Total Pageviews

Friday 6 June 2014

CHALLENGES IN FRONT OF NATIONAL SECURITY ADVISOR

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमोरची आव्हाने चीन, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार व नेपाळ हे शेजारी असल्याने हिंदुस्थानी संघराज्याच्या प्रादेशिक अखंडतेस असलेला धोका आणखीच वाढतो. दहशतवादी गट, मवाळ असलेल्या हिंदुस्थानवर हल्ला करण्याचे जोरदार प्रयत्न करतील. जातीयवादाचा प्रसार करून ते हिंदुस्थानच्या निधर्मी संस्कृतीवर हल्ला करतील. ते हवाला, खोट्या नोटांद्वारे आर्थिक केंद्रांवर थेट हल्ले करून हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेस आस्थर करण्याची भीती आहे. देशातील एक बुद्धिमान पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख अजित डोबाल यांची देशाचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांचा कार्यकाळ संपुष्टात येईपर्यंत अजित डोबाल यांची नियुक्ती ग्राह्य असेल. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी डोबाल यांनी गुजरात भवन येथे त्यांची भेट घेऊन सध्या देशाच्या सुरक्षेबाबत असलेल्या आव्हानांबाबत त्यांना माहिती दिली होती. अजित डोबाल यांची कारकीर्द देदीप्यमान राहिली आहे. कीर्तिचक्र हा लष्कराचा सन्मान प्राप्त झालेले डोबाल हे पहिले पोलीस अधिकारी आहेत. १९६८ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी राहिलेले डोबाल हे गुप्तचर वर्तुळात डावपेच आखण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सर्वोत्तम अधिकारी म्हणून ओळखले जातात. १९९९ मध्ये हिंदुस्थानच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानमधील कंधार येथे नेण्यात आले असताना अजित डोबाल हेच देशाचे मुख्य मध्यस्थ होते. ईशान्य हिंदुस्थान, जम्मू-कश्मीर आणि पंजाबसह देशाच्या विविध भागांत काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. २००५मध्ये निवृत्त झाल्यानंतर डोबाल यांनी काही वर्षे विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेचे काम पाहिले. आपण नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या समोर कोणती आव्हाने आहेत हे पाहूया. हिंदुस्थानकडून १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत अपमानास्पद हार पत्करावी लागल्याचा सूड घेण्याकरिता जनरल झिया यांच्या लष्करी राजवटीने, पाकिस्तानी आयएसआयच्या (इंटरसर्व्हिसेस इंटेलिजन्स, कुप्रसिद्ध गुप्तवार्ता-संस्था) सल्लामसलतीने हिंदुस्थानास आस्थर आणि खंडित करण्याची एक दीर्घकालीन योजना तयार केली. या योजनेचे नाव ‘के-प्लॅन’ असे होते. १९९३ पासूनच्या पाकिस्तानी आय.एस.आय. दहशतवादी कारवायांत ६३ हजारांहून अधिक माणसे मारली गेली. गंभीररीत्या जखमी झालेल्यांची संख्या २.५ लाखांहून अधिक आहे. ही संख्या आयएसआयचे दहशतवादी सामर्थ्यच स्पष्टपणे सूचित करते. पाकव्याप्त कश्मीरमध्ये ४०-५५ छुप्या अतिरेकी-प्रशिक्षण-केंद्रांतून प्रशिक्षण देणे सुरूच आहे. २,०००-२,५०० अतिरेकी हिंदुस्थानात घुसण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिहादचा प्रभाव वाढविण्याकरता आयएसआयने जम्मू आणि कश्मीरच्या तसेच ईशान्येतील अनेक राज्यांच्या नागरी प्रशासनात शिरकाव करून घेतलेला आहे. हिंदुस्थानची अंतर्गत सुरक्षेला भेडसावणारे पाच मोठे धोके पुढीलप्रमाणे आहेत - १. माओवाद / नक्षलवाद / डावा दहशतवाद, २. ईशान्येचे बांगलादेशीकरण, ३. बाकी देशांतील दहशतवाद, ४. कश्मीरमधील छुपे युद्ध, ५. समाजाचे मूलतत्त्वीकरण / जातीय दंगे. माओवादी ४० टक्के देशाचे नियंत्रण करत आहेत ४०टक्के केंद्रीय भूप्रदेशावरील, नवी दिल्ली आणि राज्यांच्या राजधान्यांचे प्रशासकीय नियंत्रण सुटून ते माओवाद्यांकडे गेलेले आहे. पशुपती, नेपाळपासून ते तिरुपती, आंध्रापर्यंतच्या पट्ट्यातील माओवाद्यांना त्या त्या क्षेत्रातील गुन्हेगारी विश्वातील मदत आणि पाठिंबा पुरवत असतात. माओवादी, गुन्हेगारी विश्व आणि अंमली पदार्थांचे व्यापारी यातील घनिष्ट संबंध देशासाठी स्फोटक झालेले आहेत. आयएसआयने माओवादी उतरंडीत जिहादी तत्त्वे (जिहादी दहशतवादी) घुसवलेली आहेत. जी त्यांना नेतृत्व, शस्त्रास्त्रे आणि अर्थपुरवठा करत असतात. ईशान्येचे बांगलादेशीकरण केंद्र सरकारने, ईशान्येकडील कॉंग्रेसशासित राज्य सरकारांनी आणि प. बंगालमधील राज्य सरकारांनी (कॉंग्रेस/कम्युनिस्ट/तृणमूल ) गेल्या ३० वर्षांत ४.