Total Pageviews

Friday 15 July 2016

NICE TERROR ATTACK-फ्रान्समधील रक्तपात!

Saturday, July 16th, 2016 फ्रान्समधील रक्तपात! विखाराचे भीषण उद्रेक (अग्रलेख) फ्रान्समधील हल्लेखोरांचे भांडण स्वातंत्र्यवादी विचारांशीच आहे, असे दिसते. दहशतवादविरोधी रणनीतीचा नव्याने विचार करण्याची निकड या हल्ल्याने समोर आणली आहे. युरोपातील प्रबोधन आणि पुनरुत्थान पर्वातील फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याचे कारण ही घटना केवळ फ्रान्समधील राजाच्या उच्चाटनापुरती सीमित नव्हती, तर एकूणच ‘मानवी स्वातंत्र्य‘ या मूल्याचा उद्‌घोष करणारी घटना होती. प्रस्थापितांच्या सर्वंकष अधिकारांचे प्रतीक बनलेला बास्तीलचा तुरुंग फोडणे, ही या क्रांतीतील एक महत्त्वाची घटना. चौदा जुलैला त्या दिवसाचे स्मरण होत असतानाच फ्रान्समधील नीस शहरात भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्लेखोराने निरपराध माणसांना तर चिरडलेच; पण त्यामागची वृत्ती फ्रेंच राज्यक्रांतीने पुरस्कारिलेल्या आधुनिक मूल्यांनाच चिरडण्याची आहे, हे लक्षात घ्यावे लागते. फ्रेंच राज्यक्रांतीने ज्या प्रस्थापितांच्या विरोधात एल्गार पुकारला होता, त्यात धर्मपीठही होते. मानवी मन त्यापासून मुक्त करण्याची ही चळवळ होती. इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांना आता 21 व्या शतकात घड्याळाचे काटे उलटे फिरवायचे आहेत. गेल्याच वर्षी ‘शार्ली हेब्दो‘ या नियतकालिकातील व्यंग्यचित्राचा सूड म्हणून त्याच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला, तर त्याच वर्षी फ्रान्समध्ये विविध ठिकाणी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांत 130 निरपराध नागरिकांना ठार मारण्यात आले. एकूणच दहशतवाद्यांनी फ्रान्सला लक्ष्य केले आहे, हे उघड दिसते. गुरुवारचे कृत्य कोण्या माथेफिरूने वेडाच्या भरात केलेले कृत्य नव्हते. थंड डोक्यातने आणि योजनापूर्वक केलेला हा हल्ला होता. त्याच्या ट्रकमध्ये स्फोटकेही सापडली आहेत, यावरून त्याची स्पष्ट कल्पना येते. फ्रान्समधील हल्ल्यांची जबाबदारी यापूर्वी ‘इसिस‘ने स्वीकारली होती. ‘इसिस‘ ज्या प्रकारच्या हल्ल्यांचा सध्या पुरस्कार करीत आहे, त्याच्याशी या हल्ल्याचे साधर्म्य आहे. कमीत कमी व्यक्ती आणि साधनसामग्री वापरून जास्तीत जास्त जीवितहानी आणि विध्वंस घडवून आणायचा, असे हे तंत्र आहे. निरपराध लोकांना कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी मारून सरकार तुमचे संरक्षण करू शकत नाही, हे दाखवून देण्याचा प्रयत्न दहशतवादी करीत असतात. ट्रकचालक निरपराध व्यक्तींना चिरडत होता, त्याच वेळी फ्रान्समध्ये लष्करी संचलन चालू होते, हे वास्तवही एका अंतर्विरोधाकडे निर्देश करते. तो म्हणजे बलाढ्य लष्करी ताकद असली, तरी असे हल्ले थोपविता येत नाहीत. मागच्या हल्ल्याच्या वेळीही फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी देश युद्धस्थितीत असल्याची गर्जना केली होती. परंतु, शत्रूचे कोणतेही एक असे विशिष्ट केंद्र नाही, की ज्यावर हल्ला करून फ्रान्सला किंवा कोणत्याही देशाला दहशतवादविरोधी युद्ध केल्याचे समाधान मिळेल. उदाहरणार्थ, इस्लामी