Total Pageviews

Thursday 25 February 2016

हे कसले स्वातंत्र्य?

हे कसले स्वातंत्र्य? Thursday, February 25th, 2016 घराघरातून छत्रपती शिवराय, सावरकर, नेताजी, भगतसिंग, चापेकर बंधू जन्मास यावेत व हा देश अखंड राहावा हेच आमचे स्वप्न होते. मात्र त्याच देशात आज ‘घराघरातून अफझल गुरू निर्माण होतील’ अशा धमक्या देत देशद्रोह्यांचे पुण्यस्मरण केले जात आहे. हे कसले स्वातंत्र्य? संसदेत याबाबत फक्त चर्चा घडेल व न्यायालयात कायद्याचा कीस निघेल. सत्ताधारी शब्दांचा कीस पाडतील. या देशात दुसरे काय होणार? हे कसले स्वातंत्र्य? राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले आहे की, सत्यम, शिवम, सुंदरम म्हणजेच राष्ट्रवाद, पण ते ज्या काँग्रेस पक्षातून आले आहेत त्यांना राष्ट्रवादाची ही व्याख्या मान्य आहे काय? संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना देशाच्या राष्ट्रपतींनी आपले विचार मांडले आहेत. संसदेत कामकाज व्हावे, चर्चा घडावी, गोंधळ घालण्यासाठी संसद नाही, असेही राष्ट्रपतींनी बजावले असले तरी हे महनीय विचार लक्षात कोण घेतोय? असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रपतींनी राहुल गांधी यांची एक शाळा घ्यावी व त्यांना हे सर्व समजावून सांगावे. देशात सध्या ज्या घटना घडत आहेत त्या पाहता राष्ट्रपतींनी मांडलेले विचार चिंतनीय आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आवारातील घटना म्हणजे फक्त ठिणग्या आहेत. देशाच्या पोटात काय खदखद सुरू आहे ते विद्यापीठातील घटनांवरून दिसते. स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारकांचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांच्या स्वप्नातील देश बनवूया व त्यांचे ऋण फेडूया, असेही राष्ट्रपती महोदयांनी स्पष्ट केले, पण स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्त व घामातून निर्माण झालेला हा देश आता कडेलोटाच्या टोकावर उभा आहे. हिंदुस्थानचे तुकडे तुकडे व्हावेत. कश्मीर, केरळ, आसाम यांसारखी राज्ये हिंदुस्थानपासून स्वतंत्र व्हावीत अशा प्रकारच्या घोषणा देशाच्या राजधानीतील विद्यापीठात दिल्या जातात. ज्याने देशाच्या संसदेवर हल्ला केला व त्या देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली सर्वोच्च न्यायालयाने ज्याला फासावर लटकवले त्या अफझल गुरूची ‘पुण्यतिथी’ साजरी होते व घराघरातून अफझल गुरू निर्माण होतील अशा धमक्या उघड उघड दिल्या जातात, हे काही चांगल्या कायदा-सुव्यवस्थेचे व सर्व काही आलबेल असल्याचे लक्षण नाही. चार-पाच जणांचे एक टोळके विद्यापीठाच्या आवारात उंडारत दिल्ली पोलिसांची खिल्ली उडवते, कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देते व पोलीस विद्यापीठाच्या दारात हाताची घडी घालून आदेशाची वाट पाहत उभे राहतात. विद्यापीठे ही स्वायत्त असल्याचे सांगून पोलीस आत जात नाहीत ही पळवाट आहे, डरपोकपणा आहे. विद्यापीठे जर देशद्रोहाचे अड्डे बनली आहेत तर आग लावा तुमच्या त्या स्वायत्ततेला आणि स्वातंत्र्याला! आत घुसून या टोळक्यास फरफटत बाहेर काढले असते तर देशाने तुमची पाठ थोपटली असती. जवान सीमेवर छातीवर गोळ्या झेलतात व इकडे स्वायत्ततेच्या नावाखाली देशद्रोही टोळक्यास पकडता येत नाही हे असले स्वातंत्र्य आम्हाला नको. कन्हैया व उमर खालीदचे जे काय व्हायचे ते कायद्याने होईल. कोण खरे बोलते व कोण बनाव करते ते न्यायालयासमोरच ठरू द्या, पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अनेकांची पोल खोलली आहे. आमचे पोलीस, आमचे सीबीआय, आमचे लष्कर सुवर्ण मंदिरात घुसू शकते, पण दिल्लीतील विद्यापीठ आवारात घुसून देश तोडण्याचे कारस्थान करणार्‍यांना पकडू शकत नाही. आमचे पोलीस व सीबीआय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात व घरात घुसू शकतात. आमचे पोलीस केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांच्या घरात घुसून त्यांना अपमानित करू शकतात, त्यांना अटक करून तुरुंगात पाठवू शकतात आणि त्याबद्दल स्वत:ची पाठही थोपटून घेऊ शकतात, पण दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफझल गुरूचे ‘पापस्मरण’ करणार्‍यांना, देश तोडण्याची भाषा करणार्‍यांना अटक करताना त्यांना विद्यापीठाच्या स्वायत्ततेची आठवण होते. घराघरातून छत्रपती शिवराय, सावरकर, नेताजी, भगतसिंग, चापेकर बंधू जन्मास यावेत व हा देश अखंड राहावा हेच आमचे स्वप्न होते. मात्र त्याच देशात आज ‘घराघरातून अफझल गुरू निर्माण होतील’ अशा धमक्या देत देशद्रोह्यांचे पुण्यस्मरण केले जात आहे. हे कसले स्वातंत्र्य? संसदेत याबाबत फक्त चर्चा घडेल व न्यायालयात कायद्याचा कीस निघेल. सत्ताधारी शब्दांचा कीस पाडतील. या देशात दुसरे काय होणार? - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/he-kasle-swatantrya#sthash.psQAmHmu.dpuf

No comments:

Post a Comment