Total Pageviews

Sunday 27 January 2013

POLICE CORRUPTION

खंडणी उकळणारे खबरे वाढले
हपते वसूल करणार्‍या पोलिसांचे विसर्जन-
प्रभाकर पवार

मुलुंड येथील ब्युटीपार्लरमधील महिलांकडून खंडणी उकळणार्‍या चार पोलिसांना मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी अखेर सेवेतून बडतर्फ केले. हपता मागताना पकडल्या गेलेल्या पोलिसांना शक्यतो निलंबित केले जाते. बडतर्फ नाही. संघटित गुंड टोळ्यांशी संबंध किंवा शत्रूसाठी हेरगिरी करीत असेल, महत्त्वाची कागदपत्रे पुरवीत असेल तर या व बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या पोलिसांवरच अशी कठोर कारवाई करण्यात येते. परंतु महिलांकडे खंडणी मागून खाकी वर्दीला डाग लावणार्‍या त्या शिपायांचे कायमचे विसर्जन करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी भारतीय घटना कलम ३११ अन्वये त्यांना सेवेतून बडतर्फ केले. ३११ अन्वये बडतर्फ करण्याचा पोलीस आयुक्तांना अधिकार आहे. पोलीस आयुक्त अशा अधिकाराचा कमी नव्हे, फारच दुर्मिळातील दुमिर्र्ळ वापर करतात. निलंबित झालेले व पुन्हा सेवेत आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी आपणांस हजारो सापडतील, परंतु बडतर्फ झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तुम्हाला शोधावे लागतील इतकी बडतर्फ पोलिसांची हातावर मोजण्याइतकी संख्या आहे. त्यात आता पूर्व परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मोहम्मद कैसर खलीद यांच्या गाडीवर ड्रायव्हर व ऑपरेटर म्हणून काम करणार्‍या हनुमंत कांबळे, मधुकर खिरारी, शेखर शिंदे व दशरथ जानकर या पोलीस शिपायांची भर पडली आहे. कैसर खलीद यांचाही गोपनीय अहवाल स्वच्छ नाही. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त असतानाच कैसर खलीद यांना कुठेही ‘एक्झिक्युटिव्ह’ पोस्ंिटग देऊ नये असे सरकारला लेखी कळविले होते. तरीही कैसर खलीदसारख्या वादग्रस्त आयपीएस अधिकार्‍याला नसीम खान या कॉंग्रेस मंत्र्यांच्या दबावाखाली मोक्याच्या ठिकाणी नेमण्यात आले आणि चार सामान्य पोलीस शिपायांना घरी बसावे लागलेे. त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली. परंतु कैसर खलीद यांच्या केसालाही धक्का लागला नाही. मालकाची फूस आणि आशीर्वाद असल्याशिवाय नोकरचाकर असे मोकाट सुटत नाहीत. कैसर खलीद यांच्या कार्यालयात काय चालते, त्यांना दरमहा येऊन कोण कोण आणि कुठे कुठे भेटतात याची इत्यंभूत माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांना आहे. परंतु कैसर खलीद यांची कामाची कार्यपद्धती पाहून तेही हतबल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्या दिमतीला असलेले, आपल्यासाठी काम करणारे चार पोलीस बडतर्फ झाल्याची कैसर खलीद यांना खंत नाही. किंबहुना त्यांच्या कार्यपद्धतीतही फरक पडलेला नाही. त्यांचे चार सहकारी पोलीस पकडले गेल्यानंतरही त्यांच्यासाठी ‘खबरेगिरी’ करणार्‍यांचा कैसर खलीद यांच्या नावाने धंदा जोरात सुरू आहे. मुलुंड येथील एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये या आयपीएस अधिकार्‍याच्या नावाने गेलेल्या व वेटरने बिल हातात टेकविल्यावर ‘पहचानता नहीं क्या मैं कौन हूँ, मुझे बिल देता हैं क्या, मैं अभी सबक सिखाता हूँ’ असे दरडावून या खबर्‍याने कैसर खलिद यांना बारमध्ये पोरी नाचत आहेत, अशी खोटी खबर दिली. त्यानंतर कैसर खलिद यांनी दीडशे-दोनशे पोलिसांना पाठवून बारवर धाड घातली. परंतु तेथे काहीच सापडले नाही. पोलिसांना हात हलवत परतावे लागले. किरकोळ चोर-लफंग्या खबर्‍यांच्या माहितीवर विश्‍वास ठेवून रेड टाकणारे कैसर खलीद हे काही पोलीस दलातील एकमेव अधिकारी नाहीत. खबर्‍यांवर आंधळा विश्‍वास ठेवणारे असे बरेच अधिकारी आहेत. त्यामुळे सध्या मुंबई शहरात खबर्‍यांची जितकी चलती आहे, ते जितके ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवतात इतके पोलीसही नाहीत.
वसंतराव ढोबळे यांनी जेव्हा लेटनाईट बारवाल्यांचे कंबरडे मोडले होते तेव्हाही त्यांच्या पथकातील काही खबर्‍यांनी त्यांच्या नावावर आपली वसुलीची दुकानं सुरू केली होती. ढोंबळेंची जरी बदली झाली असली तरी त्यातील काही खबरे समाजसेवा शाखेतील अधिकार्‍यांना जाऊन मिळाले आहेत. काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्याही कानाला लागले आहेत. खबर्‍यांनी खबरीची कामे करायला हरकत नाही. परंतु खबरी म्हणून काम करणारे कायम पोलीस अधिकार्‍यांच्या नावाने मोठमोठ्या रकमेच्या खंडण्या व्यापार्‍यांकडून उकळत असतात याची बर्‍याचदा या अधिकार्‍यांना कल्पनाही नसते. वसंतराव ढोबळे यांच्या नावाने एका हॉटेलवाल्याकडून त्यांच्या नकळत लाखांची खंडणी उकळताना ढोबळेंचाच एक खबरी मागे पकडला गेला होता. गेल्या आठवड्यातही दिंडोशी पोलिसांनी काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नावाने हॉटेलवाल्यांकडून हपते गोळा करणार्‍या एका कथित खबर्‍याला पकडले. आपणच त्या खबर्‍याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. पोलिसंाच्या दफ्तरी खबरे असलेल्या बर्‍याच व्यक्ती या गुन्हेगार असतात. परंतु त्यांच्यावर विश्‍वास ठेवून चालत नाही. आतापर्यंत जे काही अधिकारी अडचणीत आले आहेत ते खबर्‍यांनी दिलेल्या चुकीच्या किंवा स्वत:च्या फायद्यासाठी सुपारी घेऊन दिलेल्या माहितीमुळेच! तेव्हा पोलीस अधिकार्‍यांनी खबर्‍यांवर किती विश्‍वास ठेवावा याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मुंबई शहरात जसे गळ्यात दागिने घालून फिरणार्‍या महिलांना पोलीस असल्याचे भासवून गंडविणारे तोतये पोलीस वाढले आहेत तसेच पोलिसांचा खबरी असल्याचे भासवून व्यापारी व हॉटेलवाल्यांकडून खंडणी उकळणारेही वाढले आहेत. त्यामुळे सदा कानफाट्या असणार्‍या व भ्रष्टाचारात, हप्तेबाजीत आघाडीवर असणार्‍या पोलिसांची दिवसेंदिवस बदनामी वाढू लागली आहे याची आता सर्वच वरिष्ठ कनिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी नोंद घेणे आवश्यक आहे

No comments:

Post a Comment