Total Pageviews

Wednesday 8 October 2014

बहिष्कार टाका चिनी वस्तूंवर

बहिष्कार टाका त्या चिनी वस्तूंवर- T BHARAT 08 OCT कॉंग्रेसचे शासन होते तोपर्यंत चीन आणि पाकिस्तानने भारताला नामोहरम करून सोडण्याची एकही संधी सोडली नाही. चिन्यांनी भारताच्या भूभागात घुसून आपले तंबू उभे केल्याच्या घटना गेल्या वर्षभरापासून सुरूच आहेत. तिकडे पाकिस्तानच्या नापाक हरकती थांबण्याचे नाव नाही. मोदी सरकार येण्यापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी आमच्या एका जवानाचे शिर कापून नेले होते. आताही त्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देण्याची मोकळीक संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे आणि पहिल्याच दिवशी तिघा नापाकांचा खात्माही झाला आहे. भारत-पाक सीमेवरील अनेक ठिकाणी छोटे युद्धच सुरू आहे. मागे आपल्या सहकार्‍याचे शिर कापून नेण्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी राजपूत रेजिमेंटचे जवान उतावीळ झाले असणार. येणार्‍या काही दिवसांत ते दिसणारच आहे. चीनलाही मोदींनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, भारतासोबत व्यवहार करायचा असेल तर आधी सीमेवरून आपले सैनिक मागे घ्या. चीनने ते मुकाट्याने मान्य केले आहे. पण, चीनची आणखी एक भीती भारताला गेल्या काही वर्षांपासून भेडसावत आहे. ती म्हणजे भारतात चिनी वस्तूंचा सुळसुळाट. प्रत्येकच क्षेत्रात चीनने शिरकाव केल्यामुळे आमचे हजारो लघुउद्योग बंद पडले. अनेक चिनी खेळणी व वस्तू विषारी द्रव्ये वापरून तयार केली जातात, असे अनेक अहवाल आले आहेत. भारतीयांनी केवळ याच नव्हे, तर सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची नितांत गरज आहे. केवळ त्या वस्तू स्वस्त आहेत, म्हणून जनता सहज ‘मेड इन चायना’च्या वस्तूंवर भाळते आणि विकतही घेते. पण, यामुळे आपली अर्थव्यवस्था खिळखिळी होते, याचा प्रचार करण्याची गरज आहे. स्वदेशी जागरण मंचाने चिनी वस्तूंच्या आयातीवर बंदी आणण्याची मागणी कितीतरी आधीपासून केली आहे. कारण, या वस्तू स्वस्त असल्या तरी त्या आरोग्यासाठी घातक आणि अतिशय कमी वेळात खराब होणार्‍या आहेत. त्यामुळे हिंदूंनी या दिवाळीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करावा. आतातर मुस्लिमांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन लखनौचे काझी आणि ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगली महाली यांनी केले आहे. त्यांचे आवाहन बर्‍याचदा फतवा असल्याने मुस्लिम बांधव कदाचित त्या आवाहनाला स्वीकारतीलही. देशातील लघु उद्योग आणि कुटीर उद्योग बंद पडत असून भारतीय कामगार व कारागीर बेरोजगार होत असल्याची चिंता मौलानाने व्यक्त करीत चिनी वस्तूंसोबत दोन हात करण्याची ताकद दाखविली. आपल्या देशातील मुस्लिमांनी देशातील अर्थव्यवस्थेवर येणारे संकट दूर करण्यासाठी घेतलेला निर्णय उचितच म्हणायला हरकत नाही. त्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. चीनच्या वस्तूंवर बंदी आणण्यासाठी मौलवींचा पुढाकार आणि मेक इन इंडियाचा नारा या दोन्ही बाजू भारतीय अस्मिता जागृत करणार्‍याच आहेत...

No comments:

Post a Comment