Total Pageviews

Sunday 28 August 2011

GREEDY INDIAN CRICKET TEAM SAVED BY ANNA HAZARE

नाचक्कीसह 'लगान'वसुली!
-
Wednesday, August 24, 2011 AT 03:00 AM (IST)
Tags: editorial,   cricket,   india
साहेबाच्या देशात झालेला पराभव क्रिकेटरसिकांची मानहानी करणारा आहे. अव्वल स्थान मिळविण्यासाठी पैशापेक्षा खेळावरील निष्ठेला महत्त्व द्यावे लागेल.

आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्या "लगान'मध्ये अडाणी आणि खेडवळ भारतीय संघाबरोबरच्या शर्तीच्या क्रिकेट सामन्यात अनपेक्षितपणे पराभूत झाल्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांना "लगान' वसूल न करताच माघारी फिरावे लागल्याचे कथानक चित्रपटात चित्रित करण्यात आले होते. त्याच साहेबाच्या देशात भारतीय क्रिकेट संघाचा दारुण आणि अपमानास्पद पराभव करून इंग्रजांनी आपला तेव्हापासूनचा बाकी राहिलेला "लगान' दामदुपटीने, व्याजासहित वसूल केला आहे. "लगान'मधील गोऱ्यांना हरवणाऱ्या आमीर खानच्या संघाला क्रिकेट कशाशी खातात, तेही ठाऊक नव्हते. आज इंग्रजांच्या भूमीत चारही कसोटींत दणदणीत मार खाणारा भारतीय संघ हा म्हणे "जगाचा राजा' होता. कसोटी सामन्यांत श्रीलंकेसारख्या बलवान संघाचा लागोपाठच्या दोन कसोटींत डावाने पराभव करून जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळविले होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटचेही आपणच राजे असल्याचे महेंद्रसिंह धोनीच्या संघाने दाखवून दिले होते. त्या राजेशाहीचा किताब पुढील स्पर्धा होईपर्यंत कायम राहणार असला तरी इंग्लंडनेही भारताचा लागोपाठच्या दोन कसोटींत डावाने पराभव केल्याने झालेली मानहानी रसिकांच्या अधिक जिव्हारी लागली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे राहुल द्रविडचा खणखणीत अपवाद वगळता, हे अपयश सांघिक आहे. यात सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि सेहवाग यांच्यासारख्या मातब्बरांपासून नवोदित सुरेश रैनापर्यंत झाडून साऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. धोनी तर कर्णधार, यष्टिरक्षक आणि फलंदाज अशा तिन्ही आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला. या पराभवास पैशांच्या अतिरेकी लोभापोटी जखमांवर बॅण्डेजचे लेप लावून खेळणारे खेळाडू जसे जबाबदार आहेत, त्याबरोबर भारतीय क्रिकेटचे व्यवस्थापनही. "वर्ल्ड कप'च्या मानसिक ताणतणावातून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दौऱ्यांपूर्वी या संघाने विश्रांती घेणे जरुरीचे होते. प्रत्यक्षात नंतरच्या चारच दिवसांत सचिनपासून सेहवागपर्यंत आणि झहीरपासून हरभजनपर्यंत सगळेच याच व्यवस्थापनाच्या "आयपीएल' सर्कशीत सहभागी झाले आणि अनेकांनी आपले हातपाय मोडून घेतले. पण त्याबद्दल बोलायला त्यांना तोंडही नव्हते, कारण या साऱ्यांनीच राजीखुशीने, संघमालकांची गुलामी स्वीकारली होती. त्यामुळेच सचिन वेस्ट इंडीजला जाऊ शकला नाही, तर झहीरला पहिल्या कसोटीतून बाहेर पडावे लागले, ते संपूर्ण दौऱ्यासाठी. पहिल्या दोन कसोटींत पूर्ण अपयशी ठरलेल्या हरभजनलाही अखेर आजारपणाचे निमित्त सांगून पॅव्हेलियनमधूनच बाकी दोन कसोटी बघाव्या लागल्या. पण ते बरेच झाले! कारण त्याची जागा घेणाऱ्या अमित मिश्राला चेंडूफेकीत यश मिळाले नसले, तरी मालिकेच्या अखेरच्या दिवशी आपल्याला सामना अनिर्णित ठेवण्याची अंधूक का होईना आशा दाखवणारा सचिननंतर तोच एकमेव खेळाडू होता!

या अपयशातून शिकता येण्याजोग्या शेकडो गोष्टी आहेत. द्रविडने मालिकेत तीन शतके झळकावून आपल्या बॅटीचे पाणी, वयाची चाळिशी समोर दिसत असतानाही कायम असल्याचे दाखवून दिले. त्याच्या निम्म्याने जरी जिगर आणखी एक-दोघांनी दाखवली असती, तरी मार जरा कमी पडला असता. अर्थात, पराभव टाळताच आला नसता, इतका साहेबाचा संघ या मालिकेत वरचढ होता. या मालिकेत भारतीय संघ एकदाही "300 प्लस' धावा काढू शकला नाही, असे सांगत धोनीने हे अपयश फलंदाजांच्या माथी मारले. पण ते खरेही आहे. इंग्लंडचे फलंदाज चार कसोटींत मिळून सहाच डाव खेळले आणि त्यात त्यांनी 2809 धावा केवळ 47 फलंदाजांच्या मोबदल्यात काढल्या. तर, भारताला आठ डावांत, ऐंशी फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ 2044 धावा जमवता आल्या. "जगज्जेत्या' भारतीय फलंदाजांची इतकी नाचक्‍की बऱ्याच वर्षांत झाली नव्हती. भारतीय खेळाडूंच्या दुखापती ही जितकी गंभीर बाब आहे, त्याहीपेक्षा खेळण्याचा हव्यास, ही अधिक चिंतेची बाब आहे. आपल्या क्रिकेट नियामक मंडळाचा लोभी स्वभावही त्यास कारणीभूत आहे. याच मालिकेदरम्यान सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांच्यासारख्या मान्यवर समीक्षकांकडे बोट दाखविण्यात आले. घसघशीत आर्थिक लाभाच्या मोबदल्यात बोर्डाची वकिली करणे हेच या दुकलीचे काम असल्याचे आरोप झाले. एकुणातच हा दौरा आपले जगज्जेतेपद हे कसे अळवावरच्या पाण्यासारखे आहे, तेच दाखवणारा ठरला. सध्या प्रसारमाध्यमांनी अण्णा हजारे हाच एककलमी विषय हातात घेतला आहे. भारतीय संघाची थोडीफार अब्रू वाचली, ती त्यामुळेच. त्याबद्दल धोनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णांचे शतश: ऋणी राहायला हवे!

No comments:

Post a Comment