Total Pageviews

Saturday 12 March 2016

अवश्य वाचाच ! आपल्या देशात कार्व्हर का तयार होत नाहीत? श्रीमती राधिका अघोर

Message body अवश्य वाचाच ! आपल्या देशात कार्व्हर का तयार होत नाहीत? श्रीमती राधिका अघोर छत्तीसगड मध्ये पोलिसांना मदत केली म्हणून नक्षलवाद्यांनी काल 10 आदिवासीची क्रूर हत्या केली, ही बातमी मी तरी फक्त दूरदर्शनवर पाहिली. रात्री एका वाहिनीवर सावरकर विरुद्ध गांधी अशी वांझोटी चर्चा सुरु होती (कृपया वांझोटी हा शब्दunproductive या अर्थाने घ्यावा, कुठलेही जेंडर बायस जोडू नये) या अशा चर्चांपेक्षा नक्षलवादी कारवाया अधिक गंभीर आणि धोकादायक वाटत नाही का? की आदिवासीना जगण्याचाही मूलभूत अधिकार नाही? पण हे सगळंच पाहत असताना एक विचार माझ्या मनात सारखा येत होता. आजकाल अशा निरर्थक गोष्टीवर चर्चा, भांडण याला इतका उत का आलाय? बुद्धीजीवी वाढलेत का अचानक? उदाहरणार्थ, गेल्या काही काळात घडलेल्या घटना. हैदराबाद मध्ये रोहित वेमुलाची आत्महत्या - घटना दुर्दैवी आहे, यात कोणाचेच दुमत नाही. तो एक पीएचडी करणारा गरीब घरातला विद्यार्थी होता, काय आकांक्षा, स्वप्न असतील त्याची? मी उच्च शिक्षण घेऊन पैसे कमवेन, माझ्या कुटुंबाला सुखी करेन, माझ्यासारख्या गरीब समाजाला मदत करेन, अशाच ना? मग याकुब मेमनची फाशी याचा त्याच्या जगण्याशी काय संबंध होता? तेलंगणामध्ये बीफ बॅन नाही, याकुब मेमनशी त्याचा काहीही संबंध नव्हता, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या, घटनात्मक, न्यायालयीन प्रकियेतून घडलेल्या होत्या, यासाठी तिथे आंदोलन का व्हावे? आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा या नसत्या भानगडी कराव्यात असे त्याला का वाटले? मी रोहितचं पूर्ण पत्र वाचलंय, अगदी खोडलेल्या भागासकट - ते वाचल्यावर आपण खूप भरकटत गेलो, तेही अनेक पोकळ बाबींमध्ये, याचं frustration मला जाणवलं. या निराशेतून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे असे वाटते. पण त्याचा दोन्ही बाजुंनी राजकारणासाठी व्यवस्थित वापर झाला. दुसरी घटना जेएनयुमधली. हे सगळे विद्यार्थी अफजल गुरू आणि मकबूल भटच्या फाशीविरोधात घोषणा देतात, भारतीय न्यायव्यवस्थेचा धिक्कार करतात, देशविरोधी घोषणा देतात. वास्तविक ह्या दोन्ही दहशतवाद्यांना फाशी देऊन बराच काळ लोटला आहे, लोकशाहीतल्या सर्व घटनादत्त अधिकारांचे रक्षण करतच त्याना कायदेशीर प्रक्रियेतून फाशी देण्यात आली आहे,मग आता हे सगळे उकरून काढण्याची गरज काय? हे आंदोलन त्यांच्या कुठल्या अभ्यासक्रमाचा भाग होते? कन्हैया कुमारची बाजू घेताना इंडियन एक्स्प्रेस सारख्या वृत्तपत्राने त्याच्या गरीब घरातले फोटो पहिल्या पानावर छापले. त्यांच्या मते गरीब घरातला मुलगा (सॉरी,सन ऑफ मदर इंडिया) असे देशद्रोही काम करूच शकत नाही. पण गरीब घरातला हा मुलगा त्याच्या आईचे कष्ट कमी करण्यासाठी नोकरीधंदा का करत नाही? वयाच्या 28 व्या वर्षी आपण काहीच कमवत नाही,याचे त्याला वैषम्य नाही? गरीब कुटुंबाला सुखी करू शकणार नसेल, म्हाताऱ्या आईला आराम देऊ शकत नसेल तर काय उपयोग त्या शिक्षणाचा आणि असल्या मुलाचा? पण त्या रिकामटेकड्या उद्योगांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मनुवादाविरुद्धचे आंदोलन असा मुलामा देत त्याचे कौतुक करायचे? कोण मनू? तो गेला मसणात कधीच! आता आपल्याला मिळणाऱ्या शिक्षणाचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहा आधी. मात्र या मूलभूत गोष्टीकडे सोईस्कर दुर्लक्ष करत, तो देशद्रोह कसा नाही, सरकार कसं दडपशाही करतंय, यावर बुद्धीजीवी निरर्थक चर्चेचा कीस पाडतात, आणि आम्ही त्याच्या तितक्याच निरर्थक बातम्या करतो!! अजून एक गोष्ट - महिषासूर शहीद दिन म्हणे, कोण महिषासूर? त्याचे अस्तित्व मानता, मग दुर्गेचेही अस्तित्व मानता? ग्रह असलेला शनी देव मानता? काळाच्या पुढे जाताय का ती पुराणातली वांगी काढून अजून मागे जायचंय? काय उपयोग आहे या आंदोलनाचा? यापैकी एका तरी आंदोननाने तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यात फरक पडणार आहे का? एफटीआयआय चे ही तसेच. वर्षानुवर्षे त्याच संस्थेत पडून असलेल्या या काका विद्यार्थ्यांचे काय योगदान आहे सिनेमाक्षेत्राला? अजून किती वर्षे शिकतच राहणार हे? या सर्व संस्थामधल्या विद्यार्थ्याना अभ्यास नसतो का? मला त्यांच्यापेक्षा नावाजुद्दिन सिद्दिकी ग्रेट वाटतो, उत्तरप्रदेशातल्या छोट्या गावातून आणि गरीब कुटुंबातून आलेला, पण गरीबीच कौतुक करत बसला नाही, वाटेल ते कष्ट घेतले, सगळ्या भूमिका केल्या, स्ट्रगल करत स्वतःचे अस्तित्व सिद्ध केलं, या क्षेत्रातल्या तरूणानी त्याचा आदर्श घ्यायला हवा. असो, हे जरा विषयांतर झालं. पण एकूणच या सगळ्या आंदोलनांमागे एक सुसूत्र धागा मला दिसतोय- तथाकथित उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आलंय. आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळून सर्वसामान्य जनतेनं हा पर्याय निवडला आहे (त्यात बुद्धीजीवी लोक नाही,कारण त्यांना खाण्यापिण्याची भ्रांत कधीच नसते!) मात्र, हे सरकार आणि विशेषतः पंतप्रधान मान्यच नसल्याने, त्यांना संधी देण्याचा प्रश्नच नाही. लोकशाही मार्गाने सरकारला सत्तेवरून खाली खेचणे शक्य नाही, मात्र पराकोटीचा द्वेष स्वस्थही बसू देत नाही. त्यामुळे या असंतोषाचा फायदा दहशतवादी, नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यानी घेतला नाही, तरच नवल! या सर्व कारवायांना शहरी भागात पोचवण्यासाठी या असंतोषाचा आधार घेतला जातोय आणि या मुलांचा वापर केला जातो आहे, हे खूप घातक आहे. देशविभाजनाची भयंकर विषारी बीजे पेरली जातात आहेत. नाहीतर अफजल गुरू, मकबूल भट किंवा याकूब मेमन या सगळ्यांशी यांच्या कुठल्या भावना जोडल्या गेल्या आहेत? यांच्या कारवायामुळे जे निरपराध मारले गेले, त्यात गरीब, दलित,मुसलमान नव्हते? त्यांच्याविषयी काही कळवळा नाही वाटत? यावर एक युक्तिवाद असा केला जातो, की यांचा गुन्हेगारांना पाठिंबा नाही, तर फाशीच्या शिक्षेला विरोध आहे. हा युक्तिवादही फसवा आहे, कारण केवळ मुस्लिम गुन्हेगारांच्या वेळीच त्यांना हे आठवते. पण हे सगळं सुचण्यासाठी मूळात बुद्धी जागेवर असावी लागते. जिहाद आणि माओवाद ही अशी नशा असते, की ती आपली मती कुंठीत करते. नक्षलग्रस्त भागात आता बरीच विकासकामं होत आहेत, आदिवासीना या चळवळीतला फोलपणा कळला आहे, त्यामुळे त्यांनी नक्षल्याना मदत करणं बंद केलंय, यामुळेच ही चळवळ पांढरपेशा समाजात हातपाय पसरते आहे. उद्देश तोच मात्र मार्ग वेगळे. देशात असंतोष खदखदत ठेवायचा, अशांतता निर्माण करून देश खिळखिळा करायचा. आणि खेदाची गोष्ट ही की आंबेडकरवादी संघटनातले युवक या सगळ्या कारवायांचे बळी पडत आहेत. निदान मला कळलेले डॉ आंबेडकर तरी प्रखर लोकशाहीवादी आणि कर्मयोगी होते. अत्यंत तर्कसिद्ध विचार करणारे होते, खडतर जीवन