मूलतत्त्ववादी; विशेषतः ‘इसिस‘सारखी संघटना ज्या प्रकारे धार्मिक विखार पसरवीत आहे, त्याचा सामना कसा करणार, हा खरे म्हणजे आधुनिक जगापुढील प्रश्नस आहे. पण त्याबाबत अद्यापही गांभीर्याने विचार सुरू आहे, असे दिसत नाही. दहशतवादाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या मुकाबल्याची योजना ठरवायला हवी. इराकवर खोटी कारणे दाखवून ज्या प्रकारे युद्ध लादले गेले, त्यामुळे अमेरिका व तिच्या मित्रदेशांविषयी मुस्लिमांमध्ये राग खदखदतो आहे. ‘इसिस‘त्याचा पुरेपूर फायदा तर उठवीत आहेच; पण त्याचबरोबर प्रतिगामी, मध्ययुगीन आणि विखारी तत्त्वज्ञानही पसरवू पाहत आहे. केवळ अल्पशिक्षित, गरीब किंवा बेरोजगार तरुणच त्याच्या सापळ्यात अडकत आहेत, असे नाही, तर उच्चशिक्षित आणि आर्थिक स्थिती उत्तम असलेल्यांनाही त्याची भूल पडत आहे, या वास्तवाची दखल घ्यायला हवी. म्हणजेच हा लढा द्वेषमूलक विचारसरणीच्या विरोधातील असायला हवा. ज्या इस्लामधर्मीयांसाठी आपण काम करीत आहोत, असे ‘इसिस‘सारख्या संघटना दाखवीत आहेत, त्यांच्याच हितावर त्या गंडांतर आणत आहेत. पश्चि्म आशियातील अस्थिर परिस्थितीला कंटाळून हजारो नागरिक युरोपात स्थलांतर करीत आहेत, ते जगण्याच्या आशेने. परंतु, अशा हल्ल्यांमुळे त्यांच्या आशा-आकांक्षा धुळीला मिळण्याचा धोका आहे. स्थलांतरितांविषयी अधिकाधिक कठोर निर्बंध लादावेत, असा दबाव आता वाढत जाईल. व्यक्तिस्वातंत्र्य, उदारमतवाद, परस्परसहकार्यातून विकास या मूल्यांकडून धर्म आणि वंशाधारित संकुचित राष्ट्रवादाकडे विविध देशांची वाटचाल होणे हे अंतिमतः कोणाच्याच हिताचे नाही. निरपराध्यांच्या रक्ताला चटावलेल्या ‘इसिस’ने फ्रान्सवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला केला आहे. फ्रान्सची जनता ‘बास्तीय दिन’ म्हणजेच त्यांचा राष्ट्रीय सण साजरा करीत असतानाच नीस शहरात हा दहशतवादी हल्ला झाला. स्फोटके व शस्त्रास्त्रांनी भरलेला एक भला मोठा ट्रक घेऊन ‘इसिस’चा अतिरेकी या शहरात जणू काळ बनूनच राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात घुसला. केवळ रक्ताचा सडा पाडायचा हे एकमेव उद्दिष्ट ठरवून आलेला हा नरभक्षक अतिरेकी दिसेल त्याच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार करूनच पुढे गेला. थोडेथोडके नव्हेत, तब्बल ८४ लोक या अतिरेकी हल्ल्यात ठार झाले. शेकडो लोक जखमी झाले. ठार आणि जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले आणि महिला आहेत. जे धावण्यात कमी पडले, रस्ता सोडण्यात कमी पडले त्या सर्वांना या अतिरेक्याने ट्रकच्या चाकाखाली घेतले. या दहशतवादी हल्ल्यानंतरचे नीस शहरातील दृश्य मन सुन्न करणारे आहे. शहरातील रस्त्यावर दोन किलोमीटरपर्यंत सर्वत्र मृतदेहांचे खच पडले आहेत. पावसानंतर रस्त्यावरून पाणी वाहते तसे या रस्त्यावरून रक्ताचे पाट वाहत आहेत. माणुसकीने थिजून जावे, साक्षात मृत्युदेवतेचाही थरकाप उडावा असा हा भयंकर हल्ला आहे. इस्लामी दहशतवादाचा सर्वात क्रूर चेहरा म्हणून या घटनेची नोंद करावी लागेल. या हल्ल्यानंतर सारा फ्रान्स शोकसागरात बुडणे स्वाभाविक आहे. साडेतीन लाख लोकसंख्येच्या नीस शहरात तर सर्वत्र आक्रोशच सुरू