Total Pageviews

Saturday 12 March 2016

शूरवीर जवानांची खुलेआम विटंबना आणि बदनामी करणार्‍या, सवंग प्रसिद्धीने उन्माद चढलेल्या कन्हैय्याकुमारच्या मुसक्या पुन्हा आवळायलाच हव्यात.

पुन्हा गरळ ओकलीच vasudeo kulkarni Thursday, March 10, 2016 AT 11:40 AM (IST) Tags: ag1 मातृभूमी आणि जनतेच्या रक्षणासाठी सर्वस्वाची होळी करून आपल्या रक्ताचे शिंपण करणार्‍या शूरवीर जवानांची खुलेआम विटंबना आणि बदनामी करणार्‍या, सवंग प्रसिद्धीने उन्माद चढलेल्या कन्हैय्याकुमारच्या मुसक्या पुन्हा आवळायलाच हव्यात. राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रा. अफजल गुरूचा स्मृतिदिन साजरा करणार्‍या टोळक्याचा म्होरक्या कन्हैय्याकुमारवर केंद्र सरकारने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवताच, उपटसुंभ पुरोगामी आणि तथाकथित लोकशाहीवादी नेत्यांनी, संघटनांनी त्याचा कैवार घेतला. कन्हैय्याकुमारसह सात जणांना पोलिसांनी अटक करताच, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा टाहो डाव्यांनी आणि काही पुरोगामी नेत्यांनी जोरजोरात फोडला. कन्हैय्याकुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा जामीन मंजूर करताना, आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवायचा आणि चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत, असा आदेशही बजावला आहे. त्याला तुरुंगात डांबताना आणि तुरुंगातून सुटल्यावर त्याची बाजू घ्यायसाठी सरकारवर हल्ला चढवणार्‍यात उभय पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांच्यासह अनेक बडी बडी धेंडे उभी राहिली. जाहीरपणे त्यांनी कन्हैय्याकुमारच्या देशद्रोही कृत्याची वकिली केली. तुरुंगात डांबलेल्या कन्हैय्याकुमारने काही महापराक्रम केल्याच्या आवेशात, याच पुरोगाम्यांच्या टोळक्याने त्याची जामिनावर सुटका होताच, प्रचंड स्वागत केले. त्याच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. त्याच सभेत कन्हैय्याकुमारने आपण राष्ट्रप्रेमी आहोत आणि आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, असे आवेशपूर्ण भाषणही ठोकले. प्रसारमाध्यमांनी त्याच्या त्या भाषणाला अवास्तव प्रसिद्धी दिल्याने, लोकप्रियता डोक्यात गेलेल्या या भंपक आणि उठवळ विद्यार्थी नेत्याने जागतिक महिलादिनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि काश्मीरमध्ये जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांशी लढणार्‍या लष्करी जवानांची बदनामी करणारे भाषण ठोकले आहे. नेहरू विद्यापीठातल्याच विद्यार्थ्यांशी महिलादिनी संवाद साधताना त्याने काश्मीरमधल्या जवानांवर केलेले महाभयंकर आरोप अक्षम्य तर आहेतच, पण त्यांच्या शौर्याचीही विटंबना करणारी हे भाषण असल्याने, केंद्र सरकारने पुरोगाम्यांच्या भुंकण्याची पर्वा न करता, कन्हैय्या कुमारवर कडक कायदेशीर कारवाई करायलाच हवी. ‘भारत तेरे तुकडे होंगे-इंशाल्लाह, इंशाल्लाह आणि काश्मीर की आजादी की जंग रहेगी, जंग रहेगी’ अशा देशद्रोही घोषणा देणार्‍या याच कन्हैय्याकुमारने काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान, संरक्षण आणि जनतेची सुरक्षा करायच्या नावाखाली तिथल्या महिलांवर बलात्कार करीत असल्याचा अतिभीषण आरोप केला आहे. