Total Pageviews

Tuesday 21 May 2013

क्रिकेटपटू व बुकी जेलमध्ये-खरे ‘फिक्सर’ कुठे आहेत?-- प्रभाकर पवार

क्रिकेटपटू व बुकी जेलमध्ये-खरे ‘फिक्सर’ कुठे आहेत?-- प्रभाकर पवार
कोणताही बुकी आपला धंदा सुरू करण्यापूर्वी पोलिसांपासून ते बड्या बड्या राजकीय व्यक्तींना मॅनेज करूनच गुप्त ठिकाणी आपली यंत्रणा उभी करतात आणि बेटिंग सुरू करीत असतात. बुकींचे बड्या बड्या व्यक्तीेशी संबंध असतात. लाखो रुपये दिल्यानंतरच त्या बुकींना ‘ग्रीन सिग्नल’ मिळतो. परंतु कुणी बुकी किंवा क्रिकेटपटू पकडले गेल्यानंतर मात्र कुणा राजकीय व्यक्तीचे नाव पुढे येत नाही. मोठे मासे व खरे फिक्सर कायम नामानिराळेच राहतात.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमध्ये खेळणारे काही खेळाडू मॅच फिक्सिंग स्कॅण्डलमध्ये पकडले गेल्याचा धक्का सार्‍या क्रिकेट चाहत्यांना जसा बसला आहे, तसा धक्का आपणासही बसल्याचा दावा क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकार्‍यांनी केल्याने माहीतगारांना भोवळच आली आहे. प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर सारेच हात वर करतात. ज्या क्रिकेटपटूंना मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आली आहे ते संशयित क्रिकेटपटू व त्यांचे नातेवाईकही आपल्या मुलांना गुंतविण्यात आल्याचा आरोप करीत आहेत. सत्य काय आहे हे फक्त दिल्ली पोलिसांनाच माहीत, परंतु आग लागल्याशिवाय धूर येत नाही. क्रिकेट मॅच फिक्सिंग हा प्रकार काही नवीन नाही. हिंदुस्थानात बुकी कोणत्याही खेळावर बेटिंग घेत असतात. खेळत असतात. ठरल्याप्रमाणे किंवा हरल्यावर कुणी पैसे दिले नाहीत तर मग हे बुकी अंडरवर्ल्डचीही मदत घेतात. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. क्रिकेट बुकींवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव आहे हे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. हिंदुस्थानी क्रिकेटचा माजी कप्तान अझरुद्दीन याचे तर दाऊदचा उजवा हात शरद शेट्टी याच्याबरोबर घनिष्ट संबंध असल्याचे काही फोटो आजही मुंबई क्राइम ब्रँचच्या दफ्तरी आहेत. शरद शेट्टीच्या इशार्‍यावरून अझरुद्दीन याने बर्‍याच मॅच फिक्स केल्या होत्या. शरद शेट्टी ऊर्फ ‘अण्णा’ यास २००३ साली छोटा राजनच्या गुंडांनी दुबईत गोळ्या घालून ठार मारले. दाऊदला हादरा देण्यासाठीच हा ‘गेम’ करण्यात आला. त्याचा परिणाम दुबईत झाला. मुंबईतील गँगवॉर दुबईत पोचल्याने तेथील पोलीस व सरकार हादरून गेले. त्यांनी तत्काळ दुबईत शोध घेऊन मुंबईतील गुंडांना हाकलण्यास सुरुवात केली. त्यात दाऊदचा भाऊ इकबाल कासकर व कांजूरमार्गचा अनिल परब ऊर्फ ‘वांग्या’ आदी गुंंड होते. आपले बिंग फुटेल, आपली सारी गुपिते इकबाल पोलिसांना व गुप्तहेर संघटनांना सांगेल म्हणून पाकिस्तानात आयएसआयचे बाहुले बनून राहिलेल्या दाऊदने इकबालला हिंदुस्थानात न जाता पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले. त्याला विनंतीही केली, परंतु इकबालने ऐकले नाही. तो दाऊदला म्हणाला, ‘मी पाकिस्तानात लपून बसणार नाही. त्यापेक्षा मुंबईच्या जेलमध्ये मला राहणे आवडेल’ असे सांगून त्याने