Total Pageviews

Sunday 7 October 2012

समाज भीषणतेचे वास्तव दर्शन : भाग - २


लहानपणी कधीतरी सर्कशीत मृत्युगोलातील चित्तथरारक कसरत पाहिल्याचे आठवते. २ मोटारसायकलस्वार त्या मृत्युगोलात अधिकच्या आकारात गोल गोल चक्र घेत असतात. अन् प्रेक्षक भयचकित होऊन तो खेळ पाहत राहतात.

मुंबईतल्या रस्त्यांवर असे मृत्युगोलातील जीवघेणे खेळ आज कित्येक जणांचे बळी घेऊन राहिले आहेत. परंतु अजूनही गांभीर्याने याचा विचार होताना दिसत नाही. हेल्मेट सक्तीचा जेवढा आग्रह पोलीस करताना दिसतात तेवढा मोटारसायकलस्वाराचं वय, लायसन्स, वेग, आवाज याबाबतीत करताना दिसत तरी नाहीत.

चारचाकी गाडी आणि दुचाकी यात सर्वात मुख्य फरक आहे तो म्हणजे ‘तोल’ सांभाळण्याचा. दुचाकी पडण्याला जास्त वाव असतो. शिवाय हेल्मेट नसेल तर डोक्याला मार लागतो अन् हेल्मेट असेल तर मान मोडण्याचा, मुरगळण्याचा संभाव असतो. तरुणाईने खरंच आपल्याला बाईक चा उपयोग किती, आवश्यकता किती अन् शौक किती याचा विचार करायला हवा.

१२ वी मध्ये शिकणारा एक स्वयंसेवक. डिझेलची ‘एन्फिल्ड’ घेऊन जेजे च्या फ्लायओव्हर वरून धडधडत चालला होता.. उतारावर तोल गेला अन् घसटत फरफटत गेला..डोक्याला जबरी मार लागून मृत झाला. त्याच्या आई वडिलांना हा खूप मोठा धक्काच होता. पण घडायचे ते घडले होते.
दुसऱ्या एका उदाहरणात २ जण चालले होते मोटारसायकलवरून. चालवणारा १२वीत अन् मागे बसलेला १०वीत. वरळी सीफेस येताच वेग घेतला १००-१२० चा. अन् काळाने झडप घातली. तोल गेला...दोघेही वाईट रीतीने फुटपाथला आपटले..१० वीतल्या मुलाचे डोके (कवटी) फुटली, चेहरा विद्रूप झाला आणि तेव्हा जो बेशुद्ध झाला तो ५ दिवस तसाच होता हॉस्पिटल मधे. आणि त्यातच निवर्तला. आई-वडिलांवर दुःखाची कुऱ्हाड. १२ वीतल्या मुलाचा खांद्यातून हात निखळला आहे, चेहरा प्रचंड सुजलाय पण सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. म्हटलं तर दोघेही अल्पवयीन. दोघांकडेही लायसन्स नाही. आणि झालेल्या गोष्टीचा फारसा अन्वयार्थ लावण्यातही काही अर्थ नाही. या वर्षभरात अशी अजून ३ उदाहरणे ऐकली. ही फार भीषण परिस्थिती आहे. पालकांनीच यावर नियंत्रण ठेवायला हवे.

बँकेतील एक बाई सांगत होत्या की त्यांच्याकडे एक माणूस आला अचानक ३५-४० हजार रुपये काढायला; जेव्हा त्याच्या खात्यात बॅलन्स फक्त लाखभर रुपयेच होता. आता बँकेतील कर्मचारी ओळखत असतात आपल्या नियमित खातेधारकांना. त्यांचे एक नातेसंबंध तयार झालेले असतात म्हणून त्या बाईंनी विचारले की काही अडचण आहे का? त्या व्यक्तीच्या कॉलेजवयीन मुलाने बाईक विकत घेण्यासाठी हट्ट धरला होता. कारण अगदी साधे सोप्पे होते..त्या मुलाच्या ‘ग्रुप’मधील सर्वांकडे मोटारसायकली होत्या! आणि हेच सार्वत्रिक चित्र आहे. कीर्ती कॉलेज, रुईया कॉलेज आणि तत्सम अन्य कॉलेजबाहेर बघा. बाईक्स ची भलीमोठी रांग असते. पूर्वी नंबरप्लेटवर ‘आई’ ‘दादा’ वगैरे लिहिलेलं असे. क्वचित ‘मी मराठा’ वगैरे. आता राजकीय पक्षाचे चट्टेरीपट्टेरी रंग दिसतात! एकमेकाची बाईक घेऊन फिरायला अन् फिरवायला नेणारी मुले दिसतील. जवळपास राहणारीच असतात..वरळी पोलीस कँप, माहीम पोलीस कॉलनी, मच्छिमार कॉलनी, दादर, बीडीडी चाळी, लालबाग-परळ इ. पण तरीही ‘गाडी’ हवीच असते. शिवाय इंधन दरवाढीचा काही फरक पडताना दिसून येत नाही. आज शिवाजी पार्कला भरधाव वेगात ‘फटफटी’ हे नाव सार्थ करत ४-४ चकरा मारणारे घनचक्कर दिसून येतात. गाडी पार्क करतानाही इंजिन चालूच. अजून एक स्टाईल म्हणजे बाईक दुकानासमोर उभी करायची चालू अवस्थेत, न्यूट्रल मधे आणि उतरून सिगारेट घेऊन पेटवून यायचं.. तोपर्यंत इंधन जळतच असतं. मग पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मोर्चात सामील व्हायला परत मोकळे!

दुचाकीला विरोध नाही. गरजेला प्रत्येकाला चालवता आलीच पाहिजे. गावाला तर ती आवश्यकता आहे. पण जीव धोक्यात घालून, प्राणांची पर्वा न करता करायला ते काही देशरक्षण नव्हे. कॉलेजात गेलेला आपला मुलगा काय करतो आहे हे कदाचित आई-वडिलांना माहितही नसेल आणि तसे लक्ष ठेवणे शक्यही नसते, परंतु आपल्या मुलाला कितीही हट्ट केला तरी बाईक घेऊ न देणे हे तर पालकांनी निष्ठुरपणाने करायला हवे अन्यथा त्याच्या भीषण परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी.

या लेखामुळे एखाददुसऱ्या पालकाने जरी आपला निर्णय बदलला आणि मुलाच्या हितासाठी बाईक न घेऊन देण्याच्या निर्णयावर ठाम राहिला तरी लेखनसार्थक झाल्यासारखे वाटेल.

या शृंखलेतील आधीचा लेख वाचण्यासाठी - http://vikramwalawalkar.blogspot.in/2012/10/blog-post.html

No comments:

Post a Comment