Total Pageviews

Tuesday 23 August 2011

ANNA HAZAREJAIPRAKASH NARAYAN AGAINST CORRUPT GOVERNMENT

जयप्रकाश ते अण्णा हजारे!

सुहास फडके  Monday August 22, 2011

सध्या अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद, विशेषत: तरुणांची त्यांना मिळत असलेला साथ बघताना सत्तरीच्या दशकाच्या प्रारंभी जयप्रकाश नारायण यांनी देशभरात उभे केलेले नवनिर्माण आंदोलन आठवते. तेव्हाही या आंदोलनाने देशात अशीच वावटळ उठवली होती. त्या आंदोलनातही भ्रष्टाचारापासून अनेक मुद्दे होते. तेव्हा देशात वाढलेल्या भाववाढीमुळे जनता हैराण झाली होती. राजकारण्यांच्या खाबुगिरीमुळे लोकांत संताप होता. गरीबी हटाव अशी घोषणा देणा-या इंदिरा गांधींच्या राजवटीत गरीबी नष्ट होण्याचे सोडा, गरीबच भरडले जात होते.
अशा वेळी लोकांच्या जवळपास विस्मृतीत गेलेला जयप्रकाश पुढे आले. तेव्हा तेही सत्तीरीत होते. ही सारी व्यवस्था नष्ट करून नवीन देश, समाज उभारला जावा असे स्वप्न त्यांनी दाखवले. लोकांमध्ये नवचैतन्य आले. गुजरातमध्ये, तेव्हाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरुद्ध विद्यार्थी रस्त्यावर आले. पटेल यांचा भ्रष्टाचार कमालीचा वाढला होता. लोकांमध्ये असंतोष होता. बिहारमध्येही परिस्थिती तीच होती. लालू प्रसाद यादवांसारखे तरुण याच चळवळीतून पुढे आले. (पुढे त्यांनी काय दिवे लावले हा प्रश्न वेगळा आणि चिमणभाईंना, त्यांच्याविरुद्ध आंदोलन करणा-यांनीच नंतर आश्रय दिला हेही विसरता येणार नाही.) त्याच वेळी मोराराजी देसाई यांनी, चिमणभाई सरकार बरखास्त करा, विधासभा निवडणूक घ्या या मागणीसाठी आमरण उपोषण पुकारले होते. राज्यघटनेने निवडून दिलेल्या सरकारला अशा त-हेने दबावतंत्र वापरून पाडणे योग्य की अयोग्य याची चर्चा तेव्हाही झाली होती.
आज अण्णांच्या आंदोलनाबाबतही अशाच स्वरुपाची चर्चा सुरू आहे. उपोषण करून, जनलोकपाल विधेयकच मंजूर करा अशी दुराग्रही भूमिका घेणे योग्य आहे का?, यावर चर्चा होते आहे.
नवनिर्माणने तेव्हा काय साधले यावर नंतर बरीचे वर्षे खल झाला. ना भ्रष्टाचार कमी झाला, ना नवीन काही घडले. जेपींच्या नावावर आलेले सरकार इतके कुचकामी ठरले की जेमतेम पावणेतीन वर्षात लोकांनी पुन्हा इंदिरा गांधींना, काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून दिले.
अर्थात भारतासारख्या अवाढव्य देशात, अनेक भाषा बोलल्या जाणा-या देशात एका रात्रीत काही घडू शकते असे मानणे भाबडेपणाचे आहे. जेपींच्या आंदोलनाने, समान्य माणसाला लढण्याचे बळ दिले. मुळात कोणतेही पद, कोणताही राजकीय पक्ष मागे नसणा-या नेत्याला, केवळ त्याच्या सच्चेपणावर इतका मोठा संघर्ष उभा करता येतो हे दिसून आले.
आज अण्णांबाबतही हेच घडते आहे. इतके लोक, तरुण अण्णांना मानत आहेत ते त्यांनी हाती घेतलेली भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे. अण्णांची मोहीम शंभर टक्के यशस्वी होणार नाही हे उघड आहे. कारण कोणताही सत्ताधारी पक्ष ते मान्य करणार नाही. अण्णांनाही तडजोड करावी लागेल.
या निमित्ताने, सत्तेचा मोह नसलेली शक्ती सत्ताधा-यांवर अंकुश ठेवू शकते, लोकांना प्रेरणा देऊ शकते, त्यांना एकत्र आणू शकते हा संदेश बेबंद वागणा-या सत्ताधा-यांपर्यंत जाणे महत्त्वाचे असते. जेपी काय किंवा अण्णा यांच्या आंदोलनाचा हा पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे.
स्वातंत्र्यानंतर सा-या देशामध्ये जाणीवा निर्माण करणारे पहिले आंदोलन होते जेपींच. आता अण्णा तेच करत आहेत. काही काळानंतर अण्णांच्या आंदोलनाची चिकीत्सा करताना या बाबीचीही इतिहासकारांना दखल घ्यावी लागेल

No comments:

Post a Comment