५ ते ५ कोटींहून अधिक बांगलादेशींना देशात शिरू दिलेले आहे. भ्रष्ट शासकीय अधिकारी आणि निष्प्रभ सीमा सुरक्षा दलाच्या सहयोगाने हे घडून येत आहे. ईशान्येचा प्रश्‍न योग्य रीतीने न हाताळल्यास, सिलिगुडी भूपट्ट्याची (कॉरिडॉर) टोकाची धोकाप्रवणता, ईशान्येस केंद्रापासून विलग करू शकते. सिलिगुडी भूपट्टा हा १० ते २० किलोमीटर रुंदीचा आणि २०० किलोमीटर लांबीचा भूमी-पट्टाच हिंदुस्थानच्या मुख्य भूमीला, ईशान्य हिंदुस्थानास जोडणारा दुवा आहे. उर्वरित हिंदुस्थानातील दहशतवाद पाकिस्तान शांततेबाबत बोलत असतो, तेव्हा दक्षिण हिंदुस्थानसहित सर्व देशांत दहशतवादी केंद्रे पसरत असतात. मुस्लिम मूलतत्त्ववादाची, जिहादी दहशतवादाची प्रसार क्षेत्रे (फूट प्रिंटस्) दुर्लक्षिण्याने दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे.लष्कर-ए-तोय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद, इस्लामी / जिहादी दहशतवादाचे प्रमुख खेळाडू आहेत. पाकिस्तानमधील हल्लीच्या अंतर्गत गोंधळाच्या परिस्थितीत अमेरिकेचा दबाव असताना मोठ्या हिंसक घटना कदाचित घडणारही नाहीत. मात्र तशा त्या घडविण्याचे सामर्थ्य मात्र अबाधित आहे. चीन, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ (माओवादी) हे शेजारी असल्याने हिंदुस्थानी संघराज्याच्या प्रादेशिक अखंडतेस असलेला धोका आणखीच वाढतो. दहशतवादी गट, मवाळ असलेल्या हिंदुस्थानवर हल्ला करण्याचे जोरदार प्रयत्न करतील. जातीयवादाचा प्रसार करून ते हिंदुस्थानच्या निधर्मी संस्कृतीवर हल्ला करतील. ते हवाला, खोट्या नोटांद्वारे आर्थिक केंद्रांवर थेट हल्ले करून हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेस आस्थर करतील. जम्मू आणि कश्मीर व ईशान्येमध्ये, माध्यमास दहशतवादी-लष्करी गटांची मुखपत्रे होण्यास भाग पाडले जाईल. समाजाचे मूलतत्त्वीकरण/जातीय दंगे दरसाल सरासरीने जातीयवादी दंगलींची ६०० प्रकरणे होत असतात. मुझफ्फराबाद दंगली, किश्तवार दंगली ही याची उदाहरणे आहेत. ‘जातीय दंगली कशा थांबवाव्यात?’ यावर भरपूर मार्गदर्शन उपलब्ध आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास दंगली नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात. जम्मू आणि कश्मीरमधील छुपे युद्ध कश्मीर खोर्‍यातील निरनिराळ्या हुरियत कॉन्फरन्सच्या मोर्चांतून आणि दगडफेकी आंदोलनांतून हजारोंच्या संख्येने येणार्‍या, लष्कर-ए-तोय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन, ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्स यांच्या समर्थकांद्वारे फडकविल्या जाणार्‍या झेंड्यांनीच हा धोका प्रदर्शित होत असतो. शांतता प्रयत्नांच्या बुरख्याआड, पाकिस्तानच्या साहाय्याने, लष्करी-गुप्तवार्ता-आस्थापने शस्त्रास्त्रसज्ज घुसखोरांना कश्मीरात घुसवतच आहेत. सध्या ते दबा धरून हिंदुस्थानी संघराज्यावर अनेक आघाड्यांवर हिंसक हल्ले करण्याच्या सुयोग्य संधीची वाट पाहत आहेत. हुरियत कॉन्फरन्सने आयोजित केलेल्या मोर्चांमधून अशा सुप्त शक्तींनी डोके वर काढले आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांमधील राष्ट्रविरोधी राजकारण्यांकडून अशा शक्तींना सशक्त समर्थन मिळत असते. त्याची दखल घेऊन त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ब्रिगेडियर हेमंत महाजन hemantmahajan12153@yahoo.co.in

No comments:

Post a Comment