जगत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, कठोर कष्ट केलेत, आणि केवळ स्वतःच्या भरवशावर मोठी जबाबदारी पार पाडली. अत्यंत प्रतिकूल आणि अपमानास्पद आयुष्य वाट्याला येऊनही, लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास ढळला नाही. त्यामुळेच त्यांनी देशाला एकत्र ठेवणारी लोकशाहीधिष्ठित राज्यघटना दिली, साम्यवाद व्यवस्था नाही. त्यामुळे आंबेडकरांचे नाव घेणारे हे युवक साम्यवाद आणि अशा हिंसक चळवळीना समर्थन देतात, हा त्यांचा मोठा पराभव आहे. आंदोलनाना माझा विरोध नाही.ती केलीच पाहिजेत. मात्र आम्हाला रोजगार द्या, कौशल्यशिक्षण द्या, मूलभूत सुविधा दया, या मुद्द्यांवर का करत नाही आंदोलन? देश जोडण्यासाठी एकत्र का येत नाही? पर्यावरण, लोकसंख्या, पाणी प्रश्न आज बिकट आहेत,अनेक चुकीचे निर्णय होताहेत, त्यात याच नाही, पुढच्या पिढ्यांचेही भविष्य धोक्यात आहे, त्यावर आंदोलन करा, अभ्यास करा,संशोधन करा, आम्ही सर्व शक्तीनिशी पाठिंबा देऊ. पण या आंदोलनांसाठी अभ्यास लागतो. मात्र लोकशाहीत सरकारला,व्यवस्थेला शिव्या द्यायला कुठलीही पात्रता, गुणवत्ता लागत नाही. आणि हे सगळं करता येते ते जनतेच्या पैशावर, त्यासाठी घाम गाळावा लागत नाही , त्यामुळे त्याची किंमत नाही. राजकीय सत्तासमीकरणे बदलत राहतात, आजचे सत्ताधारी उद्या विरोधक होतील, राजकारण त्यांच्यापुरते मर्यादित असू द्यावे, ते करताना देश पणाला लावणे आत्मघातकी आहे. सुरुवातीला म्हंटलेल्या मुद्द्यावर येते - गांधी विरुद्ध सावरकर अशी वांझोटी चर्चा आता कशाला? काय साध्य होणार त्यातून? आम्ही घरी आणि शाळेत शिकलो, आगरकर, सावरकर, आंबेडकर, महर्षी कर्वे, फुले सगळे विज्ञाननिष्ठ होते, राष्ट्रपुरुष होते, गांधींनी सर्वसामान्यांना अहिंसक चळवळ दिली, सगळं शिकताना एकावर प्रेम म्हणजे दुसऱ्याचा द्वेष असे नाही शिकवलं. ह्या महापुरुषांची जात किंवा यांच्याविषयी सांगणाऱ्या शिक्षकांचीही जात आम्हाला कधी कळली नाही, आवश्यकही वाटली नाही. पण त्या शाळेतून राष्ट्रवाद आपोआप शिकलो, देशाविषयी, प्रतिकांविषयी आदर बाळगायला शिकलो, त्यामुळे जेएनयु किंवा इतर कुठेही देशविरोधी घोषणा दिल्या, कृती केली तर राग येतो, दुःख होते, आणि हे सांगताना मला माझ्या शाळा - कॉलेजविषयी अभिमान वाटतो. मी बाबा आमटेंच्या आनंद निकेतनमध्ये शिकलेय,श्रमाला प्रतिष्ठा देणारे विद्यार्थी घडवणारे हे कॉलेज, त्यामुळे कुठल्याही शिक्षणसंस्थेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या नावाखाली असली घाणेरडी कामं होत असतील, तर तीळपापड होतो. परवा गप्पांमध्ये राजाभाऊ दांडेकर म्हणाले, आपल्या देशात खूप कार्व्हर का तयार होत नाहीत? कार्व्हर तयार होतात, पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, कारण आपल्याकडे श्रमाला प्रतिष्ठा नाही, संशोधनाला प्रसिद्धी नाही. प्रसिद्धी असल्या आंदोलनांना मिळते , कान्हेय्या, खालीद हे आपले हिरो, मग कार्व्हर कसे तयार होणार, युवा पिढी मढे उकरणाऱ्या वांझोट्या चर्चेत रमलीय ना साम्यवादी गांजाच्या विड्या फुकत!! अति बुद्धीजीवी असणे तापदायकच ठरले आहे खरंतर! त्यांना ना सामान्यांच्या भावना कळत ना प्रश्न! खरं तर आपल्याला नेमून दिलेले काम निष्ठेनं आणि जबाबदारीने करणं ही सुद्धा मोठी देशसेवा आणि समाजसेवा आहे, पण तेवढेही करावं असं या युवकांना वाटत नाही. खिन्न करणारी , विचारप्रवृत्त करणारी गोष्ट आहे

No comments:

Post a Comment