Total Pageviews

Monday 27 April 2015

TERROR UPDATE-टुंडा’ सुटला कसा?

टुंडा’ सुटला कसा? दिल्ली उच्च न्यायालयाने ‘टुंडा’ प्रकरण जवळजवळ निकाली काढले आहे. हा ‘टुंडा’ कोण? हे आता बरेचजण विसरले असतील. पण दोनेक वर्षांपूर्वी पोलिसांनी ‘टुंडा’स जेरबंद केले तेव्हा त्याला पकडल्याचे श्रेय घेण्यासाठी सरकार, सुरक्षा यंत्रणांची चढाओढ लागली होती व जणू एक खतरनाक अतिरेकी पाकिस्तानच्या मुलखात घुसून पकडून आणल्याचा आव तेव्हा आणला गेला होता. अब्दुल करीम अर्थात टुंडा हा लश्कर-ए-तोयबाचा ‘बॉम्ब’तज्ज्ञ. देशातील काही बॉम्बस्फोट कटात त्याचा हात असल्याचे पुरावे पोलिसांकडे होते. ‘२६/११’च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाक सरकारकडे २० ‘मोस्ट वॉण्टेड’ अतिरेक्यांची यादी सोपवली. त्यात हा टुंडादेखील होता. पण हा टुंडा शेवटी हिंदुस्थानातच सापडला. तरुण पोरांना ‘माथेफिरू’ बनवून दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याचे काम टुंडा करीत होता. पाकिस्तानचा तो हस्तक होता व बॉम्ब बनविण्याची कला त्यास अवगत होती. टुंडास पकडून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले गेले, पण आता बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या तीन आरोपांतून कोर्टाने त्यास मुक्त केले. त्याच्याविरुद्ध पुरावे नसल्याचे कोर्टाने सांगितले. त्यामुळे ‘टुंडा’च्या बाबतीत खरे काय व खोटे काय? हे कळायला हवे. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात तपास यंत्रणा का कमी पडल्या; याचाही तपास व्हावा. पाकिस्तानला पाठवलेल्या यादीतला तो खतरनाक दहशतवादी असेल तर पुराव्याच्या बाबतीत हयगय करणे योग्य नव्हते. ‘टुंडा’ सध्या तिहार तुरुंगात आहे व त्याचे एकंदरीत बरे चालले आहे. मधल्या काळात त्याच्या हृदयावर सरकारी कृपेने यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्याचे आरोग्य उत्तम व आयुष्यदेखील वाढले आहे व त्याबद्दल हे टुंडा महाशय हिंदुस्थानी तपास यंत्रणांचे आभारच मानत असतील. ‘टुंडा’ ऊर्फ अब्दुल करीम याने बॉम्ब बनवले. ते ठिकठिकाणी फोडले. त्यात अनेकजण मेले व जखमी झाले. पोलिसांनी पंचनामे केले. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी हातात आला तेव्हा त्याचा पंचनामा करून शिक्षा ठोठावण्यात आमचे तपास अधिकारी कमी पडले. उद्या दाऊद हाती लागला तरी तो पुराव्याअभावी सुटेल अशी आमच्याकडील एकंदरीत स्थिती आहे. तिहार तुरुंगात हे टुंडा महाशय सध्या तरी सरकारचे खास मेहमान आहेत. या काळात त्याचे डोळे, कान, दात, गुडघे, पाठीचा मणका वगैरेंची शस्त्रक्रिया तो करून घेईल व उरलेल्या खटल्यांत पुराव्याअभावी सुटून ‘ताठ कण्याने’ स्वत:च्या पायावर चालत बाहेर येईल. शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये अशी आपली न्याय व्यवस्था आहे. पण ‘टुंडा’ निरपराध आहे हे ठरविणारी न्यायदेवता खरंच डोळे उघडून बसली आहे काय? पाकिस्तानी तालिबानने स्वयंविकसित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा करत त्याची अडीच मिनिटांची चित्रफीत जारी करून केवळ पाकिस्तानच नाही तर भारतासहित अनेक देशांची झोप उडवली आहे. या क्षेपणास्त्राचे तांत्रिक तपशील, त्याचा पल्ला आदी माहिती तालिबानने अद्याप दिली नसली आणि पाकिस्तानने अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी ही भारताला चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कारण या दहशतवादी संघटनेने पाकमध्येच इतके भीषण हल्ले केलेले आहेत की त्यांच्याकडे हे तंत्रज्ञान खरोखर आले तर त्याचा ते बेधडक वापर करतील, यात शंका नाही. गेल्या वर्षभरात पाक लष्कराने वझिरीस्तान आणि खैबरच्या आदिवासी भागात उघडलेल्या आघाडीत दोन हजारहून अधिक तालिबानी दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे. या लष्करी कारवाया तूर्त मंदावून, तालिबान्यांना नव्याने आपली कुमक वाढविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी हे व्हिडिओ क्षेपणास्त्र सोडले असण्याची शक्यता आहे. व्हिडिओनुसार हे क्षेपणास्त्र गावठी पद्धतीचे आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. त्याच्या वापराने लष्करी आगेकूच रोखता येते हे निश्चित. दहशतवाद्यांनी क्षेपणास्त्रचाचणीची घोषणा करण्यासाठी निवडलेला मुहूर्त पाहता, त्यांच्याकडे खरोखर ही क्षमता आहे का, याबद्दल शंका येऊ शकते. दोनच दिवसांपूर्वी चीनने पाकिस्तानशी जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा आर्थिक महामार्ग उभारण्याचा करार केला. हा महामार्ग बलुचिस्तान या अविकसित प्रदेशातून जातो आणि हा तालिबानशी वैचारिक बांधिलकी मानणाऱ्या दहशतवादी संघटनांनी आपल्या प्रभावाखाली आणलेला भाग आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची हमी चीनला देण्याकरिता पाकला या दहशतवाद्यांचा चोख बंदोबस्त करावा लागेल. भारत आणि अन्य देशांसाठी चिंतेची बाब म्हणजे, पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज देश आहे आणि त्याच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत नेहमीच शंका व्यक्त होते. आंतरराष्ट्रीय समुदायाला अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत पाकनेही अद्याप समाधानकारक उत्तर दिलेले नाही. जसे हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान तालिबानच्या हाती आले तशी अण्वस्त्रेही त्यांच्या हाती आली तर मोठाच हाहाकार माजेल. अण्वस्त्रे हाताळण्यासाठी आणि वापरण्यासाठी तांत्रिक कौशल्य आणि बऱ्याच सोयीसुविधा लागतात, हे खरे आहे. तथापि, अल कायदा आणि तालिबान दहशतवाद्यांनी अणुबॉम्ब बनविण्याच्या इरादा कधीच जाहीर केलेला आहे. त्यामुळे, या व्हिडिओकडे दुर्लक्ष करून जगाला परवडणारे नाही.

No comments:

Post a Comment