आपण हिंदुस्थानी असून आपणास हिंदुस्थानात ‘डिपोर्ट’ करावे असेही दुबई सरकारला सांगितलेे. त्याप्रमाणे २००३ साली इकबाल मुंबईत परतला. त्यावेळी त्याने मुंबईतील महत्त्वाच्या कोण कोण व्यक्ती दुबईला जातात, कुणाकुणाला भेटतात, कुणाचे दाऊदशी घनिष्ट संबंध आहेत याची आकडेवारीच मुंबई क्राइम ब्रँचला सादर केली होती. समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांच्या दुबईवारीवर तर इकबाल कासकरने जळजळीत प्रकाश टाकला होता, परंतु माहिती मिळूनही मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी राजकीय दबावाखाली कुणाही राजकीय नेत्याची कधीही चौकशी केली नाही. त्यामुळेच अबू आझमीसारखे नेते शिरजोर झाले. अतिरेकी व पोलिसांवर हल्ले करणार्‍यांच्या नातेवाईकांना मदत करू लागले.
आयपीएल क्रिकेट मॅच फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटपटू व बुकींना अटक केल्यानंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनीही क्रिकेट बुकींचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पत्रकार परिषदेत नुकतेच सांगितले आहे. परंतु त्यात काही नवीन नाही. इकबाल कासकरनेही दहा वर्षांपूर्वी मुंबई क्राइम ब्रँचलाही हेच सांगितले होते, परंतु क्रिकेट बोर्डाने त्याची काही गंभीरपणे दखल घेतली नाही. इकबाल म्हणाला होता, ‘शारजा येथील क्रिकेट स्टेडियमचा मालक बुखातीर याच्याशी दाऊद व शरद शेट्टीचे संबंध आहेत. बुखातीरशी सल्लामसलत करूनच मॅच फिक्स केली जायची. चार फलंदाज व दोन गोलंदाजांना ‘मॅनेज’ केले जायचे. त्यासाठी अझरुद्दीन व अजय जाडेजा हे दोघे महत्त्वाची भूमिका बजवायचे अशी माहिती देताना इकबाल पुढे म्हणतो, ‘शरद शेट्टी बेट हरल्यानंतर बुकींना पैसे द्यायचा नाही. छोटा शकील बुकींंना धमकवायचा आणि शरद शेट्टीला माफ करायला लावायचा. सगळ्यात कमी पैशात वेस्ट इंडीजचा संघ ‘मॅनेज’ व्हायचा असेही कासकर याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे. तेव्हा क्रिकेटपटू व बुकींचे अंडरवर्ल्डशी संबंध यात काहीच नवीन नाही. आता तर सिनेअभिनेता विंदू दारा सिंह यासही मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्याने बॉलीवूडचे क्रिकेट बुकींबरोबरचे कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही बॉलीवूड व अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड झाले होते. तेव्हा क्रिकेट हा एकेकाळचा जंटलमनचा आदर्श खेळ आता रसातळाला गेला आहे. पैशांसाठी क्रिकेट चाहत्यांना उल्लू बनविण्याचा हा धंदा गंदा झाला आहे. तेव्हा क्रिकेटच्या चाहत्यांनी क्रिकेटवर आता किती विश्‍वास ठेवावा याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. एका ओव्हरमध्ये १४ पेक्षा अधिक धावा देण्यासाठी एका गोलंदाजाला क्रिकेट बुकींनी ४० लाख रुपये देऊ केले होते. म्हणजे या आयपीएल मॅचेसच्या माध्यमातून किती करोडो रुपयांची उलाढाल होत आहे ते पहा! आयपीएल मॅचेसमधील नफ्यातील एक-दोन टक्के जरी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत केली तरी लोक क्रिकेट बोर्डाला दुवा देतील, पण गरीबांना कोण विचारतो?

 

No comments:

Post a Comment