यातून देशाला मुक्त करायला किती देशभक्तांनी प्राणाचे बलिदान दिले, याची गणती नाही. आज आपण स्वतंत्र भारताचे सुजाण नागरिक म्हणून पुन्हा गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. भारत स्वतंत्र राष्ट्र आहे, पण देश आर्थिक गुलामगिरीत जाऊ नये म्हणून सगळ्या जाणत्या लोकांनी जागे होण्याची व उर्वरित समाजाला जागृत करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीत चीनच्या वस्तूंना विरोध करून भारतीय नागरिकांनीच या अभियानाची सुरुवात केली. या वर्षी भारतीय वस्तूंची मागणी उपभोक्तावर्गाकडून मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी हे स्वदेशी अभियान बळकट करण्याची गरज आहे. कोणी म्हणेल सरकार मालाची आयात बंद का करत नाही? आपणच आपल्या व्यापारी बांधवांचे नुकसान करायचे का? आपण चिनी मोबाईलवर बहिष्कार टाकून याचा प्रारंभ करू शकतो. कारण, मोबाईलच्या किमती काही हजारात असतात. असे झाले तर चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. सध्या ‘मेक इन इंडिया’ हा शब्द सगळ्यांनीच ऐकला आहे. कौशल्यविकास हाही शब्द वारंवार कानावर पडतो आहे. छोट्या छोट्या कौशल्यविकासाच्या अभ्यासक्रमांवर लक्ष दिले जात आहे व त्यासंबंधी प्रचार सुरू आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि या तरुण रक्तातील उत्साह वाढावा यासाठी चहुबाजूने काम सुरू आहे. गरज आहे हे काम समजून घेण्याची व संघटन मजबूत करण्याची! आपल्याला आपली बाजू सकारात्मक रीतीने पूर्ण शांततेने समजवून हे वैचारिक युद्ध लढायचे आहे. चिनी मालावर बहिष्काराचे सगळ्यात ठोस कारण हे आहे की, चीनची भारतभूमीवर वक्रदृष्टी आहे. चीन सगळीकडून भारताची कोंडी करतो आहे, अतिरेकी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करतो आहे. चीन मालाच्या निर्यातीतून भारताकडून जो नफा कमावतो तो भारतविरोधी कारवाया करण्यात उपयोगात आणतो. काही व्यापारी संघटनांनी या अभियानाला पाठिंबा दिला, हे एक शुभचिन्ह आहे. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका सर्व वयोगटातील नागरिकांची आहे. आपण सर्वांनी मिळून चीनच्या या विघाती मानसिकतेचा विरोध करण्याची व भारतीयांच्या संघटनाची ताकद दाखवण्याची ही योग्य वेळ आहे. भारतातून प्रचंड नफा कमवायचा व त्या नफ्यातून लष्करी सामर्थ्य वाढवायचे आणि भारतालाच धमक्या द्यायच्या, या चिनी क्रूर मानसिकतेला विरोध करण्यास भारतीय नागरिकांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. आता या अभियानाच्या रूपाने जे अजूनही नाण्याची दुसरी बाजू पाहण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे, सगळ्यांनी मिळून काम करण्याची व त्या संधीचे सोने करण्याची ही योग्य वेळ आहे. प्रत्यक्ष अभियानात सहभागी होऊन तसेच अभियानाला पाठिंबा देऊन चीनच्या मानसिकतेचा विरोध करा. ताठ मानेने प्रतिकार करायचा हे ठरवा, अंतिम निर्णय विचार करून घ्या, इतकेच आवाहन आहे. जाणत्या नागरिकांचा निर्णय प्रतिकार करणे हा असणार, याची पूर्ण खात्री आहे. सीमेवर आपले सैनिक रात्रंदिवस देशाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतात. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात चीन ज्या गोळ्या वापरतो त्या गोळीवर भारतीय नागरिकांचे नाव नसावे, असे वाटते. चीनमध्ये तयार होणार्‍या वस्तूच चीन वापरतो, मग त्या महाग असल्या तरी तेथील नागरिक देशप्रेमामुळे त्या विकत घेतात. आज आपण इतका संकल्प तर करू शकतो की, ज्या वस्तूला भारतीय पर्याय उपलब्ध असेल तिथे तरी चीनचा किंवा विदेशी माल खरेदी करणार नाही. आज सैनिकांनीदेखील भारतातल्या नागरिकांची मदत मागितली आहे. ते म्हणतात, मी एकही चिनी सैनिक या भारतभूमीत घुसू देणार नाही आणि तुम्ही त्यांचा माल भारतीय बाजारपेठेत येऊ देऊ नका. सैनिकांच्या आवाहनाला आज नागरिकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. इतक्या वर्षांत देशाची जी हानी झाली ती इतक्या कमी दिवसात भरून काढणे शक्य नाही. सध्या भारताची बाजू सगळीकडे ज्या समर्थपणे मांडण्याचा प्रयत्न होतो आहे त्याचे चांगले पडसाद संपूर्ण देश अनुभवतो आहे. काही बाबतीत सकारात्मक बदलही घडून आला आहे. हळूहळू चीनची ही विस्तारवादी भूमिका इतर देशांनापण समजली आहे. तिथेही चीनला प्रचंड विरोध होतो आहे. काही आकड्यांवर लक्ष देऊ या. आपल्या देशातून जेवढा माल चीनला निर्यात होतो त्यापेक्षा चीन वीस पटीने अधिक माल भारतात पाठवतो. या आकड्यांवरून हा व्यापार तोट्याचा आहे, हे सहज लक्षात येते. मग इतका विदेशी तोटा दरवर्षी एकट्या चीनकडून होत असताना, निदान देशाचा विचार करून देशात राहणार्‍या लोकांनी आपली जबाबदारी उचलायला हवी, असे मनापासून वाटते. व्यापारी लोकांना माहिती आहे, व्यापार हा फायद्यासाठी व चार पैसे कमवायला करतात. चिनी वस्तू विकून तुम्हाला मिळणारा फायदा हा सध्या जरी तुम्ही नफ्याच्या स्वरूपात पाहात असाल, तरी हा नफा तुम्ही ज्या भारतभूमीत राहता तिच्यासाठी घातक सिद्ध होतो आहे. या परिस्थितीची झळ आज नाही तर उद्या सगळ्यांनाच भोगावी लागणार. व्यापारीवर्ग जास्त समजदार आहे. अनेक व्यापारी संघटनांनी यापुढे चिनी माल आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुभचिन्ह आहे. आपण कोणाला, असलेल्या वस्तू फेका असे म्हणू शकत नाही, पण निदान यापुढे खरेदी करताना जागृत ग्राहक व्हा, असे आवाहन करू शकतो. सोबतच व्यापारीवर्गालाही जागृत विक्रेता होण्याची विनंती करू शकतो. विचार शुद्ध असले व भाषा योग्य वापरली, तर एक माणूस संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करून हे अभियान बळकट करण्यास मदत करू शकतो. आता भारतीय म्हणून आपली जबाबदारी व भूमिका घेण्याची वेळ आली आहे. नकारात्मक दृष्टीने पाहाल, तर मुद्दा किचकट होईल, यात शंका नाही. पण, सकारात्मक भूमिकेतून विचार करायला सुरुवात केली तर विषय पटेल व कृतीही घडेल. चीन-भारत संबंध, परराष्ट्रधोरण, आंतरराष्ट्रीय करार, चीन व पाकिस्तानसोबत असलेले भारताचे सीमावाद, चीनने भारतविरोधी विघातक कृत्यांमध्ये पाकिस्तानला दिलेला पाठिंबा, न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये भारताला सामील करून घेण्यास चीनने केलेला विरोध, मसूद अझहर या कुख्यात आतंकवाद्याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित न करू देणे, जैश-ए-मोहोम्मद या संघटनेला मदत करणे… अशी एक नाही हजार कारणं आहेत, ज्यासाठी आपण चीनला विरोध करायला हवा. १९६२ च्या युद्धात भारताचा एक लाख वर्ग कि.मी. भूभाग चीनने बळकावला आहे. या युद्धात भारताचे हजारो जवान शहीद झाले. एक सामान्य नागरिक म्हणून आपण सीमेवर लढू शकत नाही, पण आपल्यासाठी स्वतःचा जीव संकटात टाकणार्‍या सैनिकांसाठी या देशांतर्गत चालणार्‍या ट्रेड वॉरमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकतो. आता चीन, अरुणाचलसहित काही जागेवर आपला हक्क सांगतो आहे. चिनी सैनिक सतत भारतीय भूमीत घुसून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सिक्कीमला गेलो, तेव्हा नथुला पास येथे सीमा भागातील परिस्थिती पाहिली. अतिशय खराब व अनिश्‍चित वातावरण, कठीण परिस्थितीत आपले सैनिक आपले कर्तव्य पार पाडतात. सैनिकांना भारतीय नागरिकांच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. प्रत्येकाने जमेल त्या पद्धतीने या देशविघातक कृत्यांना विरोध केला, तर अंतिम विजय आपलाच असेल, यात शंका नाही. कृपया, या अभियानाला देशभक्तीच्या नजरेने पाहा व काही दिवसांकरिता नाही तर कायमस्वरूपी राबवा, ही विनंती. धन्यवाद

No comments:

Post a Comment