Total Pageviews

Tuesday 22 July 2014

ISREAL PALESTIN HAMAS GAZA VIOLENCE

SAMNA EDITORIAL इस्रायल आणि पॅलेस्टीन या जन्मजात वैरी असलेल्या देशांमध्ये भडकलेल्या युद्धाने सार्या जगाला घोर लावला आहे. गेल्या १५ दिवसांपासून या दोन देशांतील रक्तरंजित संघर्षात ६०० हून अधिक लोक ठार झाले आणि हजारो लोक जायबंदी झाले आहेत. उभय देशांच्या सीमेवर असलेला ‘गाझापट्टी’ हा भाग युद्धाचा केंद्रबिंदू आहे. युद्धाने एवढे रौद्र रूप धारण केले आहे की, हा संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस ही लढाई आणखी तीव्र होत आहे. दोन्ही देश आपापल्या अस्मितेच्या बाबतीत कट्टर आणि कडवट आहेत आणि एकमेकांना नष्ट करणे हेच त्यांचे स्वप्न आहे. आताही दोन्ही देश एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. युद्धाला तोंड फुटले ते एका छोट्या घटनेमुळे. गाझापट्टी भागात इस्रायलच्या तीन तरुणांचे अपहरण करून त्यांना ठार करण्यात आले. इस्रायलसारख्या प्रखर देशाभिमानी राजकीय नेतृत्वासाठी मात्र ही छोटी गोष्ट नव्हती. इस्रायलच्या एका नागरिकावर हल्ला म्हणजे संपूर्ण इस्रायलवर हल्ला असेच समजून इस्रायल आपल्या शत्रूवर संपूर्ण ताकदीनिशी तुटून पडतो हा इतिहास आहे. आताही तसेच घडले. इस्रायली तरुणांची हत्या ‘हमास’ने केल्याच्या संशयावरून इस्रायल सरकारने एका पॅलेस्टिनी तरुणाला पकडून त्याला ठार मारले. नंतर इस्रायलमधील ज्यू संघटनांनी आणखी दोन पॅलेस्टिनी तरुणांची हत्या करून इस्रायली तरुणांच्या हत्येचा बदला घेतला. त्यामुळे संतापलेल्या पॅलेस्टीनने इस्रायलवर थेट क्षेपणास्त्र हल्ला चढवला. वास्तविक इस्रायलच्या अफाट लष्करी सामर्थ्यासमोर पॅलेस्टीनची डाळ शिजणे केवळ अशक्य. तरीही पॅलेस्टीनने क्षेपणास्त्रांचा मारा करून भलतेच धाडस केले आणि त्यानंतर इस्रायलने भीषण हवाई हल्ले चढवून गाझापट्टीतील असंख्य इमारती, घरे, दारे, रुग्णालये उद्ध्वस्त केली. आज परिस्थिती अशी आहे की, गाझापट्टीत रक्ताचे पाट वाहत आहेत. बळींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अर्थात या युद्धात इस्रायलची हानी कमी होत आहे आणि गाझापट्टी मात्र बेचिराख होत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये युद्धबंदी व्हावी यासाठी जोरकस प्रयत्न करतानाही कोणी दिसत नाही. संयुक्त राष्ट्र संघाने युद्धबंदीचे आवाहन करण्याची औपचारिकता तेवढी पूर्ण केली. मुस्लिम देशही हस्तक्षेप करण्यासाठी फार उत्सुक दिसत नाहीत. अमेरिकेलाही युद्ध लगेच संपवण्याची घाई नाही. त्यामुळे युद्धाचा ज्वर कायम आहे आणि रोज माणसे मारली जात आहेत. वास्तविक इस्रायल या देशाला चहूबाजूंनी मुस्लिम देशांचा वेढा आहे, परंतु अमेरिकेच्या भक्कम पाठिंब्यामुळे इस्रायलने या टापूत आपला जबरदस्त वचक आणि धाक निर्माण केला आहे. त्यामुळेच भोवताली असलेली ही सगळी मुस्लिम राष्ट्रे इस्रायलला टरकून असतात. ही सगळी मुस्लिम राष्ट्रे मनापासून इस्रायलचा द्वेष करतात, परंतु पॅलेस्टीनच्या बाजूने मैदानात उतरून इस्रायलशी टक्कर घेण्याची धमक मात्र कोणातच नाही. जगभरातील सगळे मुस्लिम देश इस्रायलच्या विरोधात शेपटा घालत असताना हिंदुस्थानने मात्र पॅलेस्टीनची बाजू घ्यावी अशी विचित्र मागणी करून कॉंग्रेस व इतर पक्षांनी लोकसभेत सोमवारी गोंधळ घातला. तिकडे सातासमुद्रापलीकडे सुरू असलेल्या युद्धाचाही आपल्या ‘व्होट बँके’साठी वापर करण्याचा हा प्रयत्न दुर्दैवीच म्हणायला हवा! गाझापट्टीचा मुलुख पॅलेस्टिनींच्या नियंत्रणाखाली आहे आणि तिथे ‘हमास’ या खतरनाक दहशतवादी संघटनेची सत्ता आहे. ‘हमास’चे सगळेच म्होरके युद्धखोर असून ही संघटना म्हणजे लश्कर-ए-तोयबा, अल कायदा आणि तत्सम दहशतवादी संघटनांची जननीच समजली जाते. इस्लामच्या नावाखाली मुस्लिम तरुणांची माथी भडकवायची, जिहादच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार करायचे याचे पहिले बाळकडू ‘हमास’नेच मुस्लिमांना पाजले. इस्रायलने मात्र ‘हमास’ला प्रत्येक हल्ल्यानंतर मूंहतोड जबाब दिला. चर्चा, बोलणी करण्याच्या फंदात कधी इस्रायल पडला नाही. शांततेची कबुतरे सोडण्याचा भंपकपणाही इस्रायलने कधी केला नाही. तुम्ही आमचा एक मारला तर आम्ही तुमचे शंभर मारू हाच इस्रायलचा खाक्या आहे. सध्या तेथे सुरू असलेल्या युद्धात कोणाचीही बाजू न घेण्याची हिंदुस्थान सरकारची भूमिका योग्यच आहे, पण शत्रूच्या ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देण्याचा इस्रायलचा गुण मात्र आपल्या देशाने नक्कीच घेण्यासारखा आहे!

No comments:

Post a Comment