Total Pageviews

Saturday 22 July 2023

तर समुद्रातील 'कारगिल'ला सामोरे जावे लागेल!

 

२३ फेब्रुवारीला बातमी प्रकाशीत झाली की श्रीलंकेतून पिटाळून लावण्यात आल्यानंतर भूमिगत झालेले लिट्टेचे नेते आता पुन्हा एकदा आपले डोके वर काढू लागले आहेत. ते आता भारताच्या अंदमान-निकोबारला आपला सुरक्षित अड्डा बनविण्याच्या प्रयत्नांत आहेत.

अंदमान-निकोबार प्रशासनानेच याबाबतची माहिती दिली आहे. म्यानमार, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका यासारख्या देशांमधून लिट्टेचे काही नेते अंदमानमध्ये आल्याची आणि या बेटावर ते स्वत:साठी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत असल्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही गृह खात्याच्या संसदीय स्थायी समितीला अशाच प्रकारची माहिती दिलेली आहे. गृह मंत्रालयाच्या मते, अंदमान-निकोबार हे बेट श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार यासारख्या देशांमधून येणार्‍या लोकांसाठी एकप्रकारचे आश्रयस्थानच बनले आहे. या लोकांमध्ये लिट्टेचेही अतिरेकी असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.

अंदमान-निकोबार हा प्रदेश बंगालच्या उपसागरात वसलेला असून, त्याचा ८२४९ चौरस किलोमीटर इतक्या परिसरात विस्तार आहे. ५७२ बेटांचा मिळून हा प्रदेश तयार झालेला आहे. या प्रदेशात काही तामिळ नागरिकांचेही वास्तव्य असून, ते लिट्टेचे समर्थक असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रशासनाचे मत आहे.

श्रीलंकेचे नौसैनिक निर्दयतेने आणि दादागिरी करून भारतीय मासेमारांना पकडतात, दोन-दोन, तीन-तीन महिन्यांपर्यंत या मासेमारांच्या क्षेमकुशलतेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना काहीही माहिती दिली जात नाही, या मासेमारांच्या नौका तोडून टाकल्या जातात, जाळे समुद्रात फेकून दिले जाते. या सार्या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या आपत्तीबाबत कोण विचार करतो? केंद्र सरकार या भारतीय तामीळ मासेमारांचे संरक्षण करण्याबाबत मुळीच गंभीर नाही?आजच्या दिवशी आपले २५० हुन जास्त मासेमार आणी त्यांच्या बोटी पाकीस्तानच्या ताब्यात आहेत.

"भारतीय किनारपट्टीची सुरक्षा

भारताच्या सागरी संरक्षणासाठी केंद्र सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भारताला लवकरच समुद्रातही कारगिल युद्ध लढावे लागेल, या निवृत्त ऍडमिरल अरुण प्रकाश यांच्या गंभीर इशाऱ्याचा राज्यकर्त्यांनी तातडीने विचार करायला हवा. फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी (फिंन्स) या संस्थेतर्फे "भारतीय किनारपट्टी आणि बेटांची सुरक्षा-विकास या विषयावरच्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्‌घाटन करताना प्रकाश, यांनी देशाच्या पूर्व आणि पश्चिम-दक्षिण विभागाच्या सामुद्रिक स्थितीचा मागोवा घेत, मुंबईवर झालेला 26/11 चा हल्ला हा सागरी सुरक्षिततेच्या अभावामुळेच झाल्याचे सांगत, सागरी सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारांची मिळून कडक सागरी सुरक्षा व्यवस्था अद्यापही अंमलात आली नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.  सागरी सुरक्षिततेसाठी जॉईन्ट ऑपरेशन केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राला सागरी सुरक्षिततेबाबत दैनंदिन गुप्त माहिती मिळत नाही आणि जी माहिती मिळालेली आसते, ती पडताळून पाहिलेली नसते. सागरी सुरक्षिततेबाबत राज्याच्या पोलिसांनी ही जबाबदारी कोस्टल पोलिसांकडे न ढकलता, त्यात लक्ष घालावे.भारताच्या सागरी संरक्षणासाठी १६ विभाग काम करत आहेत. परंतु या विभागामध्ये समन्वयाचा अभाव असून भारताने सागरी संरक्षणाच्या बाबतीत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर, भारताला लवकरच समुद्रातही कारगिल युद्ध लढावे लागेल.

बेटांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची

सागरी सुरक्षिततेमध्ये बेटांची सुरक्षितता ही सुद्धा अत्यंत महत्त्वाचीच आहे, याचे भान आमच्या राज्यकर्त्यांना नाही. अत्यंत महत्त्वाचा असलेला आर्थिक विभागाचा 50 टक्के भाग हा बेटांनीच व्यापलेला आहे आणि त्याकडे शत्रू राष्ट्रांचे लक्ष आहे, याचा विसर राज्यकर्त्यांना पडल्याचेही aahe, त्याचा विचार शांततेच्या जपमाळा ओढणाऱ्या केंद्र सरकारने करायला हवा. कोणत्याही राष्ट्राला कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. राष्ट्राचे हित हेच परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र असते, याचाच विसर तटस्थतावादी परराष्ट्र धोरणाचा जयघोष करणाऱ्या आमच्या राज्यकर्त्यांना पडल्यामुळेच यापूर्वी पूर्व आणि पश्चिम सीमेवर असलेला शत्रू राष्ट्रांचा धोका आता सागरी किनारपट्टी आणि बेटापर्यंत आला आहे. बेटे आणि सागरी सुरक्षेबाबत काम करणाऱ्या विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे, 

 भारतीय नौदल, लष्कर आणि वायुदल अद्यापही शेजारी राष्ट्रांवर दरारा निर्माण होईल, असे पूर्णपणे बलशाली झालेले नाही. अत्याधुनिक सुसज्ज शस्त्रबळाच्या लष्कराबरोबरच, देशाच्या समुद्राचे रक्षण करायसाठी बलशाली नौदलाची उभारणी करावी. भारतीय नौदल 2 हजारो किलोमीटरची भारतीय समुद्री हद्द लक्षात घेता अपुरे आहे. ब्रह्मदेश, बांगला देश, इंडोनेशिया, श्रीलंका, पाकिस्तान आणि चीन या देशाशी भिडलेल्या भारतीय सागरी हद्दीचे रक्षण करायसाठी भारतीय नौदलाचे किमान पाच आरमारी विभाग विमानवाहू नौकांसह सातत्याने हिंदी आणि अरबी समुद्रात गस्त घालीत राहायला हवेत. 

नौदलाच्या बळावर शेजारी राष्ट्रांना धमकवायचे चीनचे धाडस

अंदमान निकोबार पर्यंत असलेली भारताची सागरी सीमा इंधन, नैसर्गिक वायू आणि अन्य खनिज पदार्थांनी समृद्ध असल्यामुळेच चीनने गेल्या काही वर्षात अमेरिकन नौदलाला शह देत, आपले आरमारी सामर्थ्य वाढवायचा प्रयत्नही सुरू केला आहे. जपान, व्हिएतनामसह सर्व शेजारी राष्ट्रांना धमकवायचे धाडस चीन करतो आहे, ते आपल्या वाढत्या नौदलाच्या सामर्थ्याच्या बळावरच. भारतीय नैसर्गिक वायू महामंडळाने व्हिएतनामच्या समुद्रात तेलांच्या विहिरी खोदायचे कंत्राट घेतल्यावर , या विहिरी चिनी हद्दीतल्या समुद्रात खोदल्या जात असल्याचा कांगावाही केला. हिंदी आणि प्रशांत महासागरातल्या अनेक बेटांवर चीन बेमुर्वतखोरपणे हक्क सांगायला लागला आहे. हिंदी महासागरातली भूगर्भातली संपत्ती आपल्याच मालकीची असल्याचा दावा करणाऱ्या चीनला रोखायाचे असेल, तर चीनच्या तोडीचे-त्यापेक्षाही प्रबळ असे नौदल भारताकडे हवे. पाणबुड्या, विनाशिका, विमानवाहू नौका, शेकडो गस्ती नौका, क्षेपणास्त्रे यासह भारतीय नौदल सुसज्ज ठेवायलाच हवे, अन्यथा चीन भारतीय बेटे बळकावल्याशिवाय राहणार नाही आणि युद्धाचा भडका उडेल असाच प्रकाश यांच्या इशाऱ्याचा अर्थ आहे. 

कोस्टल सिक्युरिटी  अभ्यास केंद्र जरुरी

नेपाळ, भूतान आणि म्यानमार या राज्यांच्या सीमेवर एक लाख ४१ हजार जवान तैनात आहेत. पण भारताच्या ७ हजार ५०० किलोमीटर सागरी किनारपट्टी असलेल्या भागासाठी फक्त बारा हजार पोस्ट गार्डची पदे आहेत. यामधील ४ हजार पदे रिक्त आहेत. त्यावरून शासन सागरी सुरक्षेवर किती गंभीर आहे, हे दिसते.सागरी सुरक्षा विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे  कोस्टल सिक्युरिटी संदर्भात एक अभ्यास केंद्र उभे केले पाहीजे, त्या ठिकाणी अभ्यास करण्यास विचारवंत आणी अभ्यासकांची गरज आहे. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी वापरली जाणारी उपकरणे ही शत्रू राष्ट्राकडून खरेदी करू नयेत.ती भारतातच बनली पाहीजे. 


No comments:

Post a Comment