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून देशद्रोही कारवायांना चिथावणी देणार्‍या या विषारी सापाच्या आणि त्याच्या पिलावळीच्या नांग्या ठेचायला हव्यात. भारतीय लष्करातल्या शूर जवानांच्याबद्दल असली प्रक्षोभक वक्तव्ये करणार्‍या कन्हैय्याकुमारला भर चौकात उभे करून चाबकाने फोडूनच काढायला हवे, अशीच सर्वसामान्य जनतेची भावना आहे. असल्या आगलाव्या आणि जवानांची विटंबना करणार्‍या वक्तव्याबद्दल संतप्त जमावाने त्याला जोड्यांनी मारायच्या घटना घडल्यास तो दोष संतापलेल्या जनतेचा नव्हे तर जवानांच्या शौर्यावर थुंकणार्‍या या कन्हैय्याकुमारचाच असेल. भारतीय लष्कराची प्रशंसा कन्हैय्याकुमार हा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी आणि पुरोगामी विचारांचा वारसदार असल्याचा साक्षात्कार काही उठवळ, भंपक आणि नादान पुरोगाम्यांना झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र हा विष ओकणारा सापच असल्याचे त्याच्या या बेलगाम वक्तव्याने सिद्ध झाले आहे. त्याला पाठिंबा देणारी आणि डोक्यावर घेऊन नाचणारी नेते मंडळी कोण आहेत हे जनतेने गेल्या तीन आठवड्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेच आहे. भारतीय लष्करातल्या जवानांवर हे असले घाणेरडे आरोप करायचे धाडस शत्रू राष्ट्र-पाकिस्ताननेही केलेले नाही. पाकिस्तानच्या तालावर नाचणार्‍या हुर्रियत परिषद आणि दहशतवादी संघटनांनीही हे असले आरोप केलेले नाहीत. स्त्रियांचा सन्मान ठेवावा, त्यांना आदराची वागणूक द्यावी, या छत्रपती शिवरायांच्या आदेशाचे, शिस्तीचे कठोर पालन करणारे भारतीय लष्कर आहे. यादवी युद्धाने गाजलेल्या, पीडित असलेल्या गोरगरीब जनतेचे आणि महिलांचे संरक्षण करायसाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दक्षिण आफ्रिकेतल्या अशांत राष्ट्रात गेल्या साठ वर्षात भारतीय लष्कराच्या अनेक तुकड्या गेल्या होत्या. भारतीय लष्करातल्या जवानांनी त्या राष्ट्रात मानवतावादी कार्य करताना तिथल्या महिलांनाही सन्मानाची वागणूक दिल्याची प्रशंसा संयुक्त राष्ट्रसंघानेही केलेली आहे. आतापर्यंत पाकिस्तानशी झालेल्या तीनही युद्धात, पाकिस्तानच्या जिंकलेल्या प्रदेशातल्या महिलांचे रक्षण केलेल्या जवानांच्या चारित्र्याबद्दल पाकिस्ताननेही भारतीय लष्कराचा गौरव केला आहे. गेली तीस वर्षे काश्मीरमध्ये पाकिस्तानी आणि फुटीरतावादी दहशतवाद्यांनी सुरू केलेले सामूहिक हत्याकांडांचे, हिंसाचाराचे सत्र अद्यापही संपलेले नाही. काश्मीरमधला दहशतवाद मोडून काढायसाठी आतापर्यंत तीस हजार जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे. दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या शेकडो दुर्दैवी महिलांची सुटका सुरक्षा दलांच्या जवानांनीच केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सैतानी वृत्तीच्या दहशतवाद्यांनीच काश्मीरमधल्या महिलांवर अत्याचार केले, हे मात्र त्यांचाच जयघोष करणार्‍या राष्ट्रद्रोही टोळक्याला दिसत नाही. अशा स्थितीत काश्मीरमध्ये सुरक्षेच्या नावाखाली सुरक्षा दलाचे जवान महिलांवर बलात्कार करतात, असा आरोप करणारा कन्हैय्याकुमार कुणाचा पित्त्या आहे, हे उघड झाले आहे. भारतीय जवानांनी काश्मीरमध्ये महिलांशी गैरव्यवहार किंवा त्यांचा साधा अवमान केल्याची ही घटना घडलेली नाही. महिलांच्या मोर्चांचा बंदोबस्त करतानाही, आपल्या जवानांनी कधीच मर्यादा सोडलेल्या नाहीत. काश्मीर मधल्या लष्करी जवानांच्या चारित्र्यावर आरोप करणे, म्हणजे सूर्यावर थुंकायचा घाणेरडा प्रकार होय! कन्हैय्याकुमारला आता सवंग लोकप्रियतेची चटक लागल्यामुळेच त्याचे डोके ठिकाण्यावर राहिलेले नाही. त्याला वठणीवर आणायलाच हवे. अन्यथा संतप्त जनताच त्याला धडा शिकवील

No comments:

Post a Comment