आहे. हिंदुस्थानात १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांना जे महत्त्व असते तसेच महत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रारंभ म्हणून ‘बास्तीय दिना’ला असते. अशा राष्ट्रीय सणाला टार्गेट करूनच ‘इसिस’ने केलेला हा हल्ला म्हणजे फ्रान्सच्या मर्मस्थळावर घातलेला घावच आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांदो हल्ला झाला त्यावेळी देशाबाहेर होते. हल्ल्याची माहिती मिळताच ते देशात परतले. नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी आणखी तीन महिन्यांनी वाढविण्याची घोषणा ओलांदो यांनी केली. अशा भ्याड हल्ल्यांनी फ्रान्स डगमगणार नाही, या हल्ल्यामागे जे कोणी असतील त्यांना सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ओलांदो यांनी दिली आहे. तथापि, ‘इसिस’सारख्या संघटनेचे जिवावर उदार झालेले अतिरेकी कुठल्याही इशार्यापला, धमकीला भीक न घालता जगभर रक्तपात करत सुटले आहेत, हे वास्तव आहे. खुद्द फ्रान्सवरच इस्लामी दहशतवाद्यांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे. मोहम्मद पैगंबरांसंदर्भात कार्टून छापले म्हणून अल कायदाच्या अतिरेक्यांनी जुलै २०१५ मध्ये पॅरिस येथील ‘चार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकावर हल्ला केला. चार प्रसिद्ध व्यंगचित्रकारांसह १२ जण या हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर चारच महिन्यांनी ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये ७ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवले. यात १३० लोक ठार झाले. त्यापाठोपाठ आता हा तिसरा हल्ला घडवून इस्लामी दहशतवाद्यांनी फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत. फ्रान्सच काय, युरोपातील बहुतांश सर्वच देश दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखालीच वावरत आहेत. अमेरिका आणि ब्रिटनलाही दहशतवादी हल्ल्यांचे भय आहेच. खरेतर इस्लामी दहशतवादाचा सर्वात मोठा बळी हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानने जेव्हा हे जगाला ओरडून सांगितले तेव्हा हे सगळे युरोपियन देश ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ ठेवून गप्प राहिले. किंबहुना अतिरेक्यांचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानसारख्या विषारी नागाला दूध पाजत राहिले. आता हाच इस्लामी दहशतवादाचा नाग युरोपियन देशांनाही दंश करीत सुटला आहे. दहशतवादाविरुद्ध प्रत्येक देशाने एकाकी लढून भागणार नाही, हे आता तरी जगाने लक्षात घ्यायला हवे. सर्व देशांनी इस्लामी दहशतवादाविरुद्ध संयुक्त आघाडी उभारून अतिरेक्यांच्या या फौजा आणि जिहादी मानसिकतेचा नायनाट केल्याशिवाय हे दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत. नीस शहरातील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सची जनता शोक व्यक्त करीत असताना ‘इसिस’चे अतिरेकी आणि समर्थक मात्र फ्रान्समधील रक्तपाताबद्दल आनंदोत्सव साजरा करीत आहेत. हा क्रौर्याचा कळस आहे. ‘इसिस’च्या नरपिशाचांचे रक्त सांडूनच जगभरातील देशांनी या हत्याकांडाचा सूड घ्यायला हवा

No comments:

